जिल्हा परिषदेच्या शाळेत निम्म्यापेक्षा अधिक शिक्षक रजेवर आढळून आल्यास अशा ठिकाणी कारवाई करण्यात येईल, अशी तंबी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी दिली.
कोकणात सध्या शिक्षक संघटनेचे अधिवेशन सुरू आहे. त्यासाठी अनेक शिक्षक रजेवर आहेत. मात्र, त्यामुळे ग्रामीण भागात शाळा ओस पडल्या आहेत. उस्मानाबाद जिल्ह्य़ातील सुमारे ३ हजार ५२८ शिक्षक अधिवेशनाला जाण्याच्या तयारीत असल्याने ग्रामीण भागात शाळा बंद ठेवण्याची वेळ आली आहे. जि.प.च्या शाळांत अशी स्थिती असल्याने शिक्षकांनी याची काळजी घेण्याची गरज मंत्री पाटील यांनी व्यक्त केली.
स्मारकाची जागा निश्चिती लवकरच
पाटील मंगळवारी उस्मानाबाद दौऱ्यावर होते. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी लवकरच जागा निश्चित केली जाईल. स्मारकासाठी सर्वेक्षणाचे काम सध्या सुरू आहे. समुद्रात काही ठिकाणी मोठा खडक सापडला आहे. दोन ते तीन ठिकाणी यासंबंधी माहिती आली आहे. लवकरच यावर निर्णय होणार आहे. अरबी समुद्रात शिवस्मारक व्हावे, यावरून अनेक वेळा गोंधळ झाला होता.