आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला जिल्हाभर वरुणराजा बरसल्याने यंदाच्या पावसाळय़ात प्रथमच ओढे, नाले वाहते झाले. आषाढीच्या दर्शनासाठी भाविकभक्तांमध्ये मोठा उत्साह होता.
पंढरीच्या वारीसाठी मोठय़ा संख्येने वारकरी आळंदी ते पंढरपूर पायी प्रवास करतात. एकादशीला पंढरीचे दर्शन झाल्यानंतर ते आनंदून जातात. या हंगामात पाऊस चांगला होत असल्यामुळे हा आनंद द्विगुणित झाला. गुरुवारी सायंकाळपासूनच जिल्हय़ात काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने जोरदार बरसण्यास सुरुवात केली. काही दिवस पावसाची गती संथ होती. गुरुवारी रात्री दमदार पाऊस बरसला. शुक्रवारी सकाळपासून पावसाची सर थांबत नव्हती. सूर्यदर्शनही घडले नाही. सर्वत्र शिवारात सर्वत्र पाणीच पाणी झाले. शेताच्या बाहेर पाणी येऊन आरणी भरल्याचे चित्र आहे. ओढेनालेही वाहते झाले आहेत. शुक्रवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्हय़ात सरासरी ३०.९९ मिमी पाऊस झाला. जिल्हय़ातील या मोसमाचा पाऊस ३२८ मिमीवर पोहोचला आहे. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी, कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे – लातूर १८.८८ (२७४.२३), औसा १७.४३ (२२२.७२), रेणापूर ३० (३२२.७५), उदगीर ३९.२९ (३६४.२७), अहमदपूर २५ (४०२.७०), चाकूर ३४.२० (३३५), जळकोट २८ (३९५.५०), निलंगा २७.७५ (३०७.७०), देवणी ४५.३३ (३५७.६४), शिरूर अनंतपाळ ४४ (३००.३५).

Story img Loader