ज्येष्ठ नागरिक संघातर्फे निषेध पंधरवडा
आज भारतात ११ कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत. यापैकी ६६ टक्के ज्येष्ठ नागरिक गरीब असून लाचारीचे जीवन जगत आहेत. मात्र, राज्यकर्त्यांना याची जाणीव अद्यापही झालेली दिसत नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना उतारवयात रस्त्यावर उतरण्याची पाळी आली आहे, असे मत गोपाळ सातपुते यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ नागरिक संघातर्फे निषेध पंधरवडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या सांस्कृतिक भवनात गोवर्धन सहानी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी यशवंत बोरीकर, अशोक संगीडवार, अण्णा जोगी, डॉ. यशवंत इटनकर, सुरेश आलुरवार, रमेश वैरागडे, आत्माराम माडुरवार, सुधाकर बेले, कुमूद दाणे उपस्थित होते. केशव जेणेकर, प्रा. माणिक अंधारे, प्रा. नीळकंठ बलकी, प्रभाकर घट्टवार, सरोदे, अगळे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित समस्यांबाबत सविस्तर माहिती दिली.
अशोक संगीडवार यांनी भाषणातून शासनाने ज्येष्ठ नागरिकांकरिता अनेक योजना जाहीर केल्या. परंतु, त्या मंजूर करण्यासाठी एवढय़ा जाचक अटी टाकण्यात आल्या. अशा दिव्य अटींमधून प्रत्यक्षात लाभ मिळणारे नागरिक १० टक्क्यांपेक्षा कमी असतात. श्रावणबाळ अनुदान योजना लागू आहे. मात्र, यासाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा २१ हजार रुपये ठरवून देण्यात आलेली आहे. आजच्या वाढत्या महागाईच्या काळात एवढय़ा कमी उत्पन्नात सर्वसाधारण व्यक्ती जीवन जगूच शकत नाही. शासनाने ठरविलेली उत्पन्नाची मर्यादा निश्चितच कमी असल्याने अनेक व्यक्ती लाभापासून वंचित राहतात.
राज्यकर्त्यांना खरोखरच ज्येष्ठांचा आदर ठेवावयाचा असल्यास नवे राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर करण्याची गरज आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती, प्रधानमंत्री,  मुख्यमंत्री,  उपमुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे.