भिवंडी-वाडा-मनोर या राज्य महामार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेली येथील अनेक शेतकऱ्यांची जमीन संपादित केली आहे. या रस्त्याच्या कामाचा ठेका घेतलेल्या सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने अथवा शासनाने बहुतांशी शेतकऱ्यांना अजूनही संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला दिलेला नाही. येत्या महिनाभरात या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला न मिळाल्यास शेतकरी आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत.
वाडा-मनोरदरम्यान असलेल्या मौजे वरले गावानजीक अरुण देशमुख या शेतकऱ्याची १००० चौरस मीटर शेतजमीन रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी वर्षभरापूर्वीच संपादित केली आहे. या जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी शासन व या रस्त्याच्या कामाचा ठेका घेतलेल्या सुप्रीम कंपनीकडे वारंवार अर्ज-विनंत्या केल्या, परंतु त्यांना उडवाउडवीचीच उत्तरे देण्यात आली आहेत. देशमुखांप्रमाणेच या रस्त्यासाठी जमिनीस मुकणारे अनेक शेतकरी आज मोबदल्यापासून वंचित असल्याचे कुणबी सेनेचे जिल्हा सरचिटणीस नारायण ठाकरे यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers not getting claim