मुंबईच्या कॉलेजेसमध्ये ऑगस्ट महिन्यापासून फेस्टिवल फिवर सुरू होतो. त्यातल्या काही मोठय़ा फेस्टिवल्सविषयी.

कॉलेज फेस्टिवल्स म्हणजे धमाल, कलागुणांना वाव देणारं व्यासपीठ. यातून खूप शिकायला मिळतं. पण आजकाल या कॉलेज फेस्टिवलमध्येही कल्चरल कॉन्फिक्ट जाणवतं. ठराविक कॉलेजचीच मक्तेदारी दिसते. खरंतर हे फेस्टिवल्स मुलांनी मुलांसाठी आयोजित केलेले असतात. त्यामुळे यात प्रत्येकाला समान संधी मिळावी असा प्रयत्न आणि नकळतपणे ती जबाबदारी या आयोजक मुलांवर असते. आणि ती ते निभवायचा प्रयत्नही करतात. पण कॉलेज- कॉलेजमधल्या भिंती या अशा फेस्टिवलमधून पुढे येतात.  मोठय़ा कॉलेजेसच्या स्पर्धाची माहिती छोटय़ा कॉलेजपर्यंतल पोचतच नाही. दादरच्या महाराष्ट्र कॉलेजच्या मुलींच्या म्हणण्यानुसार, मुळात अश्या फेस्टिवल्सची माहितीच त्यांच्यापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे कला असूनही ती लोकांपुढे येत नाही. तसंच के. जे. सोमय्याच्या एका विद्यार्थिनीच्या म्हणण्यानुसार, अशा फेस्टिवल्सना मध्यम वर्गातील मुलं आणि श्रीमंत मुलं अशी विभागणी झालेली दिसते. त्यामुळे ही श्रीमंत मुलं आपल्याला समावून घेतील की नाही, इंग्लिश हा आपल्यात आणि त्यांच्यात अडसर तर होणार नाही ना या भीतीमुळे त्या फेस्टिवल्समध्ये भाग घ्यायला घाबरतात. तर दुसरीकडे काही कॉलेजेसची तऱ्हाच निराळी आहे आपण बरे णि आपलं कॉलेज बरं या मानसिकतेने काही कॉलेजेस या फेस्टिवल्सकडे फिरकतच नाहीत.
हे कॉलेज फेस्टिवल्सचं वारं मुंबईपासून थोड्या अंतरावर असलेल्या काही कॉलेजपर्यंत पोहचलेलं दिसत नाही. यासंदर्भात कल्याणच्या के.एम.अग्रवाल कॉलेजचे विद्यार्थी म्हणाले,आम्ही या नामांकित फेस्टिवल्सविषयी खूप ऐकून असलो तरी बऱ्याचदा इथपर्यंत अशा फेस्टिवल्सची नोटीस पोहचतच नाही. त्यामुळे इच्छा असूनही आम्हाला पार्टीसिपेट करता येत नाही. मुंबईमधील कॉलेजेस आणि सबअर्बनमधील कॉलेजेस यामध्ये ठराविक कॉलेजेसच चांगली अशाप्रकारचं ग्रुपिझम फेस्टीवल्सच्या दरम्यान होतं. आपल्या कॉलेजच्या मुलांपर्यंत या फेस्टिवल्सची नोटीस कशी पोचेल यासाठी इथल्या कॉलेजने अपडेट राहणं गरजेचं आहे.
डोंबिवलीच्या पेंढारकर कॉलेजचे विद्यार्थी यावेळेस म्हणाले की. मुंबईच्या कॉलेज फेस्ट मधील खटकणारी एक गोष्ट म्हणजे त्या कॉलेजच्या मुलांच्या डोक्यातील ‘स्मार्टनेस’च्या कल्पना वेगळ्या आहेत आणि म्हणूनच त्यांना वाटतं सबअर्बन एरिआतील कॉलेजमध्ये काहीच दम नाही. मुंबईच्या कॉलेजेसचा फेस्टिवल फिवर जाणून घेतांना मुंबईबाहेरील जळगाव येथील मुळजी जेठा कॉलेजच्या ऋतुजा जोशी या माजी विद्याíथनीने मुंबईतील फेस्टिवल्सची एक वेगळीच आठवण सांगितली. ती म्हणाली, ‘या बड्या फेस्टची क्रेझ प्रत्येकालाच असते.आमच्या कॉलेजनेही अशाच एका बड्या स्पध्रेत पहिलं पारितोषिक मिळवलेल; पण त्यावेळेस मुंबईतील मुलांनी त्याचा खूप इश्यू केला. कारण त्यांच्या मते मुंबई पुण्याशिवाय पहिलं प्राइज कोणीच मिळू शकत नाही आणि जळगाव सारख्या ठिकाणच कॉलेज तर नाहीच नाही.’

