महापालिकेची क्षेपणभूमी अद्याप गुलदस्त्यात
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत दररोज निघणारा सुमारे ५५० मेट्रिक टन कचरा तळोजा येथील शासनाच्या सामायिक भरावभूमी प्रकल्पात टाकण्यास सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध केला आहे. तळोजा येथील प्रकल्पात हा कचरा टाकणे महापालिकेला परवडणारे नाही, अशी आक्रमक भूमिका सर्वपक्षीय नगरसेवकांनी घेतली आहे.
उंबर्डे, सापार्डे प्रभागातील शिवसेनेच्या नगरसेवकांनी या परिसरात क्षेपणभूमी उभारण्यास विरोध केला आहे. कल्याण-डोंबिवलीतील क्षेपणभूमीसाठी आरक्षित असलेल्या जागेवर हा प्रकल्प राबविण्यात यावा अशी भूमिका या नगरसेवकांनी घेतली आहे. कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेपुढे दोन पर्याय होते. उंबर्डे येथे क्षेपणभूमीचा प्रकल्प राबविणे किंवा तळोजा येथील सामायिक क्षेपणभूमीत कचरा टाकण्याचे पर्याय महापालिकेपुढे होते. यासंबंधीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला होता. मात्र, तळोजा येथील प्रकल्पात सहभागी होणे महापालिकेस आर्थिकदृष्टय़ा परवडणार नाही, अशी भूमिका सर्वपक्षीय नगरसेवकांनी घेतली. आर्थिकदृष्टय़ा डळमळीत असलेल्या महापालिकेला तळोजा प्रकल्पात सहभागी होणे परवडणारे नाही, असे वामन म्हात्रे यांनी स्पष्ट केले.   सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयुक्तांवर टीकास्त्र सोडले.  
 दरम्यान,  घनकचरा प्रकल्पाची अंमलबजावणी होण्यासाठी आपण डिसेंबर २०१२ पासून महासभेला कळवीत आहोत. तीन वेळा स्मरणपत्रे आपण दिली आहेत, असा खुलासा या वेळी आयुक्त रामनाथ सोनावणे यांनी केला.

उंबर्डे येथे शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प निविदा प्रक्रिया पूर्ण करून १८ महिन्यांत सुरू करण्यात यावा. तळोजा येथील प्रकल्प महापालिकेला परवडणार नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आधारवाडी येथील क्षेपणभूमी बंद करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत. याबाबत न्यायालयाच्या अवमानाचा कोणताही विषय आला तर त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असा ठराव या वेळी महापौर कल्याणी पाटील यांनी कायम केला.