अनसरवाडा. त्या राहात असलेला परिसर तसा अभावग्रस्तच. शिक्षण, आरोग्य, रोजगार सर्वच बाबतीत नकार. त्यातच अंधश्रद्धा आणि व्यसनाधिनतेचा विळखा लोकांना छळणारा. अशा वातावरणात लोकांची आरोग्याची समस्या दूर करण्याच्या तळमळीने रात्रीबेरात्री कसलीही तमा न बाळगता लोकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या त्या आरोग्य मित्र. गेली १८ वर्षे त्या येथील लोकांना रुग्णसेवा देत असून त्यामुळे तेथील घरातच प्रसूती करण्याचे प्रमाण शून्यावर आले आहे. माता आणि बालमृत्यूचे प्रमाण आणि बालविवाहाचे प्रमाण कमी करून स्त्रियांचे सामाजिक आणि शारीरिक आरोग्य जपणाऱ्या आजच्या दुर्गा आहेत, कविता वाघे गोबाडे.

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील अनसरवाडा येथील कविता वाघे गोबाडे. शिक्षण फक्त नववी. नवरा दिव्यांग, घरात दारिद्र्य कायमचे. कुटुंबासाठी राबत असतानाच आयुष्यात घडलेल्या एका घटनेने त्यांच्या जगण्याला वेगळीच दिशा मिळाली आणि त्यांनी स्वत:ला लोकांच्या आरोग्यसेवेसाठी वाहून घेतले. आत्तापर्यंत त्यांनी ६००० च्या वर लोकांना आपली रुग्णसेवा दिली असून अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक प्रसंगातही ‘इच्छा तेथे मार्ग’ असतोच हे दाखवून दिले आहे.

प्रारंभी अनसरवाडा आणि त्यानंतर सोलापूर, लातूर, धाराशिव, जालना, हिंगोली या पाच जिल्ह्यांचे काम आणि सध्या लातूर, धाराशिव, सोलापूर या तीन जिल्ह्यांच्या प्रमुख म्हणून बालमृत्यू आणि मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या कामात त्यांनी स्वत:ला झोकून दिले असून आरोग्य क्षेत्रात त्या गेल्या १८ वर्षांपासून काम करत आहेत. आवश्यकता असेल तेव्हा रात्री-बेरात्री लोकांच्या मदतीला धावून जाणे, वेळप्रसंगी पायी प्रवास करायची तयारी, एकटीने गरजूंपर्यंत पोहोचून त्यांच्या आरोग्याच्या समस्या दूर करण्याची त्यांची तळमळ अनेकांना निश्चितच प्रेरणा देणारी आहे.

हेही वाचा >>> Loksatta Durga 2024 : आधारवड

पतीच्या अपंगत्व आणि पदरी ३ मुले त्या सर्वांची काळजी घेण्यासाठी मोलमजुरी करत कविता स्वत:च कुटुंबाच्या कर्त्याधर्त्या झाल्या. मात्र फक्त मजुरीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी घरोघरी फिरून बांगड्या भरण्या-विकण्याचे काम सुरू केले. आयुष्य सुरू होतेच, परंतु आरोग्य क्षेत्राकडे वळण्यामागे त्यांची प्रेरणा ठरली ती त्यांची आई आणि तिचा कर्करोग.

झाले असे की, २००१ मध्ये त्यांच्या आईला गर्भाशयाचा कर्करोग झाला. त्यांच्या उपचारासाठी तेव्हा डॉक्टरांनी दीड लाख रुपये खर्च सांगितला. वडील मोलमजुरी करणारे असल्याने तेवढे पैसे भरणे त्यांना शक्यच नव्हते. त्यामुळे कमी पैशांत एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया केली खरी, मात्र ती सदोष असल्याने पुढील सहा महिने त्यांना पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. आईबरोबर सतत दोन महिने राहिलेल्या कविता यांना आरोग्य क्षेत्रातील आव्हानांची कल्पना आली आणि त्यांनी तेव्हाच संधी मिळाल्यास आरोग्य क्षेत्रातच काम करण्याचे ठरवून टाकले आणि ते प्रत्यक्षात उतरवले.

अनसरवाडा या गावी ‘गोपाळ समाजा’ची वस्ती आहे. तेथे काम करणारे नरसिंग झरे हे गावातीलच असल्यामुळे कविता यांच्या चांगले परिचयाचे होते. त्यांना कविता यांनी, ‘‘मला आरोग्य क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे.’’, असे सांगितले. झरे यांनी ‘‘संभाजीनगरच्या ‘हेडगेवार रुग्णालया’त आठ दिवसांचे आरोग्य प्रशिक्षण आहे. आपण जाल का?’’ असे विचारले असता त्या प्रशिक्षणासाठी पोहोचल्याही. दर महिन्याला आठ दिवस असे सहा महिने प्रशिक्षण घेतल्यानंतर ‘भटके विमुक्त विकास परिषदे’ने त्यांना ‘आरोग्य मित्र’ म्हणून काम करण्याची संधी दिली. मनातल्या इच्छा प्रत्यक्षात उतरल्यामुळे जेथे जेथे त्यांच्या सेवेची गरज असते तेथे तेथे त्या आपली आरोग्यपेटी घेऊन पोहोचतात.

