जिल्हय़ातील १८ ग्रामपंचायतींना लाल कार्ड देण्यात आले आहे. ११ ग्रामपंचायतींकडे अजूनही ब्लिचिंग पावडर उपलब्ध नाही. १४ गावांतील पाणीस्रोत परिसर अस्वच्छ असल्याचे आरोग्य विभागाच्या मासिक अहवालात म्हटले आहे.
जिल्हय़ात या पावसाळय़ातील पहिल्या दोन महिन्यांत ९२.६२ टक्के पाऊस झाल्याने नद्या, नाले तुडुंब भरून वाहात आहेत. तलाव, धरण, विहिरींत पाणीसाठा वाढल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. मात्र, अतिवृष्टी व अस्वच्छतेमुळे रोगराईचा फैलाव झाला आहे. साथरोगावर नियंत्रण ठेवण्याबाबत जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून काळजी घेतली जात आहे. जिल्हय़ातील ५६५पैकी १८ ग्रामपंचायतींना लाल कार्ड, ४१६ ग्रामपंचायतींना हिरवे, तर १३१ ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड दिल्याचे स्वच्छता सर्वेक्षण अहवालावरून दिसून आले. नागझरी तांडा, काळापाणी तांडा, काशीतांडा, नादखेडा बेरुळा, एक बुर्जेवाडी, पोटा, शिनगीनागा, कारेगाव, सिनगीखाबा या ११ ग्रामपंचायतींकडे ब्लिचिंग पावडर उपलब्ध नाही.
देवठाणा, बेलोरा, बोराळा, डोंगरगाव नाका, तुप्पा, शिवणी, ढोलक्याची वाडी, धानोरा, कोंढूर, ब्राम्हणवाडा भगवती, वेलतुरा, म्हाळसापूर, जवळाबाजार, औंढा नागनाथ, दौडगाव या १८ ग्रामपंचायतींना लाल कार्ड देण्यात आले. तसेच १४ ग्रामपंचायतींच्या पाणीस्रोत परिसरात अस्वच्छता आहे.