अंबानीसारख्या मोठय़ा उद्योगपतींचा मलबार हिलवरील घराचा प्रश्न सहजगत्या व तत्काळ सुटू शकतो. मात्र, कष्टकऱ्यांच्या घरांचा प्रश्न सुटू शकत नाही, असा मुद्दा ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी िपपरीत बोलताना उपस्थित केला. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यकर्त्यांना वेळच नाही, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कष्टकरी कामगार पंचायतीच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात राज्यव्यापी सामजिक सुरक्षा परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. रिपाइं नेते रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन झाले, तेव्हा वैद्य बोलत होते. यावेळी आमदार विलास लांडे, राज्य ग्राहक कल्याण समितीचे अध्यक्ष आझम पानसरे, पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे, नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे, श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर ढोकळे, बाळासाहेब भागवत आदींसह मोठय़ा संख्येने कष्करी वर्ग उपस्थित होता. वैद्य म्हणाले, प्रजा एकीकडे व सत्ता दुसरीकडे अशी परिस्थिती आपल्याकडे आहे. हे राज्य मूठभर श्रीमंतांच्या हातात आहे. गरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना वेळ नाही. शहरातील घरकुलाचा प्रश्न पाच वर्षांपासून प्रलंबित आहे. त्याची अंमलबजावणी झालेली नाही. नेते पाठपुरावा करत नाहीत. गोरगरिबांच्या प्रश्नांशी कोणालाही देणं-घेणं नाही. आठवले म्हणाले, देशातील ४० कोटी जनतेचा विचार करता असंघटितांचे प्रश्न सुटले पाहिजे. वेळप्रसंगी कायद्यात बदल केला पाहिजे.