असाच एक बिकट प्रसंग. अगदी सुरुवातीच्या काळात आलेला. २००७ मध्ये गावातील गोपाळ वस्तीत फिरत असताना एका घरात अल्पवयीन मुलीच्या प्रसूतीचे प्रयत्न सुरू असून त्याला यश येत नसल्याचे सांगितले गेले. कविता ताबडतोब त्या घरी पोहोचल्या. कातर आणि ब्लेडच्या साहाय्याने सुरू असलेल्या प्रसूतीमुळे त्या मुलीची अवस्था फारच बिकट झाली होती, मात्र जातपंचांच्या भयापोटी कुटुंबीयांनी मुलगी दगावला तरी चालेल, पण आम्ही रुग्णालयात जाणार नाही, असे सांगितले. नरसिंग झरे यांना हे कळताच, त्यांनी ‘‘जातपंचायतीचा दंड मी भरेन. तुम्ही रुग्णाला रुग्णालयात पाठवा अन्यथा कविता वाघे पोलिसांत तक्रार दाखल करतील.’’ असा धमकीवजा इशाराच दिला. त्याबरोबर त्या मंडळींनी रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी दिली. निलंगा येथे उपचार होणे अशक्य होते. त्यामुळे मुलीला लातूरला न्यावे लागले. तेथेही तिला उपचार मिळण्यासाठी कवितांना संघर्ष करावा लागला. त्यावेळी या अल्पवयीन मुलीला तब्बल ८७ टाके घालावे लागले, पण बाळ व आई दोघांचेही प्राण वाचले. पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळाल्यामुळे कविता यांचा आनंद द्विगुणीत झाला. गोपाळ वस्तीतील लोकांच्या मनात या घटनेनंतर रुग्णालयात रुग्ण दाखल केल्यानंतर तो वाचतो याची खात्री पटत गेली. त्यासाठी कवितांनी गेल्या १८ वर्षांत वेगवेगळ्या वस्तीवस्तीत जाऊन केलेले प्रबोधन उपयोगी पडले. त्यातूनच आता ‘घरी प्रसूती झाली.’ असे उदाहरण जवळपास शोधूनही सापडत नाही. त्यांच्या याच प्रयत्नांमुळे या वस्तीतील ‘माता’ व ‘बालमृत्यू’चे प्रमाणही खूपच कमी झाले आहे.

त्यानंतर असे प्रसंग येतच गेले. एका भटक्या विमुक्त समाजातील वृद्धाचा पाय अपघातामुळे गुडघ्यापासून कापावा लागला होता. त्याला डॉक्टरांनी दर दोन दिवसांनी ड्रेसिंग करायला सांगितले होते. त्यासाठीचा ६०० रुपये खर्च परवडत नाही म्हणून त्यांनी आठवड्यातून एकदा ड्रेसिंग सुरू केले, साहजिकच जखम चिघळली. कविता त्यांच्या घरी पोहोचल्या आणि त्यांनी स्वत: जखमेवर मलमपट्टी केली साहजिकच एक महिन्याच्या आतच जखम पूर्णपणे भरून आली. तर दुसऱ्या एका घटनेत एका भीक मागणाऱ्या वृद्धेच्या पायात खिळा घुसून पाय सुजल्याचे त्यांना कळले. त्या या वृद्धेच्या घरी गेल्या. जखम धुवून त्यावर मलमपट्टी केली. पालावरच्या शाळेतील शिक्षिकेला पुढील काही दिवस आजींच्या पायाची जखम दररोज धुवून पट्टी करण्यास सांगितले यामुळे ती वृद्धाही लवकर बरी झाली. एकदा तर एका वस्तीवर कविता स्त्रियांची बैठक घेत असताना रिक्षात एक बाई प्रसूत झाल्याचे त्यांना कळले. त्या ताबडतोब तिथे पोहोचल्या. रिक्षातच प्रथमोपचार करून तिला दवाखान्यात पाठवले. अशा अनेक प्रसंगात त्यांनी अनेकांना वेदनेतून मुक्त केले आहे.

‘भटके विमुक्त विकास परिषदे’च्या आरोग्य मित्र म्हणून काम करताना कविता वाघे गोबाडे यांनी सुरुवातीची पाच वर्षे पूर्णपणे मोफत काम केले. त्यानंतर काही वर्षे २ हजार रुपये त्यानंतर ३ हजार रुपये आणि आता त्या फक्त ४,५०० हजार रुपये मासिक मानधनावर काम करतात. पण त्यांच्यादृष्टीने लोकांचे आरोग्य सुधारावे हेच मोलाचे आहे. एका अर्थाने ‘करुणा विस्तारण्या’चे काम त्या करत असतात. समाजासाठी रुग्णसेवेचे खडतर व्रत अंगीकारलेल्या कविता वाघे गोबाडे यांना ‘लोकसत्ता’चा सलाम!

pradeepnanandkar@gmail.com

संस्थेचे नाव भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान

पत्ता मु.पो.अनसरवाडा, तालुकानिलंगा, जिल्हालातूर

संपर्क क्रमांक ९३०७५२५३६१

ईमेल : bvvp93@gmail.com