तलाव क्षेत्रातही दमदार वृष्टी
गेल्या रविवारपासून मुंबई शहर आणि उपनगरात सुरू झालेल्या पावसाने यंदा एक नवा विक्रम केला आहे. गेल्या नऊ वर्षांतील पावसाची आकडेवारी पाहता यंदा पावसाने मुंबईला एका आठवडय़ातच ‘धुतले’ आहे. यंदा १६ जूनपर्यंत कुलाबा आणि सांताक्रूझ येथे अनुक्रमे ७४८.९ आणि ७५५.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रातही दमदार पाऊस झाला आहे.
२००४ पासूनच्या आकडेवारीनुसार २००७, २००८ आणि २०१० या वर्षांत कुलाबा आणि सांताक्रूझ येथे जून महिन्यात दमदार पाऊस झाला. २००७ मध्ये कुलाबा आणि सांताक्रूझ येथे अनुक्रमे ८४७.६ व १००७.२ मिलिमीटर, २००८ मध्ये ९३२.८ व ९३६.१ मिलिमीटर तर २०१० मध्ये ८४८.४ व ७१९.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. मात्र २००९ मध्ये अनुक्रमे २६३.८ व २१८.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
२००४ आणि २००५ या वर्षी कुलाबा आणि सांताक्रूझ येथे अनुक्रमे ३१०.१ व २५३.६ आणि ५७८.१ व ५१९.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. तर २०११ आणि २०१२ या वर्षांत हेच प्रमाण अनुक्रमे ४६१.५ व ६६२.६ आणि २५९.७ व ३११.९ असे होते. त्या तुलनेत यंदा मागील आठवडाभरात पडलेला पाऊस लक्षणीय मानावा लागेल.
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रातही यंदाच्या वर्षी जून महिन्यात आत्तापर्यंत दमदार पाऊस झाला आहे. १७ जून रोजी पाणी पुरवठा करणाऱ्या मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी आणि भातसा या तलावांमध्ये २ लाख १३ हजार ७२४ दशलक्ष लिटर्स इतका पाणीसाठा आहे. तर गेल्यावर्षी हीच नोंद अवघी ६९ हजार ४१२ दशलक्ष लिटर्स इतकी होती.
तलावांची मागील वर्षीची व यंदाची पाण्याची पातळी पुढीलप्रमाणे (कंसात गेल्यावर्षीची) सर्व आकडे दशलक्ष लिटर्समध्ये
मोडकसागर- १४९.१३ (१४६.२९), तानसा- १२३.५१ (११९.६४), विहार- ७६.३० (७४.५१), तुळशी- १३५.५५ (१३३.६१) आणि भातसा- ११३.१८ (१०८.२०)