आज तंत्रज्ञानात वेगाने बदल होत आहे. हा वेग लक्षात घेऊन चित्रपट दिग्दर्शकांनी तंत्रज्ञानाच्या एक पाऊल पुढे असणे ही आजच्या काळाची गरज आहे. दिग्दर्शक म्हणून तुम्ही जितक्या लवकर तंत्रज्ञान आत्मसात कराल त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या कल्पनेतील क था पडद्यावर साकारण्यासाठी होईल, असे मत ‘बर्फी’चा दिग्दर्शक अनुराग बसू याने व्यक्त केले.
‘व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल’तर्फे भारतीय सिनेमाच्या शतसांवत्सरिक वर्षपूर्तीनिमित्त पुढच्या शंभर वर्षांतील सिनेमा कसा असेल?, या विषयावर दोन दिवसांचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात अनुराग बसू, गौरी शिंदे, अमोल गुप्ते आणि विक्रमादित्य मोटवणे या आत्ताच्या फळीतील तरूण दिग्दर्शकांनी परिसंवादात सहभाग घेतला होता. जिथे अनुरागने चित्रपटांवर असलेला बदलत्या तंत्राचा प्रभाव मान्य केला तिथे गौरीचे म्हणणे हे होते की तंत्रज्ञान कितीही बदलले अगदी कृष्णधवल चित्रपटांपासून आजच्या थ्रीडी चित्रपटांपर्यंत तरी चित्रपटातून कथा सांगणे हा जो मुळ उद्देश आहे तो कधीही बदलणार नाही. चित्रपट पाहण्याची माध्यमेही बदलतील पण, मुळात लोकांना चित्रपटातून चांगल्या कथा पहायच्या असतात आणि दिग्दर्शकांना चांगल्या क था चित्रपटातून दाखवायच्या असतात ही मुलभूत देवाणघेवाण कधीही बदलणार नाही, असे गौरीने सांगितले.  तर भविष्यात एकीकडे लोकांना थिएटर्समध्ये अंधारात बसून चित्रपट पहायला आवडणार नाही. ते आपापल्या घरी आपल्याला उपलब्ध असणाऱ्या साधनांच्या मदतीने चित्रपट पाहणे पसंत करतील असे आपल्याला वाटत असल्याचे दिग्दर्शक अमोल गुप्तेने स्पष्ट केले. त्याचवेळी विक्रमादित्यने मात्र गुप्तेंचे म्हणणे खोडून काढले. बहारदार चित्रपट हे एकत्रितपणे मोठय़ा पडद्यावर अनुभवण्याची मजाच और असते. म्हणजे ‘इंग्लिश विंग्लिश’मध्ये श्रीदेवीचे काम पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली तेच ‘बर्फी’च्या रणबीर व प्रियांकाच्या कामाबद्दलही म्हणता येईल. त्यामुळे लोकांना जे जे भव्य वाटते, सवरेत्कृष्ट वाटते ते पाहण्यासाठी पुढेही थिएटर्समध्येगर्दी होतच राहील, असे आग्रही मत विक्रमादित्यने व्यक्त केले. व्हिसलिंग वुड्सची व्यवस्थापकीय संचालक मेघना घई-पुरी हिच्यासह शोमन सुभाष घई व बॉलिवुडमधील अनेक मान्यवरांनी ‘सिनेमा १००’ या कार्यक्रमात सहभाग घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा