प्रिय साऊमाई,

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Savitribai Phule Biography : आज तुझी १९३ वी जयंती. ६६ वर्षांच्या तुझ्या आयुष्यात तू पुढे अनंत वर्षं टिकू शकेल, असं कार्य केलंस. स्त्रीउद्धारासाठी आपलं सर्वस्व वाहून जोतिरावांच्या समाजोद्धाराचा वसा तू पुढे नेलास. खऱ्या अर्थानं तू तुझा पत्नीधर्म निभावलास. तुझ्या या कार्याला सलाम करावा तितका कमी आहे. कारण- तू होतीस म्हणून मी आज तुझ्यासाठी लॅपटॉपवर बोटं फिरवून काहीतरी लिहू शकतेय.

ज्या काळात स्त्रीला स्वतःच्या अस्तित्वाचीही जाणीव झाली नव्हती, त्या काळात तू स्त्रियांना त्यांच्या हक्क आणि अधिकारांची जाणीव करून दिलीस. ही जाणीव फक्त शिक्षणातून येऊ शकते, हेही तू जाणलंस. त्यामुळे आजूबाजूच्या गरजू, एकल महिलांना बरोबर घेऊन, त्यांच्या शिक्षणाचा वसा उचललास. त्यासाठी निश्चितच तुला जोतिरावांचं सहकार्य लाभलं; पण समाजाच्या विरोधात जाऊन परंपरेविरोधात तू मोठा लढा उभा केलास, त्यासाठी प्रचंड मोठी इच्छाशक्ती आणि बळ लागतं. आजही समाजात अनेक अनिष्ट रूढी-परंपरा आहेत. या रूढी-परंपरेविरोधात लढताना आजच्या एकविसाव्या शतकात अनंत अडचणी येतात. आजचा समाज शिक्षित, तांत्रिक साक्षर असतानाही परंपरेला जखडून आहे. कालबाह्य विचारांना आपली संस्कृती मानून महिलांवर अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याविरोधात लढताना फुलेविचारांनी प्रेरित असलेल्या कार्यकर्त्यांना अडचणींचा डोंगर पार करावा लागतोय. त्यामुळे अल्पशिक्षित, स्वातंत्र्यपूर्व काळात तुम्ही या गोष्टी कशा साध्य केल्या असतील याची कल्पनाही न केलेली बरी!

साऊमाई, तुझा फोटो पाहिला तरी ऊर्जा मिळते. पारंपरिक जोखडात अडकलेल्या लोकांना नव्या विचारांचा मार्ग दाखवताना तुझ्या विचारांची ज्योत पेटवावी लागते. पण, काही लोकांना सावित्रीमाई कोण हेच माहिती नसतं, त्यावेळी मात्र अपार दुःख होतं. इतर महापुरुषांना आपले आदर्श मानताना हा समाज मात्र तुला आजही स्वीकारताना दिसत नाही. तुझ्या क्रांतिकारक निर्णयानं आज जग बदललंय; पण तुझी साधी दखलही आजच्या पिढीतील लोकांना घ्यावीशी वाटत नाही.

हेही वाचा >> ऐतिहासिक ठरलेला भिडे वाडा मुलींच्या शाळेसाठी कसा मिळाला? वाचा वैचारिक पाठिंबा मिळालेल्या मैत्रीची गोष्ट!

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक आदींसह विविध महापुरुषांचा यथोचित सन्मान केला जातो. त्यांच्या कार्याची दखल घेतली जाते; पण साऊमाई तुझा त्याग सहज विसरला जातो आणि खेदजनक म्हणजे हे सर्वाधिक महिलावर्गांकडून होतं. निदान महिलांनी तरी तुझ्या योगदानाची जाणीव ठेवून तुझ्या कार्याचा वसा पुढे नेला पाहिजे. तुझ्या काळात तुझ्याभोवतालची महिलावर्गाची कुचंबणा तू हेरलीस. त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलास. त्यासाठी तू समाजाचा विरोध पत्करलास. त्याचं प्रतीक म्हणून मुली व महिला शिकू शकल्या, कमवू शकल्या.

