भटकंतीदरम्यान होणाऱ्या दुर्दैवी अपघातानंतर करण्यात येणाऱ्या थरारक आणि अंगावर रोमांच उभ्या करणाऱ्या बचाव मोहिमा म्हणजे ‘सर्च अॅण्ड रेस्क्यू ऑपरेशन’ची कहाणी खास सफरनामाच्या वाचकांसाठी!

काही दिवसांपूर्वी भुशी धरण परिसरातील धबधब्यावर जलजल्लोश करताना त्या भटक्यांना अजिबात कल्पनाही नसेल, की इतकं मायाळू वाटणारं पाणी क्रूर होऊन आपल्यावर झडप घालणार आहे. पाण्याचा अंदाज सहजासहजी नाही लागत. ते फोटोजच्या माध्यमातून आठवणी टिपत होते, व्हिडीओ शूट करण्यात आनंदमग्न होते, पण ते करताना पाण्याने आपलं रौद्र रूप धारण केलं. आत्ता आत्तापर्यंत लडिवाळ स्पर्श करत पायाला बिलगणारं पाणी विळखा होऊन घट्ट आवळू लागलं. त्यापुढे काय झालं आणि ते कसे वाहून गेले, हे समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या दृश्यफितींमधून एव्हाना लाखो जणांनी पाहिलं आहे. जे झालं ते भयानक होतं. ही दृश्यफीत प्रसारित झाली, तेव्हा ती पाहून मन विषण्ण झालं. आजूबाजूला असलेल्यांना त्यांना वाचवायची इच्छा असूनही पाण्याच्या प्रचंड प्रवाहापुढे त्यांचंही काही चाललं नाही. ही हतबलता अधिक उद्विग्न करणारी आहे. ही घटना आणि ताम्हिणीमध्ये पोहायला उडी मारलेला तरुण वाहून गेल्याची घटना… या दोन्ही लागोपाठच घडल्या. अशा घटना पावसाळी पर्यटनाला गालबोट लावणाऱ्या ठरतात.

भटकंतीदरम्यान अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस का वाढतं आहे? या प्रश्नाचं उत्तर शोधताना काही मुद्दे समोर आले. त्यापैकी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भटकंतीला जाताना जे नवखे पर्यटक असतात ते समाजमाध्यमांवरील एखादे रील्स किंवा इतर कोणी तरी टाकलेली माहिती सोबत घेऊन अनोळखी ठिकाणी भटकंतीला त्यांच्या मोबाइलच्या आधारावर जात असतात. त्यामुळे मोबाइलची रेंज गेली की त्यांच्याजवळचा माहितीचा आधार संपून जातो. आणि मग अचानक आलेल्या संकटांना सामोरे जाताना पॅनिक होऊन अपघात होतात. दुसरा मुद्दा म्हणजे सध्या ट्रेकिंगचं रूपांतर पिकनिकमध्ये होऊ लागलं आहे. ट्रेकिंगचं पूर्ण ज्ञान असलेल्या ट्रेकर्ससोबत ट्रेकिंगला न जाता अतिशय घरगुती स्वरूपाच्या साध्या ट्रॅव्हल कंपनीसोबत ट्रेकिंगच्या नावाखाली पिकनिक आयोजित केली जाते आहे आणि अशाच ठिकाणी अपघात होतात. पावसाळ्यात डोंगरउतारावरील किंवा घळीतून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहातून लहान-मोठे दगड खाली येत असतात. अशा वाटेवरून चालत असताना काळजी घ्यावी. तसेच पावसाळ्यात शक्यतो प्रस्तरारोहणाचा समावेश असणारी डोंगरवाट निवडू नये. ओल्या प्रस्तरांवर आपली पकड ढिली पडते आणि अपघाताला आमंत्रण मिळतं.

