लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची कन्या आयएएस अधिकारी अंजली बिर्ला सध्या चर्चेत आहेत. त्यांनी पहिल्याच टप्प्यात युपीएससी परीक्षा पास केली होती. सध्या त्या रेल्वे मंत्रालयात कार्यरत आहेत. परंतु, त्यांची ही आयएएस पदवी वादग्रस्त ठरली आहे. ओम बिर्ला यांच्या राजकीय वरदहस्तामुळे त्या पहिल्याच टप्प्यात परीक्षा पास होऊ शकल्या असा आरोप केला जातोय. त्यामुळे नेमका हा वाद काय आहे? अंजली बिर्ला कोण आहेत? त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे? याविषयी जाणून घेऊयात.

अंजली बिर्लांवर कोणता आरोप?

युपीएससी परीक्षा ही सर्वात कठीण परीक्षा आहे. या परीक्षेसाठी उमेदवार त्यांच्या शालेय वयापासूनच तयारी करतात. परीक्षा पास होण्याकरता कठोर परीश्रम घ्यावे लागतात. त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात परीक्षा पास होणं सहज शक्य मानलं जात नाही. परंतु, काही उमेदवार या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होतात. त्यामुळे अंजली बिर्ला यांनी पहिल्याच परीक्षेत यश मिळवल्याने त्यांच्या यशावर संशयाची चादर आहे. अंजली बिर्ला यांनी कोणतीही परीक्षा पास न होता आणि कोणतीही मुलाखत न देता त्या आयपीएस झाल्या आहेत, असा दावा केला जातोय. तर, ओम बिर्ला यांच्या राजकीय वरदहस्तामुळे त्या आयपीएस होऊ शकल्या आहेत, असं म्हटलंय जातंय.

हेही वाचा >> सौभाग्य जपून बेरोजगार व्हायचं की आधुनिक राहून काम करायचं? बायानों, काय पटतंय तुम्हाला?

अंजली बिर्लांनी काय दिलं स्पष्टीकरण?

या आरोपांनंतर, अंजली बिर्ला यांनी हे दावे फेटाळून लावले आहेत. मी सर्व योग्य प्रोटोकॉलचे पालन केले असल्याचंही त्यांनी म्हटलंय. द क्विंट या वृत्तस्थाळाला त्यांनी प्रवेशपत्रही सादर केलं आहे. क्विंटने २०१९ च्या गुणवत्ता यादीमध्ये त्यांचा रोल नंबर देखील तपासला आणि हे सिद्ध झाले की त्यांनी प्रत्यक्षात प्राथमिक आणि मुख्य दोन्ही परीक्षा दिल्या आहेत. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने ऑगस्ट २०२० मध्ये एक राखीव यादी तयार केली. या यादीमध्ये सामान्य, OBC, EWS आणि SC यासह विविध श्रेणीतील ८९ उमेदवारांचा समावेश होता. याच यादीत अंजली बिर्ला यांचंही नाव होतं.

अंजली बिर्ला यांची शैक्षणिक पार्श्वभूमी काय?

ओम बिर्ला यांची सर्वात धाकटी मुलगी अंजली बिर्ला हिने कोटाच्या सोफिया शाळेत शिक्षण पूर्ण केले. अंजलीने शालेय शिक्षणानंतर दिल्ली विद्यापीठाच्या रामजस कॉलेजमध्ये राज्यशास्त्र (ऑनर्स) चे शिक्षण घेतले. याच सुमारास अंजलीने यूपीएससीची तयारी सुरू केली आणि पहिल्याच प्रयत्नात ती उत्तीर्ण झाली. २०१९ साली त्यांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल ऑगस्ट २०२० मध्ये लागला होता.

आयएएस अंजली बिर्ला यांनी पीटीआयला सांगितले होते की, “परीक्षेत निवड झाल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. मला समाजासाठी काहीतरी करण्यासाठी नागरी सेवांमध्ये सामील व्हायचे होते कारण मला माझ्या वडिलांची देशातील लोकांप्रती असलेली बांधिलकी नेहमीच दिसली.” तिने तिची मोठी बहीण आकांशाचेही कौतुक केले आणि सांगितले की तिने तिला सतत मार्गदर्शन आणि प्रेरणा दिली.