राज्याचे मावळते मुख्य सचिव मनोज सौनिक यांना मुदतवाढ देण्याचा राज्याचा प्रस्ताव केंद्राने मान्य केला नाही. परिणामी डॉ. नितीन करीर यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली. उत्तर प्रदेश आणि ओडिशाच्या मुख्य सचिवांच्या सहा महिन्यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्राने मंजूर केला मग ‘डबल इंजिन’ सरकार असताना महाराष्ट्राचाच प्रस्ताव का नाकारला ? असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. सौनिक हे मुख्यमंत्र्यांच्या ‘मित्रा’च्या अधिक जवळ गेल्याची कुजबूज मंत्रालयीन वर्तुळात सुरू आहे. मुख्यमंत्री शिंदे सौनिक यांच्या मुदतवाढीस अनुकूल होते. मग तरीही माशी कुठे शिंकली, असा प्रश्न पडतोच. म्हणे, मुख्यमंत्री वा उपमुख्यमंत्र्यांमधील कुरघोडीच्या राजकारणाची ही परिणती असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चा मा’?

एका अक्षराच्या फरकाने नारायणरव पेशव्याचा खून झाला. त्यामुळे पुढे मराठीत कोणत्याही पाताळयंत्री षडयंत्रासाठी ‘ध’ चा ‘मा’ करणे अशी म्हण रूढ झाली. कोणी छक्केपंजे करण्यात पटाईत असेल तरीही तेथे या म्हणीचा उपयोग केला जातो. सध्या ही म्हण सोलापुरात भाजपच्या विजय देशमुख आणि सुभाष देशमुख या एकमेकांचे मुख न पाहणाऱ्या दोन्ही आमदारांमधील सुप्त संघर्षांच्या संदर्भात वापरली जात आहे. झाले असे की, सुभाष देशमुख व विजय देशमुख हे दोघेही एकाच व्यासपीठावर असताना सोलापूरच्या सर्वागीण विकासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून सुभाष देशमुख यांनी ‘सोलापूर मोठे खेडे’ असल्याचे विधान केले होते. त्यावर विजय देशमुख यांनी हरकत घेऊन सोलापूर विकासाच्या वाटय़ावर कसे आहे, हे नमूद केले. यातून दोन्ही देशमुखांतील हे वाकयुध्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापर्यंत पोहोचले. तेव्हा सुभाष देशमुख यांनी आपली बाजू सावरत आपल्या विधानाचा ध चा मा केल्याचा दावा केला आहे. आमदार सुभाष देशमुख हे शहरी नव्हे तर ग्रामीण तोंडवळय़ाचे आहेत. त्यांनी यापूर्वीही सोलापूरला खेडे म्हणून संबोधले होते. सोलापूर विकणे आहे, असेही विधान त्यांनी केले होते. परंतु त्यामागचा हेतू सोलापूरच्या सकारात्मक गोष्टींना बाजारपेठ मिळावी हाच होता. परंतु सोलापूरला खेडे म्हणून संबोधताना ध चा मा कसे झाले, याचे स्पष्टीकरण सुभाषबापूंनी देणे अपेक्षित होते.

लोकशाहीच्या नावे चांगभले..

जिल्ह्यातील दोन नेत्यांचे वाढदिवस नववर्षांच्या पहिल्या आठवडय़ात होत आहेत. यंदा निवडणुकीचे वर्ष असल्याने याचा गाजावाजा करीत वाढदिवस साजरा केला जाणार हे स्पष्ट आहे. या निमित्ताने स्थानिक पातळीवर मोठय़ा प्रमाणात वाढदिवसाच्या निर्धारीत दिवसापुर्वीच डिजिटलने शहर झाकोळले आहे. आता याला लोकांचे प्रेम म्हणतात, की राजकीय दहशत म्हणतात ही गोष्ट वेगळी. मात्र, या निमित्ताने नेत्यांना वारसदार म्हणून मुलालाच पुढे करण्याचा अट्टाहास प्रेम करणार्या कार्यकर्त्यांवर जबरीने थोपला जात आहे. दुधाळ म्हैशीच्या लाथाही गोड असतात. मात्र, म्हैशीपेक्षा रेडकू मोठे हा काळाचाच महिमा. आमदारकी, खासदारकी आमच्याच गावात नव्हे तर आमच्याच घरात असे कोणी जरी म्हणत असेल तर लोकशाहीच्या नावानं चांगभलं

मुश्रीफांचे विस्मरण !

कोल्हापूर जिल्ह्यातील पालकमंत्री हसन मुश्रीफ पत्रकारांशी संवाद साधत होते. लोकसभा निवडणुकीबाबत सध्या चर्चा होत आहे. उमेदवार कोण असणार हे निश्चित होत नाही. त्यामुळे मुश्रीफ यांना लोकसभा निवडणूक लढवणार का, असा प्रश्न विचारला गेला. त्यावर त्यांनी अजून दोन वेळा विधानसभा निवडणूक लढणार आणि नंतर लोकसभा निवडणुकीत उतरणार असे उत्तर दिले. तरीही त्यांना विचारले गेले, अहो; तुम्ही तर एकदाच विधानसभा निवडणुक लढवणार असे म्हणाला होतात. त्याचे काय ? आपले काहीतरी चुकले असे म्हणून मुश्रीफ यांनी हात जोडले आणि निघून जाणे पसंत केले.

(संकलन : संतोष प्रधान, एजाज हुसेन मुजावर, दिगंबर शिंदे, दयानंद लिपारे)

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Appointment of chief secretary the central government did not accept the state proposal to extend the tenure of chief secretary manoj saunik amy