हेही वाचा >>> ‘तेरी मेरी यारी

भटकंतीतील शोध आणि बचावकार्य नेमकं घडतं कसं? याबद्दलची माहिती सांगताना ‘महाराष्ट्र माऊंटेनरिंग रेस्क्यू को ऑर्डिनेटर सेंटर’चे समन्वयक दयानंद कोळी म्हणाले, ‘संपूर्ण सह्याद्रीमध्ये काम करणाऱ्या सर्व रेस्क्यू टीम या विनामोबदला स्वत:चा जीव धोक्यात घालून हे सेवाकार्य म्हणून करतात. एखाद्या ठिकाणी मग तो माऊंटन रेस्क्यू असो किंवा वॉटर रेस्क्यू असो… ज्या वेळेला अपघात होतो त्या वेळी एक तर त्या अपघातग्रस्त व्यक्तीच्या नातेवाईकांचा, मित्रमंडळींचा किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंट पोलीस स्टेशन यांचा फोन रेस्क्यू टीमला बचाव कार्यासाठी येतो. अशा प्रकारचा फोन आल्यानंतर संबंधित संस्था सर्वप्रथम त्या नातेवाईक किंवा मित्रमंडळींना लोकल पोलीस स्टेशनला फोन करून आम्हाला मदतीसाठी पाचारण केलं आहे असं सांगायला सांगते. पोलीस स्टेशनमधून तेथील अधिकाऱ्यांचा जोपर्यंत फोन येत नाही तोपर्यंत आम्ही मदतीला निघत नाही, कारण या कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यावरच रेस्क्यूसाठी जाण्यास परवानगी आहे.’

रेस्क्यू किंवा रिकव्हरी टीम ही चार विभागांत विभागलेली असते, असं ते सांगतात. ‘पहिली फर्स्ट रिस्पाँडर मेन टीम, दुसरी बॅकअप टीम, तिसरी सपोर्ट टीम (ही टीम पहिल्या दोन्ही टीमला आवश्यक असलेले टेक्निकल इक्विपमेंट्स, मेडिकलचे साहित्य, फूड हे सगळं पुरवण्याची व्यवस्था करत असते) आणि चौथी कम्युनिकेशनची टीम. ही टीम कॉल आल्यानंतर ते तुमचं संपूर्ण ऑपरेशन संपेपर्यंतच्या कायदेशीर बाबी पाहते. त्याचबरोबर ट्रान्सपोर्टेशनची अॅडिशनल व्यवस्था करण्याची वेळ आली तर ही कम्युनिकेशन टीम त्याचीही व्यवस्था करते.

सपोर्ट टीम आणि कम्युनिकेशन टीम यामधील लोकांना टेक्निकल नॉलेज थोडे कमी असले तरी ते या बचावकार्यामध्ये मदत करतात, अशी माहिती देतानाच अशा प्रकारच्या या बचावकार्यासाठी लागणाऱ्या इक्विपमेंट्सपासून सगळा खर्च रेस्क्यू संस्था स्वत:च करतात, असंही दयानंद यांनी स्पष्ट केलं.

रेस्क्यू टीममध्ये सहभागी होण्यासाठी काय नियम असतात याविषयी मार्गदर्शन करताना, लोणावळा येथील रॉक क्लाइम्बर व रेस्क्यू टीम मेंबर गणेश गिध सांगतो, ‘सर्वप्रथम तुम्हाला त्या क्षेत्रातील टेक्निकल नॉलेज असायला हवं. तुम्हाला प्रथमोपचाराचं तसंच सीपीआरचंही ज्ञान असायला हवं. तुमच्या टीममध्ये सर्टिफाइड फर्स्ट एडर असायला हवेत. क्वालिफाईड कम्युनिकेशन ज्ञात असलेले म्हणजेच हॅम रेडिओ ऑपरेटर किंवा सॅटेलाइट फोन अगर उत्तम वॉकी टॉकी ऑपरेटरही असायला हवेत.’ भटकंतीदरम्यान अपघात झाल्यास काय करावं यावर मार्गदर्शन करताना, अशा वेळी सर्वप्रथम जवळच्या पोलीस स्टेशनला आणि ‘महाराष्ट्र माऊंटेनरिंग रेस्क्यू कॉर्डिनेटर सेंटर’च्या (एमएमआरसीसी) ७६२०-२३०-२३१ या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधावा. संपूर्ण सह्याद्रीमध्ये कुठेही अपघात झाला तर त्या ठिकाणाच्या जवळ कोणती रेस्क्यू टीम कार्यरत आहे या सगळ्यांचा डेटा एमएमआरसीसीकडे आहे. तेथील स्थानिक टीम बचावकार्यासाठी लगेच धावून येते, असं गणेश सांगतो. ‘सांगलीत कृष्णा नदी ही इशारा पातळीच्या आसपास आहे. अशातच पुलावरून नदीत उडी मारून पोहणाऱ्यांची संख्यादेखील लक्षणीय असते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी जमावबंदी लागू केली असतानाही काही हौशी तरुणांनी सांगलीच्या नवीन पुलावरून कृष्णा नदीत उडी मारून पोहण्याची स्टंटबाजी केली. सदरची स्टंटबाजी या तरुणांच्या चांगलीच अंगलट आली. पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने वाहून जात असलेल्या या तरुणांना कशा पद्धतीने वाचवण्यात आले त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे’ अशी माहिती देतानाच भटकंती करताना अनेकदा लोक जिवाची पर्वा करत नाहीत आणि संकट ओढवून घेतात असं गणेशने सांगितलं.

