महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १७अ आणि ६१अ या दोन जागांवरील पोट निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर मंगळवारी दुपारपासून आचारसंहिता लागू झाली. लोकसभा निवडणुकीमुळे जवळपास अडीच महिने आदर्श आचारसंहितेखाली वावरलेली महापालिका पुन्हा एकदा त्या सावटाखाली आली आहे. या दोन्ही जागांवरील पोटनिवडणुकीसाठी २९ जून रोजी मतदान होणार आहे.
राज्यातील महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती आदींमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम मंगळवारी जाहीर करण्यात आला. पोटनिवडणुका होणाऱ्या सर्व ठिकाणी दुपारी १२.०० वाजेपासून आचारसंहिता लागू झाल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १७अ आणि ६१अ या दोन्ही जागा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले दिनकर पाटील आणि हेमंत गोडसे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झाल्या होत्या. त्यातील गोडसे हे थेट लोकसभेत जाण्यात यशस्वी झाले तर पाटील यांना पराभवाचे धनी व्हावे लागले. रिक्त झालेल्या या जागांवर पोटनिवडणूक होत आहे. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होईपर्यंत महापालिकेवर आचारसंहिता लागू होती. प्रदीर्घ काळ आचारसंहिता लागू असल्याने महापालिकेतील राजकीय वर्दळ रोडावली होती. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात येऊन पंधरवडा पूर्ण झाल्यानंतर लगेचच महापालिका पोटनिवडणुकीची ही आचारसंहिता लागू झाली. यामुळे महापौर, उपमहापौर व अन्य पदाधिकाऱ्यांवरील वाहनेही जमा करण्याची प्रक्रिया पूर्णत्वास नेण्यात आली. उपरोक्त दोन जागांवर उमेदवार उभे करण्याच्या विषयावर राजकीय पक्षांच्या पातळीवर मंथन सुरू झाले आहे. प्रभाग क्रमांक १७अ मध्ये दिनकर पाटील हे पुन्हा आपले नशीब अजमावणार आहेत. लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा पुन्हा महापालिकेकडे वळविला आहे.