स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे एखादे राज्य असावे अशी पूर्वी काही मराठी भाषाप्रेमींची मागणी होती. त्यासाठी एक चळवळ उभारली गेली. तसं पाहायला गेलं तर ही चळवळ स्वातंत्र्यपूर्व काळातच चालू झाली होती. पण भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर या चळवळीने उग्र रुप धारण केले. या चळवळीत महिलावर्गाचादेखील मोठ्याप्रमाणात सहभाग होता. संयुक्त महाराष्ट्रासाठी कित्येक महिलाही लढल्या. या नारीशक्तीचे स्मरण आज महाराष्ट्र दिनानिमित्त करायलाच हवे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुरुवातीला या चळवळीमध्ये महिलांचा फारसा सहभाग नव्हता. पण १९५५ च्या दरम्यान आयोगाने द्विभाषिक राज्याची घोषणा केल्यानंतर या घाेषणेविरोधात आंदोलन तीव्र होतं गेल्यानंतर राज्यातील महिलावर्गदेखील यात सहभागी झाला. यामध्ये वेगवेगळ्या विचारसरणीच्या महिलांचा सहभाग होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महिलांना मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेणाऱ्यांत कम्युनिस्ट नेत्या अहिल्या रांगणेकर यांचा मोठा वाटा होता. आचार्य अत्रे यांनी अहिल्या रांगणेकर यांच्यावर कविता करून त्या कवितेत त्यांना ‘महाराष्ट्राची रणरागिणी’ ही उपााधी दिली होती.

हेही वाचा : वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षी १० वी अन् १३ वर्षांत पदवी; भारतात सर्वात कमी वयात पीएचडी मिळवणारी नयना जैस्वाल आहे तरी कोण?

या महिलांमध्ये सर्वांत अग्रणी नाव म्हणजे भीमा दांगट. ही घटना १९५६ ची आहे. पुण्यातील एका नाट्यगृहाचे उद्घाटन करण्यासाठी यशवंतराव चव्हाण जेव्हा पुण्यात आले होते; तेव्हा भीमा दांगट यांनी यशवंतरावांच्या दिशेने काळा झेंडा फेकून ‘सूर्याजी पिसाळ चालता हो’ अशी घोषणा दिली. भीमा दांगट या तत्कालीन सरकारच्या पक्षातील नगरसेविका असूनसुद्धा त्यांनी केवळ मराठीच्या प्रेमापोटी पक्षविरोधी धोरण अवलंबलं होतं. संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी आर्थिक मदत म्हणून त्यांच्याजवळील सर्व दागिने विकले व पक्ष सदस्यत्वाचा व नगरसेवकपदाचादेखील राजीनामा दिला. त्यांच्यासारखाच पुण्याच्या शिक्षण मंडळातील मालतीबाई परांजपे यांनी देखील या लढ्यात सहभाग घेतला. सत्ताधारी पक्षात असूनही निव्वळ मराठी भाषा आणि महाराष्ट्र राज्यप्रेमापोटी या महिलांनी पक्षाविरोधात बंड पुकारले.

आदिवासी समाजाच्या नेत्या कॉम्रेड गोदावरीबाई परुळेकर यांनीदेखील गुजरात सीमेवरील भागांत संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेतृत्व केले. कॉम्रेड गोदावरीबाई परुळेकर यांच्याकडून प्रेरणा घेऊन स्थानिक आदिवासींनी देखील संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठ्या संख्येने सामील झाले.

हेही वाचा : बाप असावा तर असा…! लेकीच्या घटस्फोटानंतर वाजत-गाजत आणलं घरी! वडिलांच्या ‘या’ कृतीचा समाजाने का घ्यावा आदर्श?

