वाहतुकीचे सर्व नियम व अटींचे पालन करून ऑटोरिक्षा चालवून कुटुंबाची उपजीविका चालविणाऱ्या ऑटो रिक्षाचालकांवर आरटीओ कार्यालयाच्या जाचक अटींमुळे बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. या विरोधात रिक्षाचालक-मालक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे कार्याध्यक्ष कॉ. नामदेव चव्हाण यांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १५ जुलपासून विविध मागण्यांसाठी ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. शहराचा विस्तार व लोकसंख्या विचारात घेता किमान एक हजार रिक्षांसाठी परवाने गरजेचे आहेत. मात्र, मागणी करूनही आरटीओ व वाहतूक पोलीस खाते यांनी या बाबत सातत्याने दुर्लक्ष चालविले आहे. परवाने नसल्यावरून रोख दंड वसूल केला जातो. तसेच रिक्षाचालकांची कागदपत्रे असताना मीटर नसल्यामुळे त्रास दिला जातो. सरकारी परवाने घेण्यास राजी असणाऱ्या रिक्षा पकडू नयेत, कागदपत्रे पूर्ण करणाऱ्या रिक्षांवर कारवाई करू नये व दंडात्मक कारवाई करू नये यांसह विविध मागण्यांसाठी होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे कार्याध्यक्ष कॉ. नामदेव चव्हाण यांनी केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Warning of indefinite agitation of rickshaw drivers owner