परीक्षेच्या काळात काम करताना कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा टाळावा. परीक्षेच्या वेळी कोणतेही गैरप्रकार खपवून घेणार नाही, असा इशारा जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांनी दिला.
गुरुवारपासून (दि. २१) बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. जिल्ह्य़ात २३ केंद्रांवर ८ हजार ५६६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.  २ मार्चपासून सुरू होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी ४५ केंद्रे आहेत. या केंद्रांवर १५ हजार ४३० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात व्हाव्यात, या व अन्य तयारीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद सभागृहात बैठक घेतली. मुख्य कार्यकारी अधिकारी श्वेता सिंघल, पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे, शिक्षण संस्थाचालक, केंद्रप्रमुख, शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. कॉपी व इतर गैरप्रकारांमुळे गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. यासाठी परीक्षा निर्भय वातावरणात पार पाडाव्यात, कोणतेही गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाही, तसेच फिरते पथक परीक्षा केंद्रांची केव्हाही पाहणी करील, असे पोयाम यांनी स्पष्ट केले.