लंकेचं दहन करण्यासाठी बिभीषणांची गरज भासतेच, असं म्हणत रविवारी भारतीय जनता पक्षाच्या(भाजप) दिग्गज नेत्यांनी अनिल गोटे आणि विजयकुमार गावित यांच्या भाजपप्रवेशाचे समर्थन केलं आहे.
रविवारी विदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मॅरेथॉन सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. या प्रचारसभांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत असताना, लंकेच दहन करायचे असेल तर, बिभीषणांची गरज भासतेच त्यामुळे गावित आणि अनिल गोटे काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी भाजपमध्ये दाखल झाले आहेत, असे भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस म्हणाले. अनिल गोटे आणि विजयकुमार गावित अशा नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले असले, तरी ते एका राजकीय षडयंत्राचे बळी असल्याचा दावा यावेळी नितीन गडकरी यांनी केला. याच पत्रकार परिषदेत बहुजन रिपब्लिकन एकता मंचाच्या नेत्या सुलेखा कुंभारे यांनी भाजपला सक्रीय पाठिंबा दिल्याचेही भाजप नेत्यांनी घोषित केले. दरम्यान, भाजपने २५७ जागी तर, मित्रपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना १८, आरपीआय ५, आणि रासप ४ आणि शिवसंग्रामने ४ जागी उमेदवारी अर्ज भरल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

Story img Loader