संपूर्ण कुटुंबाच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागूनही उद्धव ठाकरे यांच्या गटाशी निष्ठावान राहिलेले राजापूरचे आमदार राजन साळवी यांचा गेल्या रविवारी वाढदिवस साजरा झाला. यंदाच्या या वाढदिवसाचं वैशिष्टय़ म्हणजे, आदल्या दिवसापासून शहरात अनेक ठिकाणी असे बॅनर लागले होते, – रत्नागिरीत वाघाची दमदार एन्ट्री ! आता हा वाघ अर्थात ठाकरे गटाचा, हे सांगण्याची गरज नाही. कारण कोण आला रे कोण आला.., या घोषणेचं पेटंट ठाकरे गटाकडे आहे. पण ही एन्ट्री कशासाठी? तर आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन सर्वच पक्षांनी आपापल्या संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. आमदार साळवी सध्या जरी राजापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असले तरी जुना, निष्ठावान शिवसैनिक अशी त्यांची ओळख आहे. याच पक्षातर्फे साळवी यांनी रत्नागिरीत नगरसेवक आणि नगराध्यक्षपद भूषवलं आहे. तसेच संपूर्ण जिल्ह्याचे प्रमुख म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीपासून साळवी राजापूर याच मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. या प्रदीर्घ निष्ठावान कारकीर्दीमुळेच रत्नागिरी विधानसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून साळवींच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत २००४ पासून या मतदारसंघातून सलगपणे विजयी होत आले असून त्यांची मतदारसंघावर मजबूत पकड आहे. या पार्श्वभूमीवर साळवी यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून जनमताचा कानोसा घेण्यासाठी ही बॅनरबाजी केली असल्याची चर्चा आहे. यावर मंत्री सामंत यांनी मात्र, साळवी यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, अशी कोपरखळी मारली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा