डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२२ व्या जयंती येथील डॉ. आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मोठय़ा थाटात पार पडली. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अरुण घोटेकर होते.
यावेळी घोटेकर म्हणाले, डॉ आंबेडकर हे जागतिक किर्तीचे विद्वान होते. त्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या वैश्विक मूल्यांवर आधारित जागतिक पातळीवर अप्रतिम अशी राज्यघटना आहे. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ विनायक तुमराम म्हणाले, जगातील एकमेव विद्वान, विद्याविभूषित असा व्यक्ती म्हणजे डॉ. आंबेडकर. त्यांनी डी.लिट., डी.एस.सी. व एल.एल.डी. अशा तीनही उच्च पदव्या प्राप्त केल्या. त्यांना या देशात सामाजिक समता प्रस्थापित करायची होती म्हणूनच सामाजिक तत्वाने चालणाऱ्या लोकशाहीच्या त्यांनी पुरस्कार केला. संस्थेचे उपाध्यक्ष अशोक घोटेकर म्हणाले, डॉ. आंबेडकरांनी या देशाला जो विचार दिला तो तळागळातील माणसाला माणूसपण देणारा आहे. माणसामाणसातील संबंध प्रस्थापित करणारा आहे. बाबासाहेबांच्या या जीवन कार्यापासून प्रेरणा घेऊन वाटचाल करायची आहे. यावेळी वामन मोडक यांनी डॉ. आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश दहेगावकर यांनी केले. संचालन प्रा. साळवे यांनी, तर आभार प्रा. नंदकिशोर रंगारी यांनी मानले. कार्यक्रमाला संस्थेचे सहसचिव कुणाल घोटेकर, सुनील कुमरे, उपप्राचार्य संजय बेले, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, शहरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.