दुष्काळग्रस्त भागातील जनता कणखर आहे. अस्मानी संकट समोर उभे असताना कठीण परिस्थितीत टिकून राहण्याची प्रेरणा देणारी आहे. दुष्काळाशी सामना करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने मदत करावी, असे आवाहन माजी खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.
श्रीनिवास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘नको हार तुरा, पाठवू पेंढी-पेंढी चारा’ या केलेल्या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जमा झालेल्या मदतीतून ओला चारा वाटप करण्यात आला तर दुसऱ्या टप्प्यात माण तालुक्यातील गिधाडवाडी, भगवानवाडी व सावंतवाडी येथे प्रत्येकी दोन ट्रक ओला चारा पाठविण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव सारंग पाटील, सिध्दार्थ गुंडगे, डॉ. संदीप पोळ, हेमंत कुलकर्णी, प्रदीप जाधव व मारूल हवेली (ता. पाटण) येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
श्रीनिवास पाटील म्हणाले की, राज्यातील सोळा जिल्ह्यांमध्ये अनेक गावांमध्ये भयंकर दुष्काळाची परिस्थती निर्माण झाली आहे. येथे पाणीटंचाई निर्माण झाली असून, जनतेसह जनावरेही तहानलेली आहेत. अशावेळी प्रत्येकाने आपल्यापरीने मदतीचा हात पुढे केला पाहिजे. स्वागत वावरहिरेचे सरपंच विलास चव्हाण यांनी केले. आभार चंद्रकांत वाघ यांनी केले.