जिल्हय़ातील ४९ केंद्रांवर बारावी परीक्षेस १५ हजारांहून अधिक विद्यार्थी बसले असून, कला ८ हजार ८९२, विज्ञान ४ हजार ६०६ व वाणिज्य १ हजार ६१२, तसेच किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम ३०८ याप्रमाणे त्यांची संख्या आहे.
परीक्षा सुरळीत पार पाडण्यास जिल्हाधिकारी श्याम देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथके स्थापन केली आहेत. प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठक पथकही नेमले आहे. शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भरारी पथकेही नियुक्त केली असून महिला अधिकाऱ्यांची विशेष पथकेही परीक्षा केंद्रांच्या देखरेखीस नियुक्त आहेत. भोकरदन, अंबड व तीर्थपुरी येथील जि. प. प्रशालेतील ३ परीक्षा केंद्रे संवेदनशील जाहीर झाल्यामुळे येथे विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. जिल्हा पातळीवर नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आला आहे.  शिक्षण विभागाच्या ६ पथकांव्यतिरिक्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचेही भरारी पथक तैनात केले आहे. जिल्हय़ातील २० उपद्रवी परीक्षा केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.