कळवा रुग्णालयाचा ‘पांढरा हत्ती’ पोसणे आता कठीण असल्याचे सांगत हे रुग्णालय शासनाकडे वर्ग करण्याचा ठाणे महापालिका आयुक्तांचा प्रस्ताव यापूर्वीच वादात सापडला असताना नव्यानेच मंत्रिपदावर आरुढ झालेले जितेंद्र आव्हाडांनी ठाणे महापालिका परिवहन उपक्रमही (टीएमटी) ‘बेस्ट’कडे सोपवावा, असा नवा गुगली टाकल्याने शिवसेनेच्या वर्मावर आता ‘टीएमटी’चा घाव बसला आहे. गेल्या दोन दशकांपेक्षा अधिक काळ ठाण्यावर शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. या काळात शहराच्या नियोजनाचा बोऱ्या वाजल्याची टीका विरोधक करत असताना कळवा रुग्णालयाचा भार पेलवत नसल्याची कबुली खुद्द आयुक्तांनी दिल्याने शिवसेनेची पंचाईत झाली आहे. असे असताना शिवसेनेसाठी जिव्हाळ्याचा आणि तितकाच प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या ‘टीएमटी’च्या नाकर्तेपणाची नव्याने चर्चा सुरू करत आव्हाडांनी शिवसेना नेत्यांची कोंडी केली आहे.  
कळवा रुग्णालयाचा कारभार गेली अनेक वर्षे रडतखडत सुरू आहे. नव्वदच्या दशकात सत्ताधारी शिवसेनेलाच हे रुग्णालय नकोसे झाले होते. त्यानंतर मात्र येथील राजकीय नेत्यांनी रुग्णालयाला आपला राजकीय अड्डा बनविला. प्रभागातील रुग्णांची ‘सोय’ लावण्यासाठी कळवा रुग्णालय सोयीचे ठिकाण बनू लागले. त्यामुळे सुरुवातीला रुग्णालय नको, अशी भूमिका घेणाऱ्या शिवसेना नेत्यांनी हा विषय आता प्रतिष्ठेचा बनवला आहे. गेल्या अनेक वर्षांत कळवा रुग्णालयावर कोटय़वधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. आर. ए. राजीव यांच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळात त्यांनी रुग्णालयाचा चेहरामोहरा बदलण्याचा पूर्ण प्रयत्न केला. त्यासाठी सुसज्ज असे अतिदक्षता कक्षही बनविण्यात आले. प्रत्यक्षात डॉक्टरांच्या कमतरतेमुळे हा कक्ष अजूनही पूर्ण भराने सुरू झालेला नाही. या पाश्र्वभूमीवर जितेंद्र आव्हाडांकडे वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी येताच आयुक्त असिम गुप्ता यांनी कळवा रुग्णालय नको, असा सूर आवळण्यास सुरुवात केल्याने हा निव्वळ योगायोग नसल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘टीएमटी’ही नको
कळवा रुग्णालयापेक्षा दयनीय अवस्था ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाची झाली आहे. या उपक्रमात मन मानेल त्याप्रमाणे नोकरभरती करून ठरावीक राजकीय पक्षांनी आपली व्होट बँक मजबूत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘टीएमटी’ची सेवा सुधारण्यात इतक्या वर्षांत सत्ताधाऱ्यांना यश आलेले नाही. सद्य:स्थितीत ‘टीएमटी’च्या ताफ्यात सुमारे ३२० बसेस आहेत. त्यापैकी जेमतेम १८० बसेस प्रत्यक्षात आगाराबाहेर पडतात. त्यापैकी बऱ्याच बसेस मार्गात नादुरुस्त होतात. आयुक्त गुप्ता यांनी उपक्रमाच्या ताफ्यात नव्या २३० बसेस दाखल करण्याची जोरदार तयारी सुरू केली असली नव्या बसेस चालविण्याइतकी सक्षम यंत्रणा उपक्रमाकडे आहे का, असा सवाल आतापासूनच उपस्थित होत आहे. तरीही ‘टीएमटी’ हा शिवसेनेसाठी जिव्हाळ्याचा आणि तितकाच प्रतिष्ठेचा विषय आहे. नेमके हेच ओळखून जितेंद्र आव्हाड यांनी टीएमटीच्या बसेस ‘बेस्ट’कडे वर्ग करा, असा प्रस्ताव आयुक्तांपुढे मांडल्याने शिवसेनेची पुन्हा पंचाईत झाली आहे. शिवसेनेच्या मर्मावर घाव घालण्याचा आव्हाडांचा प्रयत्न असला तरी कळवा रुग्णालयाचा राग आवळून आयुक्त गुप्ता यांनीही त्यांना साथ दिल्याने शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता आहे. यासंबंधी सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आव्हाडांचा प्रस्ताव शिवसेनेला मान्य नसल्याचे सांगितले. तब्बल २३० नव्या बसेस ‘टीएमटी’च्या ताफ्यात दाखल होत आहेत. त्यामुळे चांगली सुविधा देण्याचा आमचाही प्रयत्न आहे हे आव्हाडांनी लक्षात घ्यावे, असा टोला म्हस्के यांनी लगावला.

मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad demand to hand over tmt to best