ऐन पाणीटंचाईत वाढती बांधकामे
देऊळगावराजातील भीषण पाणीटंचाईने नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरवासीयांना टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे.
शहरातील सुरू असलेली बांधकामे त्वरित बंद करण्यात यावी, असे आदेश आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आढावा बैठकीत दिले होते, परंतु त्यांच्या आदेशाला त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या नगरपरिषद प्रशासनाने व नगरसेवकांनी हरताळ फासून सर्रास बांधकामे सुरू केली आहेत. त्यामुळे दुष्काळात तेरावा महिना, अशी शहरवासीयांची स्थिती निर्माण झाली आहे.
यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणारे सावखेड भोई व पीर कल्याण धरण ऐन हिवाळ्यात कोरडे ठण्ण पडले आहे. त्यामुळे सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे.  
भूगर्भातील पाणी पातळी दिवसेंदिवस खोल जात असल्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. शहराची कायमस्वरूपी पाणीटंचाई संपुष्टात येण्यासाठी खडकपूर्णावरून पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली, परंतु, या योजनेला किमान एक ते दीड वर्षांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत मात्र शहराची तहान भागविण्याची जबाबदारी टॅंकरवर आहे. सद्यस्थितीत शहराला २३ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे, परंतु हे टॅंकरही नागरिकोंची तहान भागविण्यास अपयशी ठरत आहेत. त्यामुळे गेल्या रविवारच्या आढावा बैठकीत पुन्हा दहा टॅंकरचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे.
शहरात निर्माण झालेली भीषण पाणीटंचाई लक्षात घेता आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सुरू असलेली बांधकामे त्वरित बंद करण्याचे निर्देश आढावा बैठकीत दिले होते, परंतु या आदेशाला झुगारून सर्रास बांधकामे करण्यात येत आहेत.
सद्यस्थितीत शहरात चाळीस ते पन्नास बांधकामे सुरू आहेत. एका बांधकामावर दररोज हजारो लिटर पाण्याचा वापर होतो. त्यात भास्करराव शिंगणे नगर, सिव्हील कॉलनी, माळी पुरा, बालाजी नगर, भगवान बाबा नगर, दुर्गा पुरा येथे कामे सुरू आहेत. विशेष म्हणजे, सुरू असलेल्या बांधकामांमध्ये नगरसेवकांचाही समावेश आहे, तसेच माळीपुरा भागात नगरपालिका कर्मचारी
शिंगणे यांच्यासह गिते हॉस्पिटल, मांटे हॉस्पिटल, डॉ. बैरागी हॉस्पिटल, योगीराज लॉज, बंडू बुरकुल व डॉ. सुनील कायंदे यांच्या इमारतींची बांधकामे सुरू आहेत. शहराला दररोज ११ लाख लिटर पाण्याची गरज आहे,
परंतु, सद्यस्थितीत टॅंकरद्वारे आठ लाख लिटर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे तीन लाख लिटर पाण्याचा तुटवडा निर्माण होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
ही बांधकामे पाणीटंचाईच्या काळात दुष्काळात तेरावा महिना असल्यागत सुरू आहेत.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा