आमदार चंद्रकांतदादा पाटील फाऊंडेशन व भालचंद्र चिकोडे स्मृती वाचनालयातर्फे संकलित केलेल्या ६ हजार पाण्याच्या बाटल्या व ५० हजार रुपये अशी मदत सांगली जिल्हय़ातील विटा येथील दुष्काळग्रस्तांसाठी पाठविण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्तांसाठी पाणी देण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून सुमारे ६ हजार पाण्याच्या बाटल्या आणि रोख ५० हजार रुपये अशा स्वरूपाची मदत संकलित करण्यात आली. जमा झालेल्या रकमेतून दुष्काळी भागातील एक गाव दत्तक घेण्यात येणार असून, महिनाभर गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. संकलित केलेली मदत स्वीकारल्यानंतर आमदार पाटील यांनी दुष्काळग्रस्तांसाठी फाऊंडेशनच्या सदस्यांनी केलेले काम कौतुकास्पद असल्याचे नमूद करून भविष्यात फाऊंडेशनला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. फाऊंडेशनचे अध्यक्ष चिकोडे यांनी पाणी व रोख रक्कम देणाऱ्या नागरिकांचे आभार मानले. ही मदत संकलित करण्यासाठी फाऊंडेशनचे अध्यक्ष राहुल चिकोडे, सचिन साळोखे, सूरज सुलताने, शाहू यादव, शंभूराजे हिरेमठ, अभय सरनोबत, गुरुप्रसाद कुलकर्णी, मिलिंद रानडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.