अंकित रुचिकासोबत गणिताच्या अभ्यासाला बसला होता.
“अरे, अंकित, कुठे लक्ष आहे? पेंगतोयस का?”
“पेंगत नाहीये ग आई, आठवतोय.”
तिसरीतल्या अंकितचा गणित अगदी लाडका विषय. पण हल्ली हल्ली तो गणिताचा होमवर्क टाळतोय किंवा होमवर्कला बसला तरी त्याचं लक्षच नसतं अशी रुचिकाला शंका येत होती. आजही तसंच होतंय असं पाहून तिनं टोकलंच त्याला.
“काय होतंय तुला? गणिताचं होमवर्क टाळतोयस का हल्ली? अभ्यास करायला पाहिजे राजा आता, परीक्षा जवळ आली. मग परत कमी मार्क पडले की…”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : प्रायव्हेट पार्टचा सैलपणा, जळजळ घालवण्यासाठी गरम पाण्यात मीठ घालून आंघोळ करावी का? तज्ज्ञ सांगतात…

रुचिकाची नेहमीची रेकॉर्ड सुरू झालीच, पण अंकित पडलेल्या आवाजात म्हणाला,
“आई, अगं, मला गणित येतच नाहीये असं वाटतंय काही दिवसांपासून.”
“का रे? अवघड जातंय का? वर्गात काही झालं का? बाई काही बोलल्या का?” तिनं धास्तावून विचारलं.
“नाही गं, मला ना, गणिताच्या तासाला लक्षच देता येत नाही.”
‘गणित येत नाहीये, लक्ष लागत नाहीये’ असं अंकितच्या बाबतीत होणं विशेष होतं. पण त्यानंच सांगितल्यानंतर रुचिका अस्वस्थ झाली. दुसऱ्याच दिवशी गणिताच्या शिक्षिकेला भेटली. ‘वर्गात काही घडलंय का? अंकितनं काही वेडेपणा केला का? तुम्ही रागावलात का त्याला?’ तिनं प्रश्नांचा भडिमारच केला जवळजवळ. पण तसं काहीच नव्हतं. उलट त्यांनीच नवलाने विचारलं, “अंकितला गणित समजत नाही असं वाटतंय? आश्चर्य आहे. त्याला अगदी व्यवस्थित समजतंय, कारण कालचीसुद्धा सगळी गणितं बरोबर सोडवली त्याने. वर्गात काही भांडणं, रागवारागवी झाल्याचं मला तरी आठवत नाही. अंकितला असं का बरं वाटत असेल?” टीचर आठवायला लागल्या आणि काय झालं असावं ते त्यांच्या लक्षात आलं.

आणखी वाचा : Open letter : माय डिअर सासूबाई तुम्हीही कधीतरी… तुमच्या होणाऱ्या सुनेचे खास पत्र

“अहो, गेल्या आठवड्यापासून वर्गात थोड्या अवघड कन्सेप्ट शिकवणं सुरु आहे. अंकितला आणि आणखी दोघातिघांना फारसं शिकवावंच लागत नाही. पटकन समजतं, पण सगळ्या वर्गाला समजेपर्यंत मला पुन्हापुन्हा समजावून सांगावं लागतं. एकदा कन्सेप्ट समजल्यावर तेच तेच ऐकण्याचा आणि त्याच प्रकारची गणितं सोडवायचा त्याला कंटाळा येत असणार. वर्गात बसायला कंटाळा येत असणार आणि त्या अस्वस्थ वाटण्याचा अर्थ, आपल्याला गणितच नकोसं झालंय, समजत नाहीये असा घेतला असणार त्याच्या मनानं. लहान मुलांना नेमकं कळत नाही.” बाई हसत म्हणाल्या.

आणखी वाचा : विवाह समुपदेशन : सासूबाई अतिस्वच्छतेच्या मागे आहेत?

“काही मुलं अशी कंटाळली की इतरांच्या खोड्या काढतात किंवा मस्ती करतात. त्यामुळे दरवेळी त्यांना मस्तीबद्दल रागवून चालत नाही. त्यांचा कंटाळासुद्धा कधीकधी पॉझिटिव्हली समजून घ्यावा लागतो. उद्या मी वेगळा प्रयोग करते. मुलांची एक छोटी टेस्ट घेते आणि ज्यांना ती जमेल त्या मुलांना थोडी अवघड गणितं सोडवायला देते. चॅलेंज आला की कंटाळा पळून जाईल त्याचा आणि वर्गाचा सुद्धा.”
बाईंचं बोलणं ऐकून रुचिकाची चिंता मिटली. परतताना ती विचार करत होती,
‘अंकितच्या शब्दांचा नेमका काय अर्थ घ्यायचा, ते बरोबर समजलं बाईंना. आपल्याला मात्र ‘आता कसं होणार?’ याची प्रचंड काळजी वाटली, आणि ‘अभ्यास करणं कसं महत्वाचं आहे, याचं फक्त लेक्चर देत होतो आपण अंकितला. यापुढे आपल्याला ज्याची भीती वाटते, त्याबद्दल लेक्चर द्यायचं की त्याच्या बोलण्यातलं ‘बिटवीन द लाइन्स’ ऐकायचा प्रयत्न करायचा हा चॉइस आपल्याकडे आहे. एकदा त्याला एखादी कन्सेप्ट कळलीय म्हटल्यावर पुन्हापुन्हा तशीच गणितं सोडवायला लावायची नाहीत. इंटरनेट वरून किंवा कोड्यांच्या पुस्तकातून गणिताची कोडी शोधून त्याच्या बुद्धीला चॅलेंज दिला तर इंटरेस्ट नक्की वाढेल. इतर विषयांच्या बाबतीत सुद्धा असंच काहीतरी शोधता येईल. टिपिकल धास्तावलेली काळजीवाहू ‘पालकगिरी’ करायची की ‘समंजस पालकपणा’तून मुलांचा कंटाळाही पॉझिटिव्हली समजून घ्यायचा हा चॉइस आई-बाबा आणि टीचर यांच्याच हातात असतो, नाही का?’ रुचिका समाधानाने हसली.
(लेखिका रिलेशनल कॉन्सिलर आहेत)
neelima.kirane1@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parenting choice is ours reading between the lines in childerns conversation vp