पावसाळा आला की वातावरण अगदी प्रसन्न होतं, कारण हवेत गारवा जाणवतो. शरीराचा दाह कमी होतो. आवडीचे तळलेले, चमचमीत पदार्थ खावेसे वाटतात. आणि या सगळ्याचा परिणाम आपल्या त्वचेवरही होतो. त्यामुळे पावसाळ्यात आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य टिकवण्यासाठी काय काळजी घेता येईल, याची माहिती जाणून घेऊया…

पावसाळ्यात चेहऱ्यावर जाणवणारी सगळ्यात सर्वसामान्य समस्या म्हणजे त्वचेवरचा तेलकटपणा. पावसाळ्यात वातावरण दमट झाल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर देखील तेल साचू लागतं. म्हणजे आपली स्किन अधिकच ऑइली होते. स्किन ऑइली होऊ लागली की आपोआप चेहरा चिकट होतो. चेहऱ्यावर जाणवणारी चिपचिप आपल्या मनाची चिडचिड वाढवत राहते. ऑइली वा तेलकट त्वचेची ही समस्या निस्तरण्याबरोबरच काही गोष्टी स्किन केअर रुटीन म्हणून आपण सहज करू शकतो.

त्वचेची काळजी घेण्याआधी स्वत:चा स्किन टाइप माहिती करून घेणं गरजेचं आहे. इतर जे प्रॉडक्ट्स वापरतात, तेच आपल्या स्किनला देखील सूट होतीलच असं नाही. आपली त्वचा कोणत्या प्रकारची आहे हे माहिती झालं की मग तिची काळजी घेण्यासाठी आपल्याला कोणते प्रॉडक्ट्स वापरणं गरजेचं आहे हे लक्षात येतं आणि त्याचा फायदा देखील होतो. स्किन केअरसाठी एक बेसिक रुटीन हे प्रत्येकाने फॉलो करायलाच हवं. ज्यामुळे स्किन फ्रेश आणि हायड्रेट राहील, असं स्किन स्पेशलिस्ट ललिता साळके सांगतात. आपला स्किन टाइप ओळखण्याची योग्य आणि सोपी पद्धत आहे. एका टिश्यू पेपरने चेहरा पुसा. टिश्यू पेपरवर जर तेल जाणवलं तर स्किन ऑइली आहे असं समजावं. अजिबात तेल नसेल तर स्किन टाइप ड्राय आहे. बऱ्याचदा असं होतं की नाक आणि कपाळाच्या भागावरच फक्त तेलकटपणा असतो आणि बाकी त्वचा कोरडी असते, याला कॉम्बिनेशन स्किन टाइप म्हटलं जातं. या पद्धतीने सहज आपल्याला आपला स्किन टाइप समजतो. आपल्या स्किन टाइपनुसार स्किन केअर रुटीनमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी करता येतील…

योग्य फेसवॉश

दिवसातून दोनदा तरी फेसवॉश करणं गरजेचं आहे. त्यासाठी विशेषत: तुळस, ग्रीन टी यांचा समावेश असलेला फेसवॉश निवडा, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरील तेलकटपणा निघून जाण्यासाठी मदत होईल.

टोनरचा वापर

फेसवॉशनंतर टोनर महत्त्वाचा असतो, त्यासाठी तुम्ही गुलाब पाण्याचा वापर करू शकता.

मॉश्च्युरायझर हवंच

बऱ्याचदा पावसाळ्यात दमट वातावरण असल्यामुळे चेहरा तेलकट असतो. आणि त्यामुळे अनेकजण मॉश्च्युरायझर लावणं टाळतात, पण त्यामुळे त्वचेची पीएच लेव्हल बॅलन्स राहत नाही. आणि मग पिंपल्स येतात. म्हणूनच वातावरण दमट असलं तरी मॉश्च्युराझर लावायलाच हवं.

सनस्क्रीन टाळू नका

पावसाळ्यात सूर्याप्रकाश कमी असतो, त्यामुळे सनस्क्रीन क्रीमची काय गरज? असा प्रश्न प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीला पडतो. परंतु सूर्याची युव्ही किरणे ही पडतच असतात. म्हणून पावसाळा असो वा हिवाळा आपण आपल्या चेहऱ्यावर सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे.

स्किनसाठी अशा पद्धतीने मॉर्निंग रुटीन पाळून आपण आपल्या चेहऱ्याचं उत्तमरित्या संरक्षण करू शकतो. रात्रीसुद्धा झोपण्यापूर्वी न चुकता चेहरा स्वच्छ धुणं, त्यावर मॉश्च्युरायझर लावणं या गोष्टी काटेकोरपणे पाळायला हव्यात. दिवसभर आपल्या चेहऱ्यावर धुळीचे कण चिकटतात, आपले हातही सतत चेहऱ्याला लागत असतात, त्यामुळे चेहऱ्याची त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वीही चेहरा स्वच्छ धुवायला हवा. या रुटीनबरोबरच खास त्वचेच्या निरोगीपणासाठी काही गोष्टी करता येतील.

गरम पाण्याची वाफ

आठवड्यातून किमान एकदा तरी गरम पाण्याची वाफ चेहऱ्याला द्यावी. किमान ५ ते ८ मिनिटं वाफ घेतल्याने चेहऱ्यावर असलेली छिद्रं मोकळी होतात आणि त्यात जमा झालेली घाण बाहेर पडण्यासाठी मदत होते.

आठवड्यातून एकदा तरी फेसमास्क वापरा

आठवड्यातून एकदा तरी फेसमास्कचा वापर करायला हवा. फेसमास्क निवडताना हायड्रेशनचा विचार न करता चेहरा क्लीन करणारा, ऑइल कमी करणाऱ्या फेसमास्कला प्राधान्य दया. फेसमास्क बाहेरूनच आणायला हवा असं नाही, घरच्या घरीही काही फेसमास्क तयार करता येतील. चण्याचं पीठ, लिंबू, हळद, पाणी वापरून घरच्या घरी फेसमास्क तयार करता येईल. मुलतानी माती गुलाबपाणी किंवा हळद मध एकत्र करून फेसमास्क तयार करता येतो. या फेसमास्कपैकी कोणताही एक मास्क आठवड्यातून कमीत कमी एकदा वापरल्याने चेहरा तुकतुकीत राहण्यासाठी नक्की मदत होईल. अशा प्रकारे वेळोवेळी चेहऱ्यावरचा तेलकटपणा कमी केल्यास पुरळ, पिंपल्स येण्याचं प्रमाण कमी होईल.

त्वचेसाठी पावडर वापरा

दमट वातावरणामुळे फंगल इन्फेक्शन होण्याचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे बुरशीजन्य आजार उद्भवतात. म्हणूनच चांगली पावडर आपल्या काखेत, जांगेत नियमित लावा.

योग्य आहार घ्या

पावसाळ्यात तळलेले पदार्थ, तिखट पदार्थ खाण्याचा मोह होतो, मात्र असे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्याने अॅसिडिटी, पोटाचे आजार उद्भवतात. पोट साफ नसेल तर त्वचेचे वरचेवर त्रास होऊ लागतात. त्यामुळे पिंपल्स येण्याचं प्रमाण वाढतं. म्हणूनच संतुलित आहार घ्या.

स्किन सिरम

सध्या मार्केटमध्ये सिरमबद्दल खूप चर्चा होतेय, पण स्किन सिरमचा वापर करण्यापूर्वी तुम्हाला ते नक्की कशासाठी वापरायचं आहे हे कळणं गरजेचं आहे. स्किन हायड्रेशनसाठी, पिंपल्स घालवण्यासाठी, पिंपल्स गेल्यावर जे स्पॉट्स राहतात ते घालवण्यासाठी… नेमक्या कोणत्या कारणासाठी आपल्याला सिरम वापरायचं आहे हे लक्षात घेऊन त्यानुसार सिरमची निवड करावी लागते. पण सिरम न वापरताही चांगला फेसवॉश, मॉश्च्युरायझर, सनस्क्रीन हे रुटीन तुम्ही सांभाळलं तरी निरोगी, तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी ते पुरेसं ठरतं, असं ललिता यांनी सांगितलं.

त्वचेची काळजी घेण्यासाठी आवश्यक प्रॉडक्ट्स वापरायला हवेत, त्याचबरोबर आवश्यक पोषणमूल्यं शरीराला मिळायला हवीत, असे स्किन स्पेशालिस्ट लीना शहा सांगतात. योग्य पोषणमूल्य मिळवण्यासाठी सकस, चौरस आहार घेणं गरजेचं आहे. आहारात व्हिटॅमिन्स, प्रोटिन्स, फायबर या सगळ्या गोष्टी योग्य प्रमाणात असायला हव्यात. आणि तरीही त्वचा रुक्षच आहे, ऑइली आहे किंवा पिंपल्स अधिक असतील तर डॉक्टरांचा नक्की सल्ला घ्यावा. आणि आवश्यक ट्रीटमेंट घ्यावी. कारण मुळात काय कमी आहे हे समजून घेऊन ट्रीटमेंट घेतल्याने लवकर आणि चांगला फरक पडतो, असं शहा यांनी स्पष्ट केलं.

इतर कोणत्याही ऋतुपेक्षा पावसाळ्यात त्वचेच्या समस्या अधिक जाणवतात. त्यासाठी त्या समस्या ओळखून बेसिक स्किन रुटीन आखलं तर त्वचा निरोगी, तजेलदार ठेवण्यासाठी मदत होईल. पाऊसधारा अंगावर घेत त्याची मजा लुटायची, गरमागरम वडे-भजींचा आस्वादही घ्यायचा. पण, या आनंदाला स्किन केअर आणि योग्य आहाराची जोड दिली तर दिसते मी भारी…ही फीलिंग जपणंही सहजसोपं आहे.

viva@expressindia.com