आपल्याकडील बहुतेक स्त्रिया देवधर्माच्या दृष्टिकोनातून उपवास करतात. उपवास जर चुकीच्या पद्धतीने केला तर त्याचे आरोग्यावर अनिष्ट परिणाम होऊ शकतात. उलट, उपवासाचे शास्त्रीय महत्व समजून घेऊन स्त्रियांनी उपवास केल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकून राहण्यास मदत होते हे लक्षात घेतलं पाहिजे. 

उपवास करण्याचं महत्व प्राचीन काळापासून विविध धर्मात सांगितलं आहे. उपवास करणं केवळ देवधर्माच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीने देखील महत्वाचं आहे याचा शास्त्रीय पुरावा मिळत आहे. काही स्त्रियांना, ‘तुम्ही उपवास का करता?’ असा प्रश्न विचारला तर नक्की कारण देखील सांगता येत नाही. घरातील एक रूढी, किंवा प्रथेचं पालन करायचं म्हणून त्या उपवास करत असतात. काही स्त्रिया कुठल्यातरी अपेक्षेपोटी किंवा नवस बोलल्यामुळे उपवास करतात. त्यांना उपवास हा आरोग्यासाठी महत्वाचा आहे, हे समजावून सांगणं गरजेचं आहे. हिंदू धर्मात, पुरुषापेक्षा स्त्रिया जास्त संख्येने उपवास करत असाव्यात असं मला वाटतं. कारण बरेच नवरे, आपल्या बायकोबद्दल डॉक्टरकडे तक्रार करताना सांगतात, ‘डॉक्टर, हिला जरा समजावून सांगा, माझ्या मते हिच्या अशक्तपणाचं मुख्य कारण म्हणजे, तिचे उपवास. आज काय मंगळवार, उद्या चतुर्थी, परवा काय गुरुवार नंतर अजून काही, कधी-कधी उपवासाची ही मालिका आठवडाभर देखील चालू राहू शकते.’ 

हेही वाचा >>>सावत्र आईऐवजी जैविक आईचे नाव लावणे हा मुलीचा अधिकारच!

उपवास ज्या प्रमाणात आणि ज्या पद्धतीने केले जातात त्यात आरोग्याचा फारसा विचार जात नाही असं वाटतं. उपवासाबद्दलची गंमत अशी आहे की, उपवास म्हटलं की, लोक विचारतात, ‘अमुक खाल्लं तर उपवासाला चालतं का?’ किंवा ,‘मी जेवणार नाही, कारण माझा आज उपवास आहे, ’ असं म्हटल्याबरोबर, ‘मग अमुक हे खा, हे उपवासाला चालतं’ म्हणून आग्रह केला जातो आणि उपवास करणारे लोक उपवास असून देखील भरपूर खातात. 

उपवास या शब्दाची उकल केल्यास असं लक्षात येईल की, उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणं. उपवासाच्या कालावधीत देवाच्या सानिध्यात राहणं. वास्तविक पहाता, ‘उपवासाला चालणारे’ तथाकथित पदार्थ न खाता, एकतर आपलं दैनंदिन काम करावं किंवा धार्मिक कार्यात श्रद्धेने सहभागी व्हावं. त्यामुळे पचनसंस्थेला आराम मिळेल आणि मन देखील शांत राहील. उपवास आहे म्हणून जेवण न करणे आणि त्या ऐवजी जास्त वेळेस चहा पिणं हे जास्त उपायकारक असतं.आपल्या जठरामध्ये, आपण जेवण करो अथवा न करो आम्ल किंवा ॲसीड तयार होतच असतं. नेहमीसारखं वेळेवर जेवण न करता, उपवास आहे म्हणून, चहा-कॉफी, साबुदाण्याची खिचडी, बटाट्याचे तळीव पदार्थासारखे आम्लपित्त वाढवणारे पदार्थ खाल्याने पचनक्रिया बिघडणार. उपवास करून पचनसंस्थेला आराम देण्याची संधी गमावून, उलट या पद्धतीने उपवास करून पचनसंस्थेवर आपण अन्याय करत आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. उपवास किंवा एकादशीच्या दिवशी उपवासाचे विविध पदार्थ जास्त प्रमाणात खाणे आणि दुसऱ्या दिवशी द्वादशी म्हणून पुरण-पोळीचं भरपेट जेवण करून अजीर्ण झालं किंवा पोट बिघडलं म्हणून रुग्ण जेंव्हा डॉक्टरकडे येतात, तेंव्हा त्यांना उपवासाचा खरा अर्थ समजला नाही असं म्हणावं लागेल. 

हेही वाचा >>>लहान वयातच आई गमावली, परिस्थितीचे चटके सहन केले पण हार मानली नाही; बनली सिक्कीमची पहिली महिला आयपीएस

उपवासाला भावनेचा प्रश्न करून घरात तणावाचं वातावरण तयार करू नये. आज सकाळचा चहा पिताना, बिस्कीट खाण्यात आलं, मंगळवार आहे लक्षातच नाही, उपवास मोडला. झालं! आता जेवायचंच नाही असा अतिरेक नको. आमच्या सासूबाईचे उपवास संपतच नाहीत. दर चार दोन दिवसांनी उपवास असला की, खायला अमुक करून द्या, तमुक करून द्या अशी मागणी करत राहातात, अशा तक्रारी देखील सुना करतात. उपवास आणि उपवासाचे पदार्थ सासू-सुनेच्या संबंधात ताणतणावाचे प्रसंग निर्माण करत असतील तर त्या उपवास करण्याला काही अर्थ नाही. 

तसेच ज्या स्त्रिया सलग ९ दिवस वगैरे कडक उपवास करतात त्या घरात शांत बसून राहतात अथवा विश्रांती घेतातच असं नाही. घरातील रोजची कामं तर करावीच लागतात, किंबहुना ते काम करत असताना आपण उपवास करू शकतो, ही बाब त्यांना भूषणावह वाटते. उपवास करत असताना अधिकची काम केल्यास प्रकृती खालावते हे लक्षात घेतलं पाहिजे. 

उपवास करणं गरजेचं आहे का? या प्रश्नाचं उत्तर ‘हो’ असंच आहे, पण ज्या पद्धतीने आपण उपवास करतो त्या पद्धती आरोग्यास धोकादायक आहेत याचा विचार झाला पाहिजे. आपल्याकडे उपवास करण्यामागे देवधर्म, धार्मिक भावनांना जास्त महत्व दिलं जातं. आपल्या शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी ‘उपवास’ हा काळाच्या कसोटीवर प्रमाणित झालेला नियम आहे. उपवासाच्या विविध पदार्थांची जाहिरात करून, एकादशीच्या दिवशी ते पदार्थ ‘चेंज’ म्हणून एकमेकांना आग्रहपूर्वक खाऊ घालणे तसा ‘आत्मघातकी’ प्रकार आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. 

लेखक एम. डी. (स्त्री रोग आणि प्रसूतिशास्त्र ) पीएच.डी.(समाजशास्त्र ) एम.एस( काउन्सेलिंग आणि सायकोथेरपी) आहेत.

atnurkarkishore@gmail.com