डॉ. उल्का नातू – गडम

बऱ्याच वेळा कामाला सुरुवात करताना मनात उत्साह नसतो. नैराश्याची भावना मनामध्ये दाटून येते, आत्मविश्वासाचा अभाव जाणवतो, उगाचच रडू येईल की काय असे वाटते. अपयशाच्या भीतीने मनाला ग्रासून टाकले जाते. अशावेळी काय करू असा प्रश्न पडतो. भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे

उद्धरेक्षत्मनात्मानं न आत्मानंवसादयेत।

आत्मैव ह्यात्मजो बन्धु : आत्मैवरिपुरात्मन:।

स्वत:ला उद्धारण्याचे किंवा खाली पाडण्याचे काम आपणच करीत असतो. आपण स्वत:च स्वत:चा मित्र असतो किंवा शत्रू.

स्वत:ला रक्तदाब अथवा मधुमेहाच्या मार्गावर नेण्यापेक्षा; सिंहगर्जना करून आपण आपल्या विश्वाचे राजे असल्याच्या वास्तवावर शिक्कामोर्तब करूया!

हे करण्यासाठी प्रथम वज्रासनाची स्थिती घ्या. आता दोही गुडघे एकमेकांपासून विलग करा. दोन्ही हात दोन्ही पायांखाली (उजवा हात उजव्या पायाखाली – डाव हात डाव्या पायाखाली) अशा रीतीने ठेवा की बोटे व अंगठा आत जातील. आता या स्थितीत मान वरच्या बाजूला वळवा. नजर दोन भुवयांच्या मध्ये स्थिर ठेवा. शरीरातील ताण काढून टाका. आता एक दीर्घ खोलवर श्वास घ्या.

जीभ तोंडातून जमेल तेवढी बाहेर काढा. श्वास सोडताना सुस्कारा टाकल्याप्रमाणे ‘आ’ असा आवाज तोंडातून काढा. जमेल तेवढा जबडा उघडून तोंडाच्या व चेहऱ्याच्या, मानेच्या स्नायूंचे आकुंचन करा, नाकातून श्वास घ्या व तोंडाने सोडा.

तीन ते पाच श्वास हा सराव केल्यावर जीभ आतमध्ये ओढून घ्या. क्षणभर वज्रासनात डोळे मिटून अंतर्मुख व्हा. नंतर वज्रासन सोडून बैठकस्थितीत या.

उदासीनता घालविण्यासाठी, रक्तदाब नियंत्रणासाठी ही कृती अतिशय उपयुक्त आहे.

Story img Loader