श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे आधुनिक मराठी विनोदी साहित्यातले एक अग्रणी नाव. त्यांची विशिष्ट विनोदशैली आजही अभ्यासली जाते.
‘मु. पो. बोंबिलवाडी’सारखी वेगळ्या धर्तीची विनोदी नाटकं रंगभूमीवर सादर करणारे आणि ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘एलिझाबेथ एकादशी’सारखे संवेदनशील चित्रपट देणाऱ्या लेखक-दिग्दर्शकाचे कोल्हटकरी शैलीत वर्तमानावर टीकाटिप्पणी करणारे मासिक सदर..
माझ्यासारख्या आळशी गोळ्यालाही व्यायामशाळारूपी चाकावर आकार येऊ लागला तेव्हा लोकं चकित झाली आणि आमची ‘देशभक्त सहकारी गृहरचना संस्था मर्यादित’ अमर्याद प्रेरित झाली. आमची सोसायटी बऱ्यापैकी प्रेरित होणारी आहे. आम्ही प्रेरित झालो की लगेच प्रेरित करणाऱ्याचा पुतळा किंवा स्मारक उभारतो आणि एकदम प्रगती होऊन जाते सर्वाची. काही मित्रांनी माझा पुतळा उभारण्याची योजना आखली. माझ्या नकळत वजन उचलतानाची माझी प्रकाशचित्रे घेण्यात आली. पण त्यातील चेहरा बलसंवर्धनाचे तेज दाखवत नसून शेजारच्या तात्यांच्या मूळव्याधतेजाशी जुळणारा आहे असे मत पडल्याने तो बेत रद्द झाला. जिवंतपणीच पुतळा उभारला जाणारा पहिला मनुष्य हा माझा विश्वविक्रम त्यामुळे हुकला.
सांगत काय होतो की, आमचे सर्व सदस्य अंग घुसळू लागले, कष्ट घेऊ लागले. प्रथिने, कबरेदके, जीवनसत्त्वे इत्यादी शब्द लीलया ओष्ठद्वयातून बाहेर पडू लागले. सोसायटी सदृढ होऊ लागली. प्रत्येकजण किमान प्रभातफेरी ऊर्फ मॉर्निग वॉक चालताना दिसू लागला. ज्यांना सकाळी मॉर्निग वॉक जमत नसे ते संध्याकाळी मॉर्निग वॉक चालू लागले. एकच धुरळा उडाला देशभक्त स. गृ. सं. म. च्या जनतेत. आणि तेवढय़ात..
प्रभातफेरी ऊर्फ मॉर्निग वॉक करणाऱ्या काही माणसांना गोळ्या घालून ठार करण्यात आले! आणि आमचाही उत्साह मावळला. खूप काळ लोटला तरी मारेकरी सापडेनात तेव्हा ते मावळणे दहशतीत रूपांतरीत झाले आणि आम्ही थंडगार पडलो. इतके, की चालणे, धावणे सोडाच; ती क्रियापदे वाक्यात वापरायलाही घाबरू लागलो. पूर्वी कचेरीतही चालत जाण्याची चळवळ करणारे आम्ही- आता स्वयंपाकघरातून दिवाणखान्यात येण्यासाठीही दोन चाकांची खेळण्यातील स्कूटर वापरू लागलो. भीतीच्या आवरणाखाली चरबीच्या थरांचे आवरण माजू लागले. पण समाज खूप काळ ढोला राहिला की क्रांतिकारी होतो, हेच खरे.
अखेर काल आम्ही सर्व सभासद भीतीच्या शृंखला तोडून, कोणी पाहत नाही ना, याची खात्री करून गुपचूप सभागृहात जमलो. मारेकरी लोकांचा जहाल शब्दात निषेध करणारा ठराव पास केला आणि नव्याण्णव टक्के लढाई तिथेच जिंकली. आता फक्त मारेकरी सापडणे, गुन्हा सिद्ध होणे, शिक्षा होणे, ही अगदी किरकोळ कामे राहिली. पण आम्ही तत्काळ चर्चा करून त्यांचाही फडशा पाडला! धर्माभिमानी कार्यकर्त्यांवर झालेले आरोप आम्हाला रुचले नाहीत म्हणून त्या आरोपांचाही आम्ही निषेध केला. व्यायाम करणाऱ्यांना नि:शस्त्र असताना मारणे ही आमची संस्कृती नाही; मग तो शत्रू का असेना. अफझुलखानसुद्धा जावळीच्या खोऱ्यात मॉर्निग वॉकला जात असे. महाराजांनी त्याला एखाद्या करवंदीआड सहजी वाकवला असता व त्याच्या सैन्याला मोर्निग वॉक घडवले असते. पण नाही. त्यांनी समोरासमोर, त्याच्याच मिठीत जाऊन त्याची मृत्यूशी भेट घडवली! यावरूनच सिद्ध होते की धार्मिक लोकांनी हे कृत्य केले नाही.
हो, देश-धर्मभक्तांनी त्या मारल्या गेलेल्यांना विरोध केला होता. कोण अमान्य करत आहे? आपल्यातील काही चांगल्या प्रथा ते मोडायला निघाले होते. काही पुरोगामी कुत्सितपणे म्हणतात की, ‘भानामती, जादूटोणा, बळी अशा गोष्टीच म्हणजे तुमचा धर्म का..?’ तर आम्ही स्पष्ट करू इच्छितो की, होय, तो आमचा धर्म आहे, कुणीही त्या गोष्टी बदलू नयेत. त्या प्रत्येक गोष्टीमागे काही लोककल्याणकारी तत्त्वं आहेत. ती जरा अभ्यासा. कुणालाही ती स्पष्ट दिसतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा