आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी कोणत्याही व्यक्ती ऐवजी समाज माध्यमांचा वापर करण्याची सवय भारतीयांमध्ये चांगलीच रुजली. यामुळेच समाज माध्यमांवर भारतीयांचा वावर वाढू लागला. आनंद असो किंवा राग काहीही व्यक्त करण्यासाठी समाज माध्यम हे प्रभावी असल्याची खात्री भारतीयांना झाली आहे.
यातूनच देशात निवडणुकांपासून ते समाजप्रबोधनापर्यंत अनेक गोष्टींसाठी या माध्यमाचा वापर केला जाऊ लागला आहे. फेसबुकच्या बरोबरीने ट्विटर हे माध्यमही खूप बोलके झाले असून वर्षभरात ट्विटरवर भारतीयांनी नेमके काय काय केले याबाबचा तपशील नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. जगभरातून दिवसाला सुमारे ५० कोटी ट्विटस केले जातात. यातील एक ट्विट ‘गोल्डन ट्विट’ म्हणून निवडले जाते आणि हा बहुमान यंदा @TheEllenShow  यांनी ट्विट केलेल्या मार्च मधील ऑस्कर साहळय़ादरम्यानचा छायाचित्राला मिळाला आहे. भारताच्या बाबतीत ट्विटरने प्रसिद्ध केलेल्या पाहणीत वर्षभरातील काही ठराविक घटनांवर ट्विटवर खूप चर्चा रंगल्याचे दिसून आले आहे. यामध्ये १३ नोव्हेंबर रोजी रोहीत शर्माने श्रीलंका विरुद्धच्या एक दिवसीय क्रिकेट सामान्यात कलेल्या सर्वाधिक २६४ धावा या विषयावर चर्चा झाल्याचे समोर आले आहे. त्या खालोखाल ४ मे रोजी रजनिकांत यांनी ट्विटरवर लॉगइन केले त्यावेळेस अवघ्या २४ तासांच्या आत त्यांना दोन लाख फॉलोवर्स मिळाले. आज रजनिकांतचे ११ लाख फॉलोवर्स आहेत. घटनांच्या यादीत एका हिंदी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रसार माध्यमांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील वक्तव्याचा पाचव्या स्थानावर समावेश आहे. तर अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या घटनेबाबतही चांगलीच चर्चा रंगली असून ही घटना आठव्या स्थानावर येते. हॅश टॅगच्या यादीत फिफा वर्ल्ड कप संदर्भातील #WorldCup2014 हा हॅश टॅग आघाडीवर असून त्या खालोखाल ८ मार्च २०१४ रोजी हरविलेल्या विमाना बद्दलच्या #MH370  या हॅश टॅगचा समावेश आहे. त्या खाली तिसऱ्या क्रमांकावर आपच्या कॅम्पेनमध्ये प्रसिद्ध झालेले #MufflerMan चा समावेश आहे.

रीट्विट्समध्ये मोदी आघाडीवर
ट्विटप्रिय व्यक्तींमध्ये बॉलीवूडची ‘खाना’वळी आघाडीवर असली तरी रीट्विटच्या बाबातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आघाडीवर असून त्यांच्या खात्यावरून १६ मे २०१४ रोजी त्यांच्या विजयाबाबत करण्यात आलेल्या ट्विटला सर्वाधिक ७० हजार ५१५ रीट्विट्स करण्यात आले आहे. या खालोखाल सलमानखानने अनावरण केलेल्या किक यात्याच्या चित्रपटाच्या ट्रेलरला ५१ हजार ९८२ रीट्विट मिळाले आहेत. देशातील सर्वाधिक री ट्विट्स असलेल्या पहिल्या २० ट्विटसच्या यादीत भारताच्या मंगळयान मोहिमेसंदर्भात करण्यात आलेल्या दोन वेगवेगळय़ा ट्विटसना नववे व दहावे स्थान मिळाले आहे. या यादीत मोदी यांच्या आणखी दोन ट्विटसचा समावेश असून त्यातील एक १२ हजार ३७० री ट्विटसह बाराव्यातर एक ७ हजार ९९५ री ट्विटसह विसाव्या स्थानावर आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या खालोखाल सर्वाधिक फॉलोवर असलेले नरेंद्र मोदी हे सर्वाधिक फॉलोवर्स असलेले ट्विटप्रिय नेते ठरले आहेत. मोदी यांचे ८४ लाख २४ हजार ७०९ इतके फॉलोवर्स आहेत. तर ओबामा यांचे पाच कोटींहून अधिक फॉलोवर्स आहेत. मोदी यांच्या फॉलोवर्सची संख्या मोठी असली तरी भारतीय ट्विटप्रिय व्यक्तींमध्ये मोदी यांचा क्रमांक पाचवा येतो.

चर्चा निवडणुकीवर
फेसबुकवर सर्वाधिक चर्चा ही भारतातील निवडणुकांवर झाल्याचे फेसबुकने प्रसिद्ध केलेल्या पाहणीत नमूद करण्यात आले आहे. तर फेसबुकवर सर्वाधिक चर्चा ही खेळावर होत असल्याचे वर्षभरातील वापरकर्त्यांच्या पाहणीत समोर आले आहे.
फेसबुकवर भारतात सर्वाधिक चर्चिले गेलेले विषय
* २०१४च्या सार्वत्रिक निवडणुका ’इंडियन प्रिमियर लीग, ’विश्व चषक
* मंगळयान मोहिम ’काश्मीरमधील पूर ’भारतीय बाजारात झिओमीचे आगमन ’आलीया भट ’मेरी कोम चित्रपट ’मलेशियन हवाईदल  ’गाझा येथील परिस्थिती.  
* भारताचे प्रवेशद्वार (इंडिया गेट)’ताज महल ३. गुरुद्वारा बंगला साहिब ’ नंदी हिल्स ’मरिन ड्राइव्ह,’मरीला समुद्र किनारा. रामोजी चित्रनगरी.