आराधना जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिक्षण पूर्ण करून आपला पाल्य नोकरीला लागला की पालकांना वेध लागतात ते त्याच्या लग्नाचे. “मुलगा/ मुलगी आम्ही शोधायचे की तू शोधली/ शोधला आहेस?” असे संवाद लग्नोत्सुक घरांमधून ऐकायला येतात. ज्या घरात मुलगी जाणार किंवा सून येणार त्या घरातल्या मंडळींची, उपवर मुला, मुलीची चौकशी केली जाते, आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेतला जातो, इतरही अनेक गोष्टी तपासल्या जातात. मात्र या सगळ्यात ज्यांचं लग्न होणार आहे ते जोडपं आपल्या भविष्याबद्दल, करिअरबद्दल, त्यातल्या पुढच्या संधींबद्दल जितकी चर्चा करतात तितकी चर्चा पालकत्वाबद्दल करतात का? किती मुलं होऊ द्यायची आणि कधी होऊ द्यायची यापलिकडे विवाहोत्सुकांमध्ये फारशी चर्चा केली जात नाही. “पाण्यात पडलात की आपोआप पोहता येतं” हा प्रकार पालकत्वाबाबतही लागू होतो असं अनेकांना आजही वाटतं.

लग्न झाल्यानंतर नातेवाईक, मित्र परिवाराकडून कधी आडून आडून तर कधी उघडपणे “गुड न्यूज कधी देताय?“ अशी विचारणा सुरू होते. मात्र पालक बनण्यासाठी मुलगा आणि मुलगी दोघेही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तयार आहेत का? ही जबाबदारी आपण निभावू शकतो हा आत्मविश्वास दोघांनाही आहे का? भविष्यात मुलांसाठी आपल्या करिअरच्या दृष्टीने काही निर्णय घेण्याची वेळ आलीच तर एकटी आईच आपलं करिअर सोडणार की वडिलांचाही त्यात सहभाग असेल? मुलांची आजारपणं, शाळा, अभ्यास, इतर उपक्रम यात पालक म्हणून दोघांचा सहभाग असेल की ती केवळ आईची जबाबदारी असेल? पालकत्व निभावत असताना घरच्या बाकीच्या मंडळींची साथ मिळणार आहे का आणि किती काळासाठी? पाल्याला पाळणाघरात ठेवण्याची वेळ आली तर योग्य पाळणाघर आपल्या आजूबाजूला आहे का? हे आणि असे असंख्य मुद्दे महत्त्वाचे असतात. पण यावर फारसा विचार होताना दिसत नाही.

हल्ली चांगल्या करिअरमुळे, संधींमुळे लग्नाचे वय वाढलं आहे. पण या वाढत्या वयाचा परिणाम आपल्या पालकत्वावर कसा आणि किती होणार आहे? यावरही विचार होण्याची गरज आहे. आपल्या रिटायरमेंटनंतर पाल्य शिकण्याच्या वयाचाच असेल तर त्या शिक्षणाचा खर्च पेलण्याची आपली ताकद असेल का हा विचार पालक बनण्याच्या तयारीत असायला हवा.

आजकाल लग्नाअगोदर जसं समुपदेशन केलं जातं तसं पालक बनण्याचा विचार करण्याअगोदरही केलं जावं. त्यामुळे पालकत्वाची जबाबदारी तर समजून येईलच पण त्यातील आव्हानेही समजतील. आपल्या आईवडिलांचा काळ आणि आताचा काळ यात जमीन अस्मानाऐवढी तफावत आहे. एक किंवा दोनच मुलं पुरे पण त्यांना सुजाण नागरिक म्हणून आपण वाढवू शकू का? हा विचार पालकत्वाची जबाबदारी घेण्याचा विचार होतो तेव्हाच करायला हवा. त्याचं उत्तर जर होकारार्थी असेल तर सुजाण पालकत्वाकडे तुमची वाटचाल होणार हे नक्की!

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Are you ready for parenthood why do newlyweds need to think about it sgk
Show comments