नवी मुंबई पालिकेशी भौगोलिकदृष्टय़ा सुतराम संबध नसलेली पारसिक डोंगरापल्याडची ती १४ गावे केवळ ठाणे जिल्ह्य़ात आहेत म्हणून पुन्हा नवी मुंबई पालिकेत घेण्यास प्रशासनाचा ठाम विरोध असून तसे नगरविकास विभागाला कळविण्यात येणार आहे. मन मानेल तेव्हा पालिकेतून बाहेर पडण्यासाठी टोकाचे आंदोलन करायचे आणि आता विकास होत नाही या सबबीखाली पुन्हा पालिकेत नाक घासत यायचे या तेथील ग्रामस्थांच्या मानसिकतेला प्रशासनातील जुन्या-जाणत्या अधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. प्रशासनाबरोबरच नवी मुंबईतील काही नागरिक व नगरसेवकांचाही या ‘घर वापसी’ला विरोध आहे.
डिसेंबर १९९१ रोजी ठाणे जिल्हा परिषदेतील ४५ गावांचा नवी मुंबई पालिकेत समावेश करून पालिकेची स्थापना करण्यात आली. यातील १४ गावे ही सिडकोच्या नवी मुंबई शहर प्रकल्पातील नाहीत. ती केवळ ठाणे जिल्ह्य़ातील म्हणून पारसिक हिलच्या पलीकडील दहीसर, मोकाशी, वालिवली, पिंपरी, निघू, नावाली, वाकलण, नारीवली, बाले, नागाव, भंडार्ली, उत्तरशीव, बाभली, गोठेघर या १४ गावांचा नवी मुंबई पालिकेत समावेश करण्यात आला. त्यानुसार नवी मुंबईशी सामाजिक, सांस्कृतिक आणि भौगोलिकदृष्टय़ा कोणतेच साम्य नसलेल्या या गावांवर नवी मुंबई पालिकेने दहा वर्षांत सुमारे ७० कोटी रुपये खर्च केले. पहिल्या निवडणुकीत या गावांमधून दोन नगरसेवक पालिकेत निवडून आले. त्यानंतर २००० मध्ये पुन्हा दोन नगरसेवक सभागृहात आले, पण त्यांना नंतर राजीनामा देण्यास ग्रामस्थांनी भाग पाडले. पहिल्या सत्रातील एका नगरसेवकाचा नंतर खून झाला तर आंदोलनाला पाठिंबा न देणाऱ्या नगरसेवकांची घरे जाळून टाकण्यात आली होती. इतका टोकाचा विरोध येथील ग्रामस्थांनी केला होता. पालिकेने येथील रस्ते, पाण्याची योजना, माता बाल संगोपन केंद्र, नागरी आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा उभारली असून या १४ गावांसाठी वेगळे प्रभाग कार्यालय सुरू करण्यात आले होते. सर्व काही सुरळीत सुरू असताना पालिका येथील आपल्या जमिनी संपादित करून ताब्यात घेईल या भीतीपोटी कर व त्या तुलनेतील सुविधांचा बाऊ करून येथील ग्रामस्थांनी संघर्ष समितीच्या वतीने पालिकेतून गावे वगळण्याचा रक्तरंजित लढा उभारला. त्यासाठी पालिकेच्या मुख्यालयावर दगडफेक करण्यात आली होती. येथील ग्रामस्थांनी पालिका ही आपली एक क्रमांकाची शत्रू असून तिच्यापासून मुक्त झाल्याशिवाय सुटका नाही, असेच वातावरण तयार करण्यात आले होते. त्यामुळे या १४ गावांमध्ये नवी मुंबई पालिकेच्या विरोधात प्रचार केला गेला होता. त्यासाठी पारसिक डोंगर ही सीमारेषा आखण्यात आली होती. येथील ग्रामस्थांचा हा टोकाचा विरोध लक्षात घेऊन शासनाने एप्रिल २००७ रोजी या गावांना स्वतंत्र केले. वेगळे झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकास करू, असा विचार करणाऱ्या ग्रामस्थांवर आता पश्चात्तापाची वेळ आली आहे. जवळच्या कोणत्याच पालिका सामावून घेत नसल्याने आणि नागरी सुविधांचा पुरता बोजवारा उडाल्याने या गावांनी पुन्हा नवी मुंबई पालिकेत समावेश करण्याची मागणी केली आहे. पण पालिका प्रशासन या गावांना पुन्हा समावेश करून घेण्यास राजी नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा