नरेंद्र मोदी, पंतप्रधान
काही दिवसांपूर्वी आपण मदन दास देवीजींना गमावले, त्या वेळी माझ्यासह लाखो कार्यकर्ते शोकाकुल झाले. त्यांच्यासारखे प्रभावी व्यक्तिमत्त्व आता आपल्याबरोबर नाही, हे वास्तव स्वीकारणे हेच सर्वात मोठे आव्हान आहे. तरीही त्यांचा आपल्यावरील प्रभाव चिरंतन आहे, ही भावना आपल्याला दिलासा देत राहील. त्यांची शिकवण आणि त्यांचे सिद्धांत आपल्याला यापुढील प्रवासात एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे प्रेरणा देत राहतील आणि मार्गदर्शन करतील.
त्यांच्याबरोबर काम करण्याचे भाग्य मला लाभले. त्यांचा साधेपणा आणि अतिशय विनयशील स्वभाव मी अतिशय जवळून पाहिला. ते कुशल संघटक होते. मीसुद्धा संघटनेत बराच काळ काम केले. त्यामुळे साहजिकच संघटनेचा विकास आणि कार्यकर्त्यांची प्रगती यांविषयी आमच्यामध्ये नियमितपणे चर्चा होत असत. अशाच एका चर्चेमध्ये, ते मूळचे कुठले आहेत असे मी त्यांना विचारले. त्या वेळी त्यांनी मला सांगितले की ते महाराष्ट्रातील सोलापूरजवळच्या एका गावाचे रहिवासी आहेत, पण त्यांचे पूर्वज गुजरातमध्ये होते. पण गुजरातमधला तो भाग नक्की कोणता होता, याची त्यांना माहिती नव्हती. आमच्या एका शिक्षकांचे आडनाव देवी होते आणि ते विसनगरचे होते असे मी त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी विसनगर आणि वडनगरला भेट दिली. आमच्यात गुजरातीमधूनही संवाद होत असे.
मदन दासजींच्या अनेक वैशिष्टय़ांपैकी एक म्हणजे शब्दांच्या पलीकडे जाण्याची आणि त्या शब्दांमागील भावना जाणून घेण्याची त्यांची क्षमता. अतिशय नम्रपणे बोलणारे आणि नेहमीच हसतमुख राहणाऱ्या मदन दासजींना अनेक तासांच्या प्रदीर्घ चर्चाचे सार केवळ काही वाक्यांत मांडता येत असे.
जेव्हा व्यक्ती आपले संपूर्ण आयुष्य समष्टीच्या हितांना प्राधान्य देत, त्यासाठी समर्पित करते, तेव्हा किती अद्भुत गोष्टी साध्य केल्या जाऊ शकतात, हे मदन दास देवीजी यांच्या जीवनकार्यातून आपल्या प्रत्ययास येते. शिक्षणाने लेखापरीक्षक असलेले मदन दासजी, खरे तर निवांत आयुष्य जगू शकले असते, मात्र त्यांच्या अंतर्मनाने त्यांना तरुणांच्या मनांना आकार देण्याचे आणि भारताच्या विकासासाठी कार्य करण्याची आज्ञा दिली असावी.
मदन दासजी यांचा देशातील तरुणांवर अढळ विश्वास होता. देशाच्या कानाकोपऱ्यातील युवकांशी ते सहज जोडले जात आणि म्हणूनच त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला बळकट करण्याच्या कार्यात स्वत:ला वाहून घेतले. त्यांच्या या मार्गावरील, त्यांचे महत्त्वाचे प्रेरणास्थान म्हणजे यशवंतराव केळकरजी. मदन दासजी यांच्यावर त्यांचा अत्यंत प्रभाव होता आणि ते त्यांच्याशी कायम चर्चाही करीत असत. ‘अभाविप’च्या कार्यात अधिकाधिक विद्यार्थिनींना सहभागी करून घेण्याबाबत तसेच, सामाजिक कल्याणाच्या कामात त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी, तरुणींना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबाबत ते कायमच आग्रही होते. ते नेहमी म्हणत असत : जेव्हा मुली, विद्यार्थिनी एखाद्या सामूहिक कार्यात सहभागी होतात त्या वेळी ते कार्य अधिक संवेदनशीलतेने केले जाते. मदन दासजी, यांच्यासाठी, विद्यार्थ्यांप्रती त्यांचा असलेला स्नेह हा सर्वात मोलाचा होता. ते कायमच विद्यार्थ्यांच्या घोळक्यात रमत, मात्र, पाण्यातल्या कमळाप्रमाणे ते स्वत: कधीही विद्यापीठाच्या राजकारणात गुंतले नाहीत.
असे अनेक नेते आहेत जे आपल्या सार्वजनिक जीवनातील प्रगतीचे श्रेय, त्यांना तरुण वयात मदनजींकडून मिळालेल्या मार्गदर्शनाला देतील. मात्र, असा कुठलाही दावा करण्याचा, श्रेय घेण्याचा त्यांचा स्वभावच नव्हता.सध्याच्या काळात मनुष्यबळाचे व्यवस्थापन, गुणवत्तेचे व्यवस्थापन आणि कौशल्याचे व्यवस्थापन या संकल्पना मोठय़ा प्रमाणावर लोकप्रिय आहेत. मदन दासजी लोकांना ओळखण्यात आणि त्यांची प्रतिभा संस्थात्मक उद्दिष्टे गाठण्यासाठी वापरण्यात प्रवीण होते. ते लोकांच्या क्षमता ओळखून त्याप्रमाणे त्यांना काम देत असत, किंबहुना ते त्यांचे वैशिष्टय़ होते. त्यांच्या गरजेप्रमाणे लोकांनी स्वत:ला बदलले पाहिजे या गृहीतकावर त्यांचा विश्वास नव्हता. त्याचमुळे एखाद्या युवा कार्यकर्त्यांला स्वत:ची नवी कल्पना मदन दासजींकडे सहजपणे, स्पष्टपणे मांडता येत असे. म्हणूनच त्यांच्याबरोबर काम केलेल्या अनेकांनी आपापल्या ताकदीप्रमाणे स्वयंप्रेरणेने काम करून स्वत:चा वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संघटना, संस्थांचा मोठय़ा प्रमाणावर विकास झाला आणि त्या संस्था मोठय़ा होऊन, त्यांची व्याप्ती वाढूनही त्या एकसंध आणि कार्यक्षम राहिल्या.
मदन दासजी यांचे प्रवासाचे वेळापत्रक भरगच्च असायचे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. कर्तव्याच्या पलीकडे जाऊन लोकांना भेटायला त्यांना आवडायचे आणि लोकांशी संवाद साधायला ते नेहमीच तत्पर असायचे. मात्र त्यांचे कार्यक्रम नेहमी साधे असायचे, त्यात बडेजाव नसायचा. त्यामुळे त्यांचा कोणत्याही कार्यकर्त्यांवर भार पडायचा नाही. अखेपर्यंत त्यांचा हा गुण कायम राहिला. आपण देशासाठी आणि समाजासाठी काय करू शकतो, याचा ते आजारपणातही सतत विचार करीत असत.
मदन दासजी यांची शैक्षणिक कारकीर्द उत्तम होती. त्यातूनच त्यांची सखोल आणि सूक्ष्म कार्यपद्धती आकाराला आली. ते एक उत्कट वाचक होते, काही चांगले वाचनात यायचे तेव्हा ते त्या क्षेत्रात काम करणाऱ्या संबंधित व्यक्तींकडे ते पाठवायचे. मला अनेकदा अशा प्रकारच्या गोष्टी स्वीकारण्याचे भाग्य लाभले आहे. त्यांना अर्थशास्त्र आणि धोरणविषयक बाबींचे उत्तम ज्ञान होते.
भारतात कोणतीही व्यक्ती इतरांवर अवलंबून नसेल आणि प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या पायावर उभी राहू शकेल, तसेच स्वत:मध्ये सुधारणा घडवून विकास करण्याच्या संधींचा सदुपयोग करील, अशा भारताची त्यांनी कल्पना केली होती. मदन दासजी यांनी अशा भारताची कल्पना केली होती जिथे स्वावलंबन हे केवळ एक ध्येय नसेल तर प्रत्येक नागरिकासाठी एक जिवंत वास्तव असेल त्याचबरोबर परस्परांप्रती आदर, सक्षमीकरण आणि सामायिक समृद्धी या तत्त्वांवर आधारित समाज असेल. आता, भारत विविध क्षेत्रांमध्ये अधिकाधिक स्वावलंबी होत असताना, त्यांच्याएवढे आनंदी दुसरे कुणी नसेल.
आज आपली लोकशाही चैतन्यशील आहे. युवकांमध्ये आत्मविश्वास आहे. समाज भविष्याकडे पाहत आहे आणि देश आशावादाने भारलेला आहे. अशा वेळी मदन दासजी यांच्यासारख्यांचे स्मरण करणे औचित्याचे ठरेल. त्यांनी संपूर्ण जीवन देशसेवेसाठी आणि देशाला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी समर्पित केले.