डॉ. सारिका सातव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोजच्या आहारातील पदार्थांमध्ये वातावरणानुसार पदार्थ तयार करण्याच्या पद्धतींमध्ये बदल केला पाहिजे. गैरसमजुतींमुळे बरेचसे पदार्थ हिवाळ्यात टाळले जातात. तसे न करता काही बदल करून ते आहारात वापरले तर योग्य ठरेल.

त्यातील काही पदार्थ खालीलप्रमाणे –

  • दूध घेताना सुंठ, हळद टाकून उकळवून घ्यावे, म्हणजे त्यामुळे कफ होणार नाही.
  • दही घेण्याऐवजी ताक घ्यावे व ते मिरपूड टाकून घ्यावे, तसेच ते ताजे असावे.
  • सर्व जेवण शक्यतो गरम असतानाच खावे, परत परत अन्न पदार्थ गरम करू नये.
  • भाज्यांचे सूप गरम असताना जिरेपूड, मिरपूड, दालचिनी टाकून घ्यावे. (प्रमाणात)

आणखी वाचा : …अन्यथा ‘डाएट’च्या नादात प्राण गमवाल!

  • आवळ्याचे विविध पदार्थ आहारात असावेत. उदाहरणार्थ च्यवनप्राश, आवळा सरबत, आवळा कॅण्डी, मोरावळा इत्यादी. आवळा ‘क’ जीवनसत्वाचा उत्तम स्रोत आहे. त्याच्या नियमित सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
  • तीळ, शेंगदाणे, जवस इत्यादी पदार्थांच्या चटण्या आहारामध्ये वापराव्यात. त्याद्वारे हिवाळ्यात आवश्यक असणारी स्निग्धता व उष्णता आपल्या शरीराला मिळते.
  • चहा करताना आले, तुळस, गवती चहा, वेलची इत्यादी पदार्थ घालून बनवावा.
  • पिण्याचे पाणी कोमट असावे.
  • आहारात गाईचे तूप (शक्यतो घरी तयार केलेले), ताजे लोणी घ्यावे.
  • हिवाळ्यात स्वयंपाकामध्ये मोहरीचे तेल, तीळ तेल वापरता येईल.
  • बदाम, आक्रोड, पिस्ता, काजू इत्यादी सुकामेवा रोज प्रमाणात खाण्यास हरकत नाही.
  • लसूण, आले रोजच्या भाजीमध्ये वापरावे.
  • बाजरी, नाचणी रोजच्या आहारामध्ये जरूर वापरावी.
  • कच्चे सॅलड, जिरेपूड, लिंबू, मिरपूड टाकून रोज खावे.

आणखी वाचा : बघतोय रिक्षावाला… आरशातून !

सुकामेवा आवश्यक
कमी प्रमाणात घेऊनसुद्धा जास्त प्रमाणात ऊर्जा, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिज देणारे पदार्थ म्हणजे सुकामेवा. हिवाळ्यात पचनशक्ती चांगली असल्याने व स्निग्ध पदार्थाची गरज असल्याने सुकामेवा घेण्यासाठीचा हा उत्तम काळ. शरीराला सुक्यामेव्यामुळे खूप फायदे मिळतात.

बदाम – उत्तम प्रकारचे स्निग्ध पदार्थ यातून मिळतात. रक्ताल्पता, हृदयाच्या विविध व्याधी, काही प्रकारचे कर्करोग, केसांच्या व त्वचेच्या विविध तक्रारी, कृशता, मधुमेह, स्थौल्य इत्यादी अनेक व्याधींमध्ये बदामाचा खूप चांगला उपयोग होतो. बदाम आदल्या रात्री भिजवून ठेवल्यास सकाळी त्याच्या साली सहज निघू शकतात. त्या साली पचनास कठीण असल्याने सालीशिवाय खाणे योग्य.

मनुका – यात तंतुमय पदार्थ जास्त असतात. रक्ताल्पता, मलबद्धता, शरीरातील अतिरिक्त उष्णता, हाडांचे विकार, स्थौल्य, डोळ्यांचे आजार इत्यादी अनेक व्याधींमध्ये याचा उपयोग होतो.

आणखी वाचा : नातेसंबंध : नातं दुरावणाऱ्या भेटवस्तू द्याव्यातच कशाला?

काजू – प्रथिने, चांगल्या प्रकारचे स्निग्ध पदार्थ यात असतात. हृदयविकार, बऱ्याच प्रकारचे कर्करोग, दातांचे, हाडांचे, विकार, रक्तवाहिन्यांचे विकार, स्थौल्य, मासिक पाळी बंद झाल्यानंतरच्या तक्रारी इत्यादी अनेक व्याधींमध्ये ते उपयोगी आहेत.

पिस्ता – यात चांगल्या प्रकारचे स्निग्ध पदार्थ, प्रथिने, तंतुमय पदार्थ असतात. डोळ्यांचे विकार, मधुमेह, हृदयविकार, मलबद्धता, कोलेस्टेरॉलच्या तक्रारी अनेक व्याधींमध्ये ते उपयोगी आहेत.

अक्रोड – याला बुद्धीचे खाद्य म्हणून ओखळले जाते. ओमेगा-३ नावाचे चांगले स्निग्ध पदार्थ यात असतात. अस्थमा, संधीवात, सोरायसिस, निद्रानाश, मलबद्धता, कर्करोग, अल्झमायर इत्यादी विकारांमध्ये उपयोगी.

आणखी वाचा : कळ्यांचे ‘ते’ दिवस …

खजूर- तंतुमय पदार्थ, भरपूर प्रथिनेही यात असतात. मलबद्धता, आतड्यांचे विकार, कृशता, हृद्रोग, रक्ताल्पता इत्यादींमध्ये उपयोगी.

सर्व सुक्यामेव्यात चांगल्या प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात. म्हणजे ताणतणावामुळे शरीरात तयार होणाऱ्या विषारी द्रव्यांचा निचरा त्याच्यामुळे चांगला होतो. वैयक्तिक तक्रारी आणि पचनशक्ती यानुसार त्याच्या सेवनाचे प्रमाण ठरवावे.
dr.sarikasatav@rediffmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In winter what else should be there in you meal healthy food vp
Show comments