एजाजहुसेन मुजावर

प्रारंभी ज्वारीचे आगार असलेला सोलापूर जिल्हा गेल्या काही वर्षांपासून फळबागांसाठी प्रसिद्धीस आला आहे. आता हाच सोलापूर जिल्हा रेशीम शेती उद्योगातही नावारुपाला येऊ लागला आहे. सोलापूरच्या या नव्या वळणवाटांविषयी…

धुनिक तंत्रज्ञान, नवनवीन प्रयोग करण्याची प्रबळ इच्छाशक्ती, व्यावसायिक ज्ञान, मेहनत, जिद्द या जोरावर सोलापूर जिल्ह्यात शेतीचे स्वरूप बदलत आहे. बहुतांशी जिरायती क्षेत्रात ज्वारी, मका, बाजरी, तूर, मूग, भुईमूग या पारंपरिक पिकांपर्यंतच मजल मारलेल्या या जिल्ह्यात उजनी धरणाची उभारणी झाल्यानंतर गेल्या चार दशकांत उसाचे क्षेत्र वाढले आणि अलीकडे साखरेचा जिल्हा म्हणून नावारूपाला आलेल्या याच सोलापूर जिल्ह्यात सांगोल्यासारख्या कमी पर्जन्यमानाच्या पट्ट्यात फळबागांच्या योजनेतून डाळिंबांच्या बागा बहरल्या. करमाळा भागात उजनी धरणाच्या जलाशय परिसरात दर्जेदार निर्यातक्षम केळीचे पीक झपाट्याने वाढले आहे. द्राक्षे, बोर, चिकू, पेरू, आंबा या फळांसह दुसरीकडे बहाद्दर शेतकऱ्यांनी चक्क सफरचंदापासून ते खजूर, पिस्ता, काजू, सुपारी यासारख्या बागांचे यशस्वी प्रयोग केले आहेत. किंबहुना जणू काश्मीर आणि कोकणचे लघुदर्शन घडविले आहे. तसे पाहता या भागात रेशीम शेती उद्याोग नवीन नाही. मर्यादित का होईना, रेशीमची शेती केली जाते. परंतु आता शेतीचे उत्तम शिक्षण व प्रशिक्षण घेतलेल्या काही तरुणांनी नव्याने अभ्यास करून आधुनिक पद्धतीने रेशीम शेतीला वाहून घेतले आहे. मोहोळ तालुक्यातील कुरूल येथील सदाशिव कांबळे आणि विजय कांबळे या काका-पुतण्यांनी रेशीम शेतीमध्ये मारलेली मजल स्वागतार्ह वाटते.

सदाशिव आणि विजय कांबळे यांचा वंश परंपरागत शेती व्यवसाय आहे. पाच एकर शेतात विहीर आणि विंधन विहिरीच्या माध्यमातून उपलब्ध मुबलक पाण्यावर यापूर्वी उसाची शेती करायचे. परंतु ऊस देखील आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्यामुळे पाच वर्षांपूर्वी कांबळे कुटुंबीयांनी शेतीपूरक रेशीम उत्पादन करण्याचा विचारपूर्वक निर्णय घेतला. मोहोळ व आसपासच्या तालुक्यांमध्ये काही शेतकरी तुतीची लागवड करून यशस्वीपणे रेशीम उत्पादन घेत असल्याचे पाहायला मिळाले. रेशीम उत्पादनाचा चांगला अनुभव असलेले कांबळे यांचे जवळचे नातेवाईक धनंजय साळुंखे (उपरी, ता. पंढरपूर) यांनी ह्य व्हीएम ह्य जातीची तुती उपलब्ध करून दिली. या जातीच्या तुतीचा पाला सहसा सुकत नाही आणि तो आकाराने मोठा असतो. रेशीम उद्याोगाचा चांगला अनुभव असलेले सौदागर पांडव (पीर टाकळी, ता. मोहोळ) यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले. यातच भर म्हणून कुटुंबातील विजय कांबळे याने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात जाऊन बीएससी (शेती) पदवी शिक्षण घेतले आणि काही पिकांच्या प्रकल्पासाठी पूरक प्रशिक्षणही घेतले. कुरूलमध्ये परतल्यानंतर त्याने बौद्धिक कौशल्य आणि सकारात्मक इच्छाशक्तीच्या आधारे दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुटपालन व्यवसायाच्या धर्तीवर शेतीपूरक रेशीम उद्याोगाचा बारकाईने अभ्यास केला. तो फलदायी ठरला. देशात सर्वाधिक रेशीम उत्पादन शेजारच्या कर्नाटकात होते. त्यामुळे कर्नाटकात जाऊन त्याने रेशीम शेतीचा व्यापक अभ्यास केला. बाजारपेठांचीही माहिती घेतली. रेशीम उत्पादनाला मिळणारा भाव, शासनाचे पोषक धोरण लाभदायक होते. यात महत्त्वाची बाब म्हणजे रेशीम उद्याोगासाठी होणारा उत्पादन खर्च तुलनेने कमीच असतो. मजुरांवर अवलंबून न राहता घरच्या लहानमोठ्या मंडळींनी शेतात राहून थोडी मेहनत घेतली तर रेशीम शेती यशस्वी होते. पर्यायाने दरमहा पुरेसा पगार मिळाल्यागत उत्पन्न हाती येते. १५ वर्षांपर्यंत रेशीम उत्पादनातून आर्थिक विवंचना सतावत नाही.

रेशीम उद्याोग करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विजय कांबळे आणि सदाशिव कांबळे यांनी त्या अनुषंगाने नियोजन हाती घेतले. तीन एकर क्षेत्रात तुतीची लागवड केली. घरात पुरेसे आर्थिक भांडवल नव्हते. काही रक्कम उधारीने घेतली तर काही रक्कम बचत गटातून कर्जाच्या माध्यमातून उपलब्ध केली. पाच लाख रुपयांच्या भांडवलातून त्याने रेशीम शेतीचा श्रीगणेशा केला. या शेतीसाठी शासनाकडूनही जवळपास साडेतीन ते चार लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळते.

सदाशिव कांबळे यांनी डोळस दृष्टी ठेवून कर्नाटकातील अथनी येथून रेशीम अळ्यांचे १०० अंडपुंज मागविले. एका अंडपुंजामध्ये ४०० ते ५०० रेशीम अळ्या असतात. सुमारे चार हजार रुपये किंमतीच्या शंभर अंडपुंजांच्या माध्यमातून ४५ हजार ते ५० हजार अळ्या आणल्या. रेशीम अळ्यांचे एकूण आयुष्यमान २८ दिवसांचे असते. यातील २४ दिवस त्यांना तुतीचा पाला खाद्या म्हणून द्यावा लागतो. अवघ्या १४ दिवसांनी रेशीम कोश तयार होतो. रेशीम उद्याोगासाठी तुतीची लागवड पट्टा पद्धतीने अर्थात ६ बाय २ फूट अंतराने करताना त्यात ऊन, वारा खालपर्यंत जाईल, याची दक्षता कांबळे यांनी घेतली आहे. पट्टा पद्धतीने तुती लागवड करताना दोन तुतींमधील अंतर चांगले असेल तर रेशीम उत्पादनही चांगले होते. अंतर कमी असल्यास वारा, ऊन तुतीच्या खालपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे रेशीम अळी मोठी होताना कोशावर जाताना धागा बाहेर काढण्याची शक्यता कमी असते. त्याची काळजी विजय कांबळे यांनी घेतली आहे. शेतात रेशीम उत्पादनासाठी उभारलेला शेड, त्यातील जाळ्या शास्त्रीय पद्धतीच्या आहेत.

रेशीम उद्याोगासाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी लागते. कांबळे यांची जमीन पोषक आहे. पूर्वी ऊस शेती करताना एक एकर क्षेत्रात लागणाऱ्या पाण्यावर आता तीन एकर तुतीची शेती जोपासता येते. एकदा लागवड केलेली तुती १५ वर्षांपर्यंत जिवंत राहते. त्यामुळे दरवर्षी पुन:पुन्हा लागवड करावी लागत नाही. इतर पिकांप्रमाणे वारंवार करावा लागणारा लागवडीचा खर्च होत नाही. साधारणपणे उन्हाळ्यात एप्रिल-मे महिन्यात पाणी मिळाले नाही तरी तुती सहसा सुकत वा मरत नाही. पाणी मिळाल्यानंतर तुती पुन्हा जोमाने वाढते. त्यामुळे आठमाही पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यांना देखील रेशीम व्यवसाय चांगल्या प्रकारे करता येते. कांबळे यांच्यात शेतात गेल्या चार वर्षांत दर महिना-सव्वा महिन्यात ३०० किलोपर्यंत रेशीम उत्पादन होते. त्याची विक्री व्यवस्था कांबळे यांना चांगल्या प्रकारे अवगत झाली आहे. ३० ते ४० दिवसांत हे उत्पादित रेशीम कर्नाटकात रामपूर येथील बाजारपेठेत विक्रीसाठी नेले जाते. प्रतिकिलोस ४०० ते ४५० रुपये भाव पदरात पडतो. कर्नाटकात उत्पादित रेशीम नेण्यासाठी वाहतूक खर्च परवडण्याच्या अनुषंगाने मोहोळ परिसरातील १८ ते २० रेशीम उत्पादक शेतकरी एकत्रपणे मिळून सुमारे एक टनापेक्षा जास्त रेशीम कर्नाटकात पाठवतात. या माध्यमातून वाहतुकीसह इतर खर्च वजा करून दरमहा एक लाखापर्यंत उत्पन्न मिळते. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कांबळे यांच्या शेताला भेट देऊन त्यांच्या रेशीम उद्याोगाची पाहणी केली आहे. एकूणच, जीवनात आर्थिक ऊर्जितावस्था मिळत असल्याचे कांबळे कुटुंबीयांना समाधान वाटते.

अन्य फायदे

● रेशीम अळ्यांची विष्ठा दुभत्या जनावरांना सुग्रासप्रमाणे खाद्या म्हणून वापरता येते. त्यामुळे दूध उत्पादन वाढू शकते.

● तुतीचा वाळलेला पाला आणि रेशीम अळ्यांची विष्ठेचा गोबर गॅससाठी उपयोग करून इंधन म्हणून वापर होऊ शकतो.

● तुती पाल्यामध्ये जीवनसत्व आढळते. त्यामुळे तुतीचा पाला आणि रेशीम कोश आयुर्वेद औषधासाठी वापरता येतो.

● विदेशात तुतीच्या पाल्याचा उपयोग चहा (मलबेरी टी) बनविण्यासाठी केला जातो.

● तुती लागवड आणि रेशीम उत्पादनाला शासनाकडून नेहमीच प्रोत्साहन मिळते.