नीलिमा किराणे 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“अनु, आईबाबा परत कटकट करायला लागलेत गं, पुन्हा लग्न कर म्हणून. त्यांच्यामते दोन उत्तम प्रोफाइल आलीत विवाह संस्थेकडून.” रीनानं उपरोधिक स्वरात सांगितलं.

“मग भेटून घे की.” “अजून वेळ हवाय गं, तयारी नाही माझी. मागचं आठवून डिस्टर्ब होते.” “ठीक आहे. अजून १० वर्षं वेळ घे तू ठरवायला.” अनुजाने विषय संपवला.

“असं काय गं? पहिल्या अनुभवाच्या धक्क्यातून खरंच बाहेर आले नाहीये मी अजून…” यावर अनुजा काहीच बोलली नाही तसा रीनाचा आवाज कातर झाला.

“प्रतीकच्या आईचा खत्रुड स्वभाव, त्यांच्या टोमणे मारण्यावरून चिडून, भांडून मी माहेरी निघून आले, तर दोन महिन्यांत प्रतीकने घटस्फोटाची नोटीस काय पाठवली, घटस्फोट झाला काय आणि लगेचच त्याने दुसरं लग्नही केलं. कसं विसरू शकतात गं लोक इतक्या पटकन?”

“मधले टप्पे विसरतेयस रीना तू. लग्नानंतरच्या दोन महिन्यांत तू तीनदा तरी माहेरी आली होतीस. दर वेळी प्रतीक तुला मनवून घरी न्यायचा. शेवटच्या वेळीही किती फोन केले होते त्याने तुला.” “हो. आणि यावेळी मी न्यायला येणार नाही. तू सोडून गेलीयेस, तू परत ये असंही म्हणाला होता. मी लगेच गेले असते तर सासूचाच वरचष्मा राहिला असता. पण म्हणून इतक्या पटकन घटस्फोटाचे पेपर पाठवेल असं कधीच नव्हतं वाटलं. आईनंच भाग पाडलं असणार.”

आणखी वाचा-सोनिया गांधींनी का लावून द्यायला हवं राहुल गांधींचं लग्न?

“आता घटस्फोटाला पाच वर्षं होतील रीना, तरी अजून त्या सासूशी स्पर्धा करण्यातच अडकलेली आहेस. ती स्पर्धा महत्त्वाची होती की प्रतीकची आयुष्यभराची सोबत? प्रतीकलाही त्याच्या आईचा स्वभाव माहीत होता. प्रतीकने त्याच्या दुसऱ्या लग्नानंतर लगेचच परदेशी जॉब घेतला आणि आता ती दोघं गेलीसुद्धा. तू जरा धीर धरला असतास तर? ते तेव्हाही सुटलं तुझ्या हातून आणि आत्ताही तेच.”

अनुजा आज रीनाला ऐकवण्याच्या मूडमध्येच होती. “म्हणजे काय?” “त्या धक्क्यातून पाच वर्षांनीही बाहेर पडता येईना, कारण तुलाच तिथे अडकून बसायचं आहे. प्रतीकचं प्रेम कसं खोटं आणि मी किती थोर हे कोणाला दाखवते आहेस? तरुणपणीची वर्षं महत्त्वाची नाहीत का? मूव्ह ऑन डीयर.”
“मूव्ह ऑन नाही करता येत गं. खरं सांगू, बालिश हट्ट धरून चूक केली याबद्दल अपराधी वाटतं. माझ्याच इगोची भीती वाटते, दुसरं लग्न करून पुन्हा तेच झालं तर?” “आयुष्यभर एकटं राहणं जमेल का?” रीनाने नकारार्थी मान हलवली.

“मग तयारी कशी नाही? इतक्या मोठ्या अनुभवातून काहीच शिकली नसशील का तू? अजूनही भांडून माहेरी जाशील?”

“नक्कीच नाही जाणार. चारदा विचार करेन.”

आणखी वाचा- नातेसंबंध- बॉयफ्रेंड ‘इंटिमेट’ होण्याचा आग्रह करतोय?

“मग एकदा स्वत:वर विश्वास ठेवून बघ ना. ‘अजून तो धक्का पचत नाही’, ‘प्रतीकचं प्रेम किती खोटं’, ‘नवा माणूस कसा मिळेल?’, ‘माझा इगोवाला स्वभाव आहे’, ‘आई-बाबा समजूनच घेत नाहीत’ अशी शंभर कारणं काढून तिथेच गरगरत बसली आहेस.”

“मी मुद्दाम करते का? असा अनुभव तुला आला असता तर?”

“तर काही दिवस मीही हादरले असते, पण नंतर परिणाम काय होतायत? ते पाहिलं असतं. तेच ते विचार, एकटेपणा, अपराधीभाव, दु:ख आणि भीती या भावनांच्या चक्रात गरगरत राहिले नसते. बाहेर पडण्यासाठी धडपड केली असती.” अनुजा म्हणाली. “ मूव्ह ऑन म्हणजे नेमकं काय रीना? तर त्या चक्रामुळे होणारे पुढचे परिणाम जाणिवेनं समजून घेणं. कल्पनेनं आणखी फक्त पाच वर्षं पुढे जाऊन बघ. विलक्षण ताणात संपून गेलेली दहा वर्षं, जवळची माणसं कंटाळलेली, आधाराचे, मदतीचे हात थकलेले, तुझं वय वाढलेलं, उमेद, उत्साह कमी, मानसिक थकवा… हे नीट बघशील तर कळेल तुला. जे घडलं त्यात आता काहीच बदलता येणार नाही, पण अजूनही तुझ्या हातात एक चॉइस आहे. स्वत:च्याच भावनांचं कौतुक कुरवाळत बसायचं की स्वत:वर विश्वास ठेवून निर्णय घ्यायचा आणि सर्व शक्तीनिशी त्या गरगरत्या चक्रातून बाहेर उडी मारायची?”

अनुजाने निवड केली होती, रीनाच्या भावनांच्या कौतुकाला यापुढे न कुरवाळण्याची.

आता रीनाची वेळ होती, स्वत:चं आयुष्य विना तक्रार जगण्याची.

(लेखिका रिलेशनल कौन्सिलर आहेत)

neelima.kirane1@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Choice should be yours to regret or move on from the relationship mrj
Show comments