भटकंतीदरम्यान अपघात होऊ नयेत यासाठी काय काळजी घ्यावी याविषयी ‘नाशिक क्लाइम्बर्स अॅण्ड रेस्क्युअर्स असोसिएशन’चेही अध्यक्ष असलेल्या दयानंद कोळी यांनी सविस्तर माहिती दिली. आपण कुठे आणि कोणासोबत भटकंतीला जात आहोत याची सगळी माहिती घ्यावी. घरच्यांनाही त्याची पूर्ण कल्पना द्यावी. आपण जिथं फिरायला जात आहोत त्या परिसराचा थोडा अभ्यास करावा. जाणकार ट्रेकर्सबरोबरच ट्रेकिंग करावं. ट्रेकरकडे टेक्निकल एक्सपर्ट, फर्स्ट एडर किती आहेत? काही इमर्जन्सी आली तर बॅकअप प्लॅन आहे का? त्याचा या क्षेत्रातला अनुभव, सेफ्टीसाठी काय काळजी घेतली आहे, इन्शुअरन्स सगळ्यांचा काढला आहे की नाही? शासनाचे निर्बंध पाळले जात आहेत का? अशी सगळी माहिती घेऊन नियोजन करावं, असं त्यांनी सांगितलं. पावसाळ्यात डोंगरमाथ्यावर ट्रेकिंग करताना वा गावातील पावसाळी मौज अनुभवताना स्थानिक गाइड वा वाटाड्या सोबत घ्या. त्यांना पर्यायी रस्ते ठाऊक असतात. दुसरं ट्रेकिंगमधले अनुभवी लोक असतील तर ते सुरक्षिततेला प्राधान्य देतात. पावसाळ्यात सर्वत्र गवताचे रान माजलेले असल्याने वाट चुकण्याची शक्यता सर्वाधिक असते. तसेच ज्या डोंगरात वाट तुटलेली आहे किंवा वाट कठीण असलेले किल्ले, ट्रेक रूट शक्यतो पावसाळ्यात टाळावेत. अशा वाटांवर अपघाताची शक्यता अधिक असते, असं त्यांनी सांगितलं.

पावसाळी भटकंती सर्वांनाच मोहवून टाकणारी असते. कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, डोंगरातून वाहणारे पांढरेशुभ्र ओढे, कड्यावरून कोसळणारे धबधबे, हिरव्या रंगाच्या निरनिराळ्या छटांनी आच्छादलेले डोंगर व शेते, धुक्यात हरवलेले किल्ले व डोंगर हे सगळं आपल्याला भटकंतीसाठी खुणावत असतं. मात्र कुठलीही पावसाळी भटकंती निर्धोक व आनंददायी कशी होईल यावर लक्ष द्यावंच लागेल. आतापर्यंत पावसाळ्यात सह्याद्रीत तसेच नद्या-ओढे- डोंगर परिसरात अनेक अपघात झाले आहेत. डोंगरात फिरताना वाट चुकल्याने दुसऱ्याच डोंगरावर पोहोचल्याच्या किंवा रात्रभर जंगलात राहावं लागल्याच्या घटनाही नवीन नाहीत. त्यामुळे योग्य ती काळजी घेतल्यास पावसाळी भटकंतीचा आनंद द्विगुणित होईल.

viva@expressindia.com