डॉ. शारदा महांडुळे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वनस्पती तुपामुळे एलडीएल हे खराब कोलेस्टेरॉल वाढते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका निर्माण होतो. म्हणून हे वनस्पती तूप आहारातून पूर्णपणे वर्ज्य करायलाच हवे.खरे तर याला वनस्पती तूप का म्हणतात हा प्रश्नच आहे; कारण हे तूप अजिबातच नैसर्गिक नाही. वनस्पती तूप म्हटल्यावर सर्वसामान्यांना अगदी ते नैसर्गिकच तूप वाटते. म्हणून उपवासाच्या दिवशीही अन्नपदार्थ शिजवण्यासाठी किंवा तळण्यासाठी याचा वापर करतात; परंतु हे आरोग्यास अतिशय घातक आहे.

हे तूप नैसर्गिक नसून एखाद्या तेलापासून रासायनिक प्रक्रियेने बनविले जाते. यालाच हॅड्रोजनेटेड ऑइल्स किंवा वनस्पती तूप असे म्हणतात. या नावावरूनच सर्वांमध्ये गैरसमज वाढलेला आहे. वनस्पती तूप बनविण्याची प्रक्रिया- सरकी तेल, रेपसीड तेल, मोहडा तेल, सालसीड तेल, मोहरी तेल, धुपा तेल, सोयाबीन तेल, भात-तूस तेल, मका तेल, फुलवारा तेल अशा अनेक प्रकारच्या तेलांपासून हे अनैसर्गिक कृत्रिम घनिभूत तूप बनविले जाते. या तेलांमध्ये सायट्रिक ॲसिड घालून तापवितात. नंतर कॉस्टिक सोड्याने त्याला धुऊन त्याचा रंग पांढरा केला जातो. अजून शुभ्रपणा येण्यासाठी आम्लमाती व कोळशाच्या सान्निध्यात पुन्हा तेले तापवली जातात. त्यानंतर ब्लीचिंग करून शुभ्रपणा वाढविला जातो. या प्रक्रियेमुळे तेलांमधील आवश्यक असलेली सर्व नैसर्गिक मूलद्रव्ये नष्ट होतात. या तेलांना घट्टपणा येण्यासाठी यामध्ये हायड्रोजन गॅस सोडतात.

या प्रक्रियेसाठी निकेल धातू वापरला जातो, जो आरोग्यास अतिशय घातक असतो. यानंतर कृत्रिम घनिभूत अनैसर्गिक तूप तयार होते; परंतु याचा वास नष्ट करण्यासाठी पुन्हा रासायनिक प्रक्रिया करून हे तूप ४ ते ५ तासांपर्यंत २४० अंश ते २६० अंश सेंटिग्रेडला तापवले जाते व सर्वात शेवटी अशा पद्धतीने अनैसर्गिक वनस्पती तूप तयार होते.

गुणधर्म – या तुपात कृत्रिम पद्धतीने जीवनसत्त्व ‘अ’ व ‘ड’ सर्वात शेवटी मिसळले जाते; परंतु हे तूप पचनास जड झाल्यामुळे शरीरावर त्याचा अतिरिक्त भार पडतो. पर्यायाने कृत्रिम जीवनसत्त्वाचा काहीही उपयोग होत नाही. हे तूप म्हणजे एक प्रकारे संपृक्त, स्निग्ध पदार्थ असतो जो सामान्य तापमानावर घन स्वरूपात राहतो. हे तूप सामान्य तापमानामध्ये घन स्वरूपात राहिल्यामुळे सेवन केल्यानंतर शरीरातदेखील रक्तवाहिन्यांमध्ये घन स्वरूपात राहते. रक्तवाहिन्यांच्या आतील आवरणाला हे तूप चिकटून राहते. त्यामुळे रक्तपुरवठा सुरळीत चालू राहण्यास अडथळा निर्माण होतो व पर्यायाने उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, हृदयविकार असे आजार जडतात. शिवाय अपचन, गॅसेस इत्यादी तक्रारी लगेचच सुरू होतात.
या वनस्पती तुपामुळे एलडीएल हे खराब कोलेस्टेरॉल वाढते ज्यामुळे हृदयविकाराचा धोका निर्माण होतो. हे म्हणून वनस्पती तूप आहारातून पूर्णपणे वर्ज्य करायलाच हवे. वनस्पती तुपापासून बनविलेल्या पदार्थाचा उपवासाला वापर टाळणे हेच उत्तम.

पर्यायी पदार्थ

वनस्पती तुपाऐवजी घरी कढवलेले तूप, त्यातही गायीचे तूप वापरून पदार्थ करणे आरोग्यासाठी उपकारक. अन्यथा नैसर्गिक शेंगदाणा, करडई, सूर्यफूल, सोयाबीन या तेलांचा तोही मर्यादित वापर करावा. गायीचे साजूक तूप हे बुद्धिवर्धक, अग्नी प्रदीप्त करणारे आहे. या तुपामुळे एलडीएल, कोलेस्टेरॉल अजिबात वाढत नाही. त्यामुळे दोन चमचे रोज गायीचे तूप जेवणात घ्यावे व या वनस्पती तुपाला कायमचेच स्वयंपाकघरातून काढून टाकावे.

dr.sharda.mahandule@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health effects from harmful vegetable ghee amy