केंद्र सरकार व गॅस कंपन्यांकडून सुरू असलेल्या गॅस ग्राहकांच्या अडवणुकीच्या विरोधात आवाज उठवण्याची गरज असून गॅस ग्राहक संघटनेच्या माध्यमातूनच ते शक्य होईल. त्यासाठी येत्या शनिवारी रंगार गल्लीतील एस. टी. महाले मंगल कार्यालयात सकाळी ११ वाजता शहरातील समस्त गॅस ग्राहकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
नगर ग्राहक संघाचे अध्यक्ष शिरीष बापट यांनी ही माहिती दिली. ग्राहक सेवा महासंघ, ग्राहक पंचायत, ग्राहक संघ महाराष्ट्र आदी संघटनांनी यासाठी पुढाकार घेतला आहे असे सुरेश रुणवाल यांनी सांगितले. स्वयंपाकाचा गॅस ही सर्वसामान्यांची महत्वाची गरज आहे. केंद्र सरकार त्यासंबधात रोज नवनवे निर्णय घेत आहेत. त्यावर कडी म्हणून गॅस कंपन्या पुन्हा नवे निर्णय ग्राहकांवर लादत आहेत. गॅस वितरक त्याचे भांडवल करत गॅस ग्राहकांना वेठीला धरत आहेत. यावर आवाज उठवण्याची गरज आहे, एकत्रित आवाज उठवला तरच तो वपर्यंत जाईल, म्हणून शहरातील सर्व गॅस ग्राहकांनी या मेळाव्याला उपस्थित रहावे असे आवाहन बापट, तसेच रूणवाल यांनी केले आहे.