कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेण्टी-२० अशा सर्वच प्रकारच्या क्रिकेट सामन्यांत सातत्यपूर्ण खेळ करून गोलंदाजांच्या काळजात धडकी भरविणारा भरवशाचा फलंदाज म्हणून सध्या विराट कोहली याने आपला चांगला जम बसविला आहे. सध्या तो भारतीय क्रिकेट संघाचा अविभाज्य घटक असला तरी भारतीय संघात प्रथमच निवड झाल्यानंतर पाहिलेले वैभव आणि त्या वेळी कर्णधार महेंद्रसिंग धोणी याच्यासमवेत सुरुवातीला संभाषण करताना उडणारी तारांबळ कोहली विसरलेला नाही. म्हणूनच आत्मविश्वास आणि घमेंड यांच्यात योग्य संतुलन साधणे कठीण असल्याचे विराट कोहली याने नम्रपणे सांगितले. रीड अॅण्ड टेलर आणि ऑलिव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्लीतील कुतुब येथे ‘एक्स्प्रेस अड्डा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. एक्स्प्रेस वृत्तसमूहाचे मुख्य संपादक शेखर गुप्ता आणि ‘दी इंडियन एक्स्प्रेस’चे राष्ट्रीय क्रीडा संपादक संदीप द्विवेदी यांनी विराट कोहली याला बोलते केले. या वेळी कोहली यानेही कसलेल्या फलंदाजाप्रमाणे मैदानाबाहेरही अत्यंत मोकळेपणे प्रश्नांना उत्तरे दिली आणि येथेही आपला खेळ नैसर्गिकच असल्याचे दाखवून दिले. तथापि, गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फलंदाजीला जाताना आपण स्मशानवाटेकडे जात असल्याची भावना मनात होती, अशी प्रांजळ कबुली देण्यासही विराट कोहली कचरला नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा