कोल्हापूरच्या राजकारणात बंटी आणि मुन्ना हे परवलीचे शब्द. दोघे एकेकाळचे जीवश्च कंठश्च मित्र. पुढे दोघात अंतर पडले. २०१९ सालच्या निवडणुकीत उभयतांनी पुन्हा गळय़ात गळा घातला. नंतर पुन्हा लगेचच दोस्ताना दुभंगला. तो अजूनही कायम आहे. तर असे हे माजी पालकमंत्री सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक ही बंटी -मुन्नाची जोडी पालकमंत्री हसन मुश्रीफ या समान दुव्यामुळे एका कार्यक्रमात एकत्र आलेली. दोन ध्रुवावरचे दोन टोक जवळ आल्याचे अकल्पित चित्र पाहून उपस्थितांच्या नजरेत विस्मय दाटलेले. इतरांचे सोडा हे दोघेही मुश्रीफ यांच्या डाव्या- उजव्या बाजूला बसले असले, तरी  या प्रसंगाने  त्यांच्याही मनातल्या मनात हसू फुटत होते. एक मात्र झाले त्यांनी अखेपर्यंत बोलणे टाळले. नंतर चहापानासाठी मुश्रीफ यांच्या समोरच्या दोन खुर्च्यावर दोघेजण स्थानापन्न झाले; तेव्हाही मध्ये एका खुर्चीचे अंतर राहिले. हे अंतर कधीच मिटणार नाही हेच जणू दर्शवणारी ती पोकळी ठरली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वकीयांकडूनच फडणवीसांना झटका !

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य पातळीवरील भाजपामध्ये सध्याचं सर्वात लोकप्रिय आणि प्रभावी नेतृत्व मानलं जातं. राज्यात ते कुठेही गेले तरी त्यांच्याभोवती पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा गराडा पडतोच, शिवाय, सामान्य जनतेमध्येही फडणवीस यांच्याबद्दल आकर्षण आहे. पण गेल्या आठवडय़ात ते रत्नागिरी जिल्ह्यात आले असता सामान्य जनता सोडा, पक्षाचे पदाधिकारीसुद्धा न फिरकल्याने फडणवीस यांनीच स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली. रत्नागिरी तालुक्यातील नाणीज  येथे एका खासगी कार्यक्रमासाठी फडणवीस गेल्या शनिवारी आले होते. हेलिकॉप्टरने पाली येथे उतरून ते जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या निवासस्थानी गेले आणि त्यानंतर कार्यक्रम करून मुंबईला परत गेले. पण हेलिपॅडवर किंवा सामंत यांच्या निवासस्थानी भाजपाचे स्थानिक पदाधिकारी दिसले नाहीत. विशेष म्हणजे फडणवीस यांच्या स्वागताचे बॅनरसुद्धा सामंतांकडून लावण्यात आले होते. म्हणून फडणवीसांनी चौकशी केली तेव्हा, कदाचित माझ्या घरी तुम्ही आला आहात, त्यामुळे पक्षकार्यकर्ते आले नसतील, पण नाणीज येथील कार्यक्रमाला येतील, अशी फडणवीसांची समजूत काढून सामंत यांनी भाजपा कार्यकर्त्यांची बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात नाणीजलाही कोणी फिरकले नाहीत. या सर्व प्रकाराबाबतची तीव्र नाराजी फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे आणि ज्येष्ठ मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कानावर घातली असल्याचेही समजते.

हेही वाचा >>> चावडी: वाघनखे आणि उदयनराजेंचे मौन

फडणवीस यांच्या दौऱ्याची अधिकृत पूर्वसूचना न मिळाल्याने आपण स्वागतासाठी गेलो नाही, असा खुलासा पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केला आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या सूचनेनुसार त्याच दिवशी पक्षातर्फे रत्नागिरीत आंदोलन आयोजित केलं होतं, त्यामुळे अडकून पडलो, अशीही पुस्ती या संदर्भात जोडण्यात आली. पण पक्षाच्या नेत्यांना ते फार काही पटलेलं नाही. उलट, राज्यातील प्रमुख नेत्याच्या स्वागतालादेखील पाठ फिरवल्याने प्रदेशाच्या नेत्यांकडून तीव्र नापसंती  कळवण्यात आली आहे.

रामराजे सरपंच

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट झाले. साताऱ्याच्या पक्षाच्या बालेकिल्ल्यात दोन्ही गटाच्या बैठका सुरू झाल्या. मुंबईत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसची सातारा, माढा लोकसभा आढावा बैठक झाली. त्यानंतर साताऱ्यात अजित पवार गटाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना याबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा ते म्हणाले, राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटाकडे काय चाललंय म्हणून आम्ही आमची भूमिका ठरवणार नाही. आमचा पक्ष साताऱ्यातील प्रमुख पक्ष आहे. पक्ष वाढीसाठी आम्हाला कोणाशीही कोणताही वाद घालायचा नाही. तर आमची ताकद सिद्ध करायची असल्याचे  सांगत उत्तर संपवले. भाजपा तयारीला लागला आहे, त्यांनी पण आढावा घेतला, तुमची तयारी कुठंपर्यंत झाली आहे, तुम्ही काय करणार,तुम्ही कोणती निवडणूक लढवणार सातारा की माढा असा प्रश्न पुन्हा विचारण्यात आला तेव्हा रामराजे म्हणाले, पक्षाने आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदेश दिल्यास मी कोणत्याही ग्रामपंचायतीचा सरपंच होण्यास तयार आहे, असे सांगून टाकले. विधान परिषदेचे माजी सभापती वा मंत्रीपदी राहिलेले रामराजे सरपंचपदापर्यंत खाली आल्याने पक्षात साहजिकच चर्चा सुरू झाली. (संकलन : सतीश कामत, दयानंद लिपारे, विश्वास पवार)

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chavadi political leaders conflict in maharashtra political parties crisis in maharashtra zws