मल्हार – जरा हट के
सेंट झेविअर्सचा मल्हार फेस्टिवल सध्या मुंबईत सुरू आहे. जरा हट के ही यंदाच्या मल्हारची थीम आहे. झेविअर्सला मिळालेली ’मल्हार’ची परंपरा संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. आय.आय.टी. नंतर दुसऱ्या क्रमांकाचा विद्यार्थ्यांनी स्वत: उभारलेला हा उत्सव आहे. त्यामुळे त्याचा पसारा सुद्धा तितकाच अवाढव्य आहे. या पसाऱ्यात मिसळून जाणे, ही काही प्रमाणात सहजक्रियाच आहे. अनुभवी व्यक्तींकडून शिकत शिकत, स्वत:च्या कल्पनांची भर घालत, कॉलेजचे जुनिअर्स मल्हारचाच एक भाग होतात.  कुठे-कुठे जावे नि काय करावे हा प्रश्न सर्वच उगवत्या मंडळीना पडतो कारण प्रत्येक गोष्ट त्यांना तेवढीच आकर्षति करत असते. स्पॉन्सरशिप, पीआर, हॉस्पिटॅलिटी, बॅकस्टेज अशी वेगवेगळी डिपार्टमेंट इथली मुलंच सांभाळतात.

युथ फेस्टिवल :
मुंबई विद्यापीठाचा युथ फेस्टिवल ४ ऑगस्टपासून सुरू झाला आहे. तो २५ सप्टेंबपर्यंत सुरू आहे. युथ फेस्टिवलचे हे ४६ वे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील साहित्य, कला, संगीत आणि नृत्य यांच्या विविध स्पर्धा राबविण्यात येतील.
उमंग :
एन. एम. कॉलेज तर्फे गेले १३ वर्ष ‘उमंग’ फेस्टिवल आयोजित करत आहे. सध्या या फेस्टीवलचे वारे प्रत्येक कॉलेजेसमधून जोरदार वाहतायत. उमंगची धूम १७ ऑगस्ट पर्यंत कॉलेजियन्सना अनुभवता येणार आहे. फेस्टीवलची ह्या वर्षांची थीम आहे- वन लाईफ टू लिव्ह

एनिग्मा :
आर. ए. पोदार कॉलेज अंतर्गत आयोजित केला जाणारा एनिग्मा या वर्षी ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. एनिग्मा सोबतच कॉलेजचे इतर दोन फेस्टिवल्स- तरंग आणि क्विझर्स अरेना हे देखील राबविले जाणार आहेत. या व्यतिरिक्त डान्स, म्युझिक, ड्रामा, फाईन  आर्टस, फिल्म फेस्ट, मॅनेजमेंट आणि ल्रिटेचर यांसारखे इव्हेंट्स  कॉलेजियन्सना अनुभवायला मिळणार आहेत. यंदाची एनिग्माची थीम आहे- टाईम मशीन

मल्हार ऑर्गनाईझ करताना..
मल्हारच्या ऑर्गनायझिंग टीमचा भाग होणं ही खरंच मोठी संधी होती. आम्ही सगळेच विद्यार्थी हा फेस्टिवल म्हणजे घरचं कार्य असल्याच्या थाटात त्यासाठी काम करत असतो. या फेस्टिवलमध्ये जवळपास ३० हजार विद्यार्थी सहभागी होतात. एवढय़ा मोठय़ा फेस्टचा एक भाग असणं हीच खूप अभिमानाची गोष्ट आहे. आमची खरी कसोटी स्पॉन्सरशीप आणण्यापासून ते नामवंत परीक्षक मिळवण्याच्या प्रत्येक कामात असते. वेगवेगळ्या कॉलेजेसना आमंत्रित करणं, सगळ अरेंज करणं, पाहुण्यांना खुश ठेवणं, प्रत्येक उपाक्रमाची मांडणी कारणं..काय करू नि काय नको, या संभ्रमात पडायची वेळ येते. लाऊडस्पिकर्स वगळता बाकी प्रत्येक गोष्टीची काळजी स्वत: मल्हार टीम घेते.
मी पब्लिक रिलेशन डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे पत्रकारांच्या संपर्कात येणं, त्यांना मल्हारची माहिती देणं, रेडिओवर बातमी देणं, इतर कॉलेजमध्ये जाऊन  निमंत्रण देणं असा बरंच काही मी अनुभवलं. हे सगळा तसं नवीन होता; पण ‘जरा हटके’च वाटलं. मल्हारमुळे मला अनेक नवे मित्र- मैत्रिणी जोडता आले. मल्हारने मला खूप शिकवलं आणि अजूनही शिकवतंय. खरं तर सकाळचे वर्ग संपल्यावर मल्हारच्या वर्गात माझं वेगळंच शिक्षण सुरु होतं. मोकळेपणाने बोलण्याचं, मनापासून काम करण्याचं, लोकांना त्यात सामावून घेण्याचं शिक्षण..याच्यासोबत मल्हारच्या अनुभवांचं आणि आठवणींचं गाठोडं वाढतच जाणारं आहे.

श्रुती वारियर  सेंट झेविअर्स कॉलेज