सावित्रीबाई फुलेंच्या महाराष्ट्रात १५० वर्षांनंतर आज महिलांची स्थिती लक्षणीय सुधारली आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रांतही महिला आत्मविश्वासाने वावरू लागल्या आहेत हेसुद्धा आता समाजाच्या पचनी पडू लागलं आहे. तरीही सहजी कल्पनाही करता येणार नाही, असे व्यवसाय महिला यशस्वीपणे करताहेत हे पाहिले की चटकन मान वळवून बघितले जाते. देशातील पहिल्या मोनोरेलचे पहिले सारथ्य, विजेच्या खांबांवर चढणारी ‘वायरवुमन’, स्वैपाकघरात वावरत असतानाच थेट शेअर बाजारात ‘ट्रेडिंग’ या घटना अजूनही आपल्याला सुखद धक्का देऊन जातात. महिला दिनाच्या निमित्ताने आगळी मुलुखगिरी करणाऱ्या या कन्यांचा परिचय. ‘महिला राज’ आल्यास भ्रष्टाचार कमी होईल, असा आशावाद वर्तवला जातो. परंतु काळ पुढे सरकत चालला आहे तशी महिला गुन्हेगारांची संख्या वाढत चालली आहे, ही गोष्टसुद्धा एका अर्थी ‘लक्षणीय’च म्हणावी लागेल. महिला दिनी या प्रक्रियेवरही विचार होणे आवश्यक आहे.

Story img Loader