तालुक्यातील माहीजळगाव येथील अशोक शिंदे यांच्या विहिरीचे नरेगा अंतर्गत काम सुरू असताना दरड कोसळून गाडले गेल्याने तीन मजूर मरण पावले होते. त्यांच्या नातेवाइकांना मुख्यमंत्री निधीमधून अर्थसाहाय्य देण्याचे विधिमंडळाच्या अधिवेशनात चर्चेअंती मान्य करण्यात आले.
मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य मिळावे अशी मागणी भाजपचे आमदार राम शिंदे यांनी तारांकित प्रश्न मांडून केली होती. त्यावर विधानसभेत २० मिनिटे चर्चा झाली. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्यासह अनेकांनी चर्चेत भाग घेत ही मागणी लावून धरली. अखेर सरकारच्या वतीने उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आधिवेशन संपण्यापूर्वी अर्थसाहाय्य देण्याचे जाहीर केले.
तालुक्यातील माहीजळगाव येथे विहिरीत दरड कोसळून मरण पावलेल्या मीनीनाथ सुभाष देवकाते, यांचे कुटुंब दारिद्रयरेषेखालील असल्याने त्यांना राष्ट्रीय कुटुं अर्थसाहाय्य योजनेमधून २० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात आले आहे. मात्र सीताराम लक्ष्मण इरकर व कांतिलाल यादव इरकर यांना कोणतीच मदत राज्य सरकारने दिलेली नाही हे शिंदे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.