पिंपरीच्या महापौर मोहिनी लांडे यांच्या ‘मुलींनो, व्यवस्थित कपडे घाला, नकोसं प्रसंग टळतील’ या वक्तव्यावर वाचकांच्या प्रतिक्रिया येतच आहेत. त्यापैकी काही निवडक प्रतिक्रिया..
बाळकृष्ण शिंदे (बिबवेवाडी)- महापौरांचे वक्तव्य खेदजनक आहे. असे विचार आजच्या युगात मागासच म्हणायला हवेत. स्त्रियांवर होणाऱ्या बलात्कारांवर महापौरांनी उपाय सुचविला आहे की हतबलता? महापौरांनी असा अनाहूत सल्ला देण्यापेक्षा पुरुषांना स्त्रियांकडे पाहण्याचा उपभोगजन्य दृष्टिकोन बदलायला सांगायला हवे होते. स्त्रियांबद्दलचे प्रचलित व मागास विचार बदलणे आणि शैक्षणिक अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षण व शरीरशास्त्र या विषयांचा अंतर्भाव करणे या मनोवृत्तीस प्रतिबंध घालू शकेल. उलट मुलींनाच नको ते सल्ले देऊन मुलींच्या मानसिकतेची आपण अधिकच गळचेपी करीत आहोत. समाजाचे स्त्रियांविषयीचे बुरसटलेले विचार आणि सामाजिक स्पर्धा यांचा सामना करण्यासाठी मुलींना सर्व स्तरांतून पाठिंबा मिळायला हवा.
विकास खोपडे (घोरपडे पेठ)- पिंपरीच्या महापौर मोहिनी लांडे यांनी मुलींच्या वागण्याविषयी व पेहरावाविषयी दिलेला सल्ला योग्यच आहे. पुरुष विवेकबुद्धी हरवून शारीरिक शक्ती वापरून स्त्रीवर अत्याचार करू शकतो आणि स्त्री ताकदीला बळी पडू शकते. महापौरांच्या म्हणण्याला मर्यादा घालणे म्हटले तर या मर्यादेत स्त्री व पुरुष दोघांचाही फायदा आहे. मुलींच्या मर्यादेमुळेच मुलांची मानसिकता स्थिर राहू शकते. चांगल्या विचारांना गोंधळाच्या भोवऱ्यात अडकवू नका.
प्रवीण कड (बुलडाणा)-
महिलांवरील बलात्कार व अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस होत जाणारी वाढ चिंतेची बाब बनली आहे. तरुण मुली, वृद्धा, बालिकेवरही बलात्कार होत आहेत. मग स्त्रिया अंगप्रदर्शन करीत असल्याने त्यांच्यावर बलात्कार होतो, असे म्हणणे योग्य आहे का, या प्रश्नाचे उत्तर पुरुषसत्ताक मानसिकतेत दडलेले आहे. ‘स्त्री उपभोगाची वस्तू आहे. आम्ही पुरुष असल्याने आम्ही काहीही केले तरी चालेल’ ही ती मानसिकता आहे. ही मानसिकता बदलणे आवश्य आहे.

Story img Loader