समाजातील रूढी-परंपरांना छेद देऊन नवविचारांची कास धरायला लावणारी तुझी विचारसरणी आजच्या काळाशी सुसंगत आहे. २८ नोव्हेंबर १८९० साली जोतिबा फुलेंचं निधन झालं तेव्हा तू फक्त अश्रू ढाळत बसली नाहीस. त्यांच्या अंत्यविधीलाही एक नवा पायंडा पाडून दिलास. जोतिरावांच्या अंत्यविधीला कुटुंबातील विरोध झुगारून ज्योतिबांच्या पार्थिवाला अग्नी दिलास. ही घटना वरवर पाहता, साधी दिसत असली तरीही कर्मठ आणि रूढीवादी समाजात कालबाह्य प्रथांना तिलांजली देण्याचं धाडस सोपं नव्हतं. तुझ्या या धाडसामुळे आज कित्येक मुली आपल्या प्रियजनांच्या पार्थिवाला खांदा देतात. त्यांची अंत्ययात्रा आपल्या खांद्यावरून काढतात. अर्थात, या गोष्टीला आजही विरोध होतोच; पण तू पायंडा घालून दिल्याने पुढच्या पिढीला धाडस करण्याचं बळ मिळालं. फरक इतकाच की, हे तुझ्यामुळे साध्य होऊ शकलंय, याची जाणीव मात्र फार कमी मुलींना असते.

हेही वाचा >> विश्लेषण : वयाच्या ९ व्या वर्षी लग्न, १७ व्या वर्षी मुलींसाठी पहिली शाळा, वाचा सावित्रीबाईंचं संपूर्ण जीवनकार्य…

आज समाजात आंतरजातीय विवाहांचं प्रस्थ आहे. अनेक घरांत हसतमुखानं आंतरजातीय विवाहाला मान्य दिली जाते. आंतररधर्मीय विवाहही मोठ्या आनंदानं स्वीकारले जातात. पण, याचा पायंडा कोणी पाडला? आपल्या दत्तकपुत्राचा विवाह कार्यकर्ता ज्ञानोबा ससाणे यांच्या मुलीशी करून देऊन महाराष्ट्रातील पहिला आंतररजातीय विवाह तू घडवून आणलास. यशवंत हा सावित्री आणि जोतिबा फुले यांनी दत्तक घेतलेला मुलगा. तो विधवेचा मुलगा असल्यानं त्याच्याशी कोणी लग्नास तयार होईना. तेव्हा सावित्रीबाईंनी पुढाकार घेऊन आंतरजातीय विवाह लावला. या विवाहानंतरही अनेक घरांत आंतरराजातीय विवाहाला विरोध होत होताच; पण तुझ्या पुढाकारामुळे आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना बळ मिळालं. त्याची परिणती म्हणून आज सहज आंतरजातीय विवाहांना मान्यता मिळते.

केशवपनाविरोधातही तू मोठा लढा उभारलास. पतीनिधनानंतर पत्नीचं केशवपन करण्याची अमानुष प्रथा तू तुझ्या हिमतीनं बंद पाडलीस. त्यासाठी नाभिकांचा मोठा संप घडवून आणलास. त्यामुळे राज्यातील केशवपन प्रथा कायमस्वरूपी बंद झाली. आज विधवा महिलांना समाजात मानाचं स्थान आहे. त्यांना इतर कार्यक्रमांतही आनंदानं आणि सन्मानानं बोलावलं जातं. २०० वर्षांपूर्वी केलेल्या तुझ्या धाडसाचा परिणाम आज जाणवतोय.

१८९७ साली पुण्यात प्लेगची साथ पसरली. त्यावेळी तू तुझ्या जीवाची पर्वा न करता, समाजासाठी लढलीस. जोतिरावांनी ज्या पद्धतीनं कार्य केलं असतं, त्या पद्धतीनं सावित्रीमाई तू त्या काळात कार्य केलंस. जोतिरावांचा वसा नेटानं चालवून स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांना सावरण्याचा प्रयत्न केलास; पण यातच गफलत झाली अन् प्लेगनं तुलाच गाठलं. त्यातच तुझा मृत्यू झाला अन् हा समाज एका क्रांतिकारी, धाडसी व कृतिशील नेतृत्वाला मुकला.

आज तुझी जयंती. तुझ्या जयंतीनिमित्तानं अनेकांच्या डीपी, स्टेट्सवर तुझे फोटो झळकले आहेत; पण तुझं कार्य फक्त डीपी, स्टेटसपुरतं मर्यादित नव्हतं. ते अथांग आणि अफाट होतं. तुझ्या कार्याचा आवाका ठरावीक समाजाच्या पलीकडे गेलेला होता. तू ज्या पद्धतीनं समाजासाठी करून ठेवलंस, त्या बदल्यात तुझा सन्मान होत नाही याची खंत आहे. अनेक महिला, तरुणींना सावित्रीमाई कोण हे माहीत नाही. शाळेत कोणत्या तरी इयत्तेत शिकवलेली एक ऐतिहासिक क्रांतिकारक महिला यापलीकडे कोणाला ज्ञान नसतं. तुझ्या कार्यानंतर आम्ही तुला विसरलो. पण, तुझ्यासारख्या साऊमाईंची आजही समाजाला गरज आहे हेही तितकंच खरं!

तुझीच लेक

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Open letter to savitribai phule on her birth anniversery know about indias first female teacher and her work for society chdc sgk
Show comments