भाषावार प्रांतरचना संपूर्ण देशात कार्यरत असताना महाराष्ट्रासोबतच असा भेदभाव होत असल्याने पुढे संयुक्त महाराष्ट्राचा लढा तीव्र होत गेला व दक्षिण मुंबईतील लालबाग, परळ, गिरगाव, दादर म्हणजेच गिरणगाव हे लढ्याचे प्रमुख केंद्र बनले. या गिरणगावातील महिला लढ्यात उतरू नये म्हणून तत्कालीन सरकारने पोलिसांकरवी अनेक कारस्थानं केली. अश्रूधुरांचा मारादेखील केला. तेव्हा लालबाग-परळमधील पार्वतीबाई भोईर ही रणरागिणी घराबाहेर येऊन म्हणाली की, ‘‘आमच्या लेकरांना, कुटुंबाला असं गुदमरून मारण्यापेक्षा थेट गोळी घाला. पण आम्हाला मुंबईह महाराष्ट्र पाह्यजे म्हणजे पाह्यजे.’’ पोलिसांनी पार्वतीबाईंवरदेखील अश्रुधूर सोडला. सदर घटनेने मराठी जनमानसात अतिशय संतापाची लाट उसळली. व लालबाग परळमधील शेकडोंच्या संख्येने महिलावर्ग आपल्या लेकराबाळांसहित रस्त्यावर उतरल्या. महिलांचे हे उग्र रुप पाहून पोलिसांनादेखील माघार घ्यावी लागली.

गिरणगावात पूर्वी खूप गिरण्या होत्या. सर्वच गिरणी कामगारांना कामावर येताना जेवणाचा डबा आणणे शक्य नव्हते म्हणून गिरणगावात भरपूर महिला घरोघरी खाणावळ चालवत होत्या. याच खाणावळ चालावणाऱ्या महिलांचादेखील या आंदोलनात एक मोलाचा सहभाग होता. आंदोलनात पोलीस जबरदस्ती कुण्या आंदोलकांना जेलमध्ये नेऊन टाकत. तेव्हा त्या आंदोलकांची जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून या खाणावळ चालवणाऱ्या महिला रोज जास्तीचे जेवण बनवीत व ते आंदोलनकर्त्यांना मोफत देत असत. यामध्ये काही शिकलेल्या महिला होत्या, त्यांचादेखील हातभार असे. त्या कोर्टकचेरीची कामे पाहात. रोज कुठे कुठे कोणत्या आंदोलकावर केस झाली आहे, कोणत्या आंदोलकांना कुठल्या जेलमध्ये ठेवलं आहे, त्यांच्यापर्यंत कसं पोचता येईल या गोष्टी पाहात होत्या.

हेही वाचा : “उच्च शिक्षित नोकरी करणाऱ्या स्त्रीशी लग्न करणे हा ‘सर्वात वाईट निर्णय, शेअर बाजार विश्लेषकाचं विधान चर्चेत, नेटकरी म्हणाले…

आंदोलनादरम्यान एकदा आचार्य अत्रे, मधू दंडवते, लालजी पेंडसे यांना अटक झाली. यांच्या अटकेची बातमी संपूर्ण महाराष्ट्रभर वाऱ्यासारखी पसरली. त्याचवेळी सरकारने संशयाने भीतीपोटी तारा रेड्डी, सुनंदा देसाई, निर्मला कुलकर्णी, प्रमोदिनी तायशेट्टे या महिला आंदोलकांनादेखील अटक केली. एवढंच नव्हे तर क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या कुटुंबालादेखील पोलिसांनी जबरदस्तीने गाडीत बसवून गावाबाहेर सोडून दिले होते. कराडमधील सुपते गावातून १०० बैलगाड्यांच्या फौजफाट्यासह शेकडोंच्या संख्येने महिलांचा मोर्चा निघाला होता त्याचे नेतृत्व मंगला पवार यांनी केले होते. एकीकडे संयुक्त महाराष्ट्र चळवळ चालू असताना त्याला प्रोत्साहन म्हणून इस्मत चुगताई, दुर्गा भागवत यांच्यासारख्या महिला साहित्यिकांनीसुद्धा ही चळवळ राज्याच्या कानाकोपऱ्यांत पोचवण्याचे काम चोख पार पाडले. तर शाहीर अमरशेख, शाहीर गवाणकर यांच्या खांद्याला खांदा लावून शाहीर अनुसया शिंदे यांनीदेखील आपल्या लोककलेतून आंदोलनाला एक बळकटी दिली होती. संयुक्त महाराष्ट्रासाठी दिल्लीत झालेल्या आंदोलनातदेखील महिलांची संख्या लक्षणीय होती. त्यात अनेक जणी अज्ञात आहेत. एकंदरीत संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा इतिहास पाहता या लढ्यात नारीशक्तीचंदेखील मोठं योगदान आहे.

आज १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्र चळवळतील ज्ञान – अज्ञात आंदोलकांना, हुतात्म्यांना, नारीशक्तीला महाराष्ट्र दिनानिमित्त त्रिवार वंदन!
rohit.patil@expressindia.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Contribution of women in samyukta maharashtra movement css
Show comments