पारनेर कारखान्याच्या पुनर्रज्जीवन योजनेस ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही पाठिंबा दिला असून तालुक्याची कामधेनू वाचविण्यासाठी प्रसंगी आपणही आंदोलनात सहभागी होऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले असल्याची माहिती सहकार खात्याचे निवृत्त अप्पर आयुक्त व विशेष निबंधक भास्करराव शेळके यांनी दिली.
कारखान्याचे पुनरूज्जीवन करून तो पुन्हा सभासदांच्या मालकीचा करण्यासाठी शेळके यांनी पुढाकार घेतला असून त्यासंदर्भात शेळके यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने काल हजारे यांची भेट घेऊन यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. कारखाना अवसायनात निघाल्यानंतर दहा वर्षे त्याचे अस्तित्व राहते, त्यानंतर त्याची मान्यता आपोआप रद्द होऊन कर्जवसूलीसाठी कारखान्याची विक्री करण्यात येते. कारखान्याचे अस्तित्व संपुष्टात आल्यानंतर तो भाडेतत्वावरही देता येणार नाही आदींसह कारखान्यासंदर्भातील सविस्तर पाश्र्वभूमी हजारे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्यानंतर पुनरूज्जीवन योजनेस हजारे यांनी पाठिंबा दर्शवत कारखाना पुन्हा शेतक-यांच्या मालकीचा व्हावा यासाठी आपणही आंदोलनात सहभागी होऊ, अशी ग्वाहीदेखील हजारे यांनी या शिष्टमंडळास दिली. शेळके यांच्यासमवेत भगवानराव पठारे, दादासाहेब चौधरी यांच्यासह शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
कामगार, शेतकरी, तसेच वित्तीय संस्थांच्या देण्यासंदर्भात संबंधितांशी चर्चा करण्यात यावी, त्यास सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास त्यासाठीही लढा उभा करण्याची सूचना हजारे यांनी केली. पुररूज्जीवन योजनेसंदर्भात पारनेर येथे पाच फेब्रुवारी रोजी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Annas supports to parner factory restart yojna