आपल्याला कॅन्सर झाला आहे हे समजाच संबंधित रुग्ण व त्याचे नातेवाईक पुरते हादरून जातात. कॅन्सरवरील उपचार आणि त्यासाठी लागणारं आर्थिक आणि मानसिक बळ फार महत्त्वाचं असतं. अनेकदा आर्थिक बळ मिळतंही, पण कॅन्सरशी लढा देताना लागणारं मानसिक बळ मिळणं खूप महत्त्वाचं असतं. कारण कॅन्सरशी लढा देण्यासाठी तुमच्याकडे मानसिक बळ असेल तर तुम्ही कॅन्सरविरोधातली अर्धी अधिक लढाई जिंकू शकतात. कॅन्सरग्रस्त रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना हेच मानसिक बळ देण्याचं व कॅन्सरीविषयी मार्गदर्शन करण्याचं काम आधाररेखा प्रतिष्ठानद्वारे रश्मी जोशी करतात.

रश्मीताईंचे पती अरविंद जोशी यांना कॅन्सर झाला आणि त्या स्वत: या चक्रात अडकल्या. कॅन्सर रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना येणाऱ्या अडचणी, वेदना या त्यांनी जवळून पाहिल्या, अनुभवल्या. कॅन्सरवरील उपचार घेताना आपल्या वाट्याला आलेला त्रास दुसऱ्या कोणाला हाेऊ नये या भावनेतून मे २०१३ साली जोशी दाम्पत्यानं ‘आधाररेखा प्रतिष्ठान’ची स्थापना केली.

हेही वाचा – CS परीक्षा उत्तीर्ण आहे “या’ प्रसिद्ध भारतीय क्रिकेटरची पत्नी! आता केक विकून कमावते कोटींमध्ये नफा, कोण आहे ती?

या संस्थेमार्फत कॅन्सरग्रस्त व त्यांच्या कुटुंबियांना विनामूल्य साहाय्य करण्याच्या कामाला सुरुवात केली. संस्थेचं काम सुरू असतानाच २०१७ साली त्यांच्या पतीचं निधन झालं, तरीही त्यांनी संस्थेचं काम थांबू दिलं नाही. सुरुवातीला अगदी एकहाती संस्थेचा कारभार सुरू ठेवला. पण त्यांच्या कामातील प्रामाणिकपणा आणि त्यांच्यात कॅन्सरग्रस्तांविषयी असलेली सहृदयता पाहून समाजकार्यासाठी उत्सुक असलेले अनेक लोक त्यांच्या या कामी सहभागी झाले. या संस्थेतर्फे कॅन्सर निदान शिबिर, कॅन्सरग्रस्त व त्यांच्या नातेवाईकांना मार्गदर्शन केलं जातं.

या संस्थेत वय वर्षे २० ते ७० वयोगटातील सदस्यांचा समावेश आहे. रश्मीताईंनी या संस्थेच्या माध्यमातून ठाणे शहरातीलच नव्हे तर मुंबई तसेच उपनगरातील कॅन्सरग्रस्त आणि त्यांच्या कुटुंबियांना सहकार्य केले आहे. आतापर्यंत एक हजाराहून अधिक रुग्ण संस्थेच्या संपर्कात आले असल्याचे रश्मी ताई सांगतात.

संस्थेतर्फे कॅन्सरग्रस्त किंवा त्यांच्या नातेवाईकांना केवळ मार्गदर्शनच नाही तर त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. कॅन्सरग्रस्तांना उपचारांबराेबरच त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची मानसिक स्थिती स्थिर असणंदेखील गरजेचं असतं असं त्या आवर्जून सांगतात. संबंधित रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक या आजारामुळे खचले जाऊ नयेत, शेवटपर्यंत त्यांची जगण्याची उमेद टिकून राहावी, याकाळातही त्यांनी आनंदी रहावं यासाठी ही संस्था मार्गदर्शन करते. एक प्रकारची नवी उमेद देण्याचं काम त्यांच्या संस्थेतर्फे केलं जातं.

संस्थेच्या वतीनं आरोग्याविषयीची माहिती देण्यासाठी ‘आरोग्यजत्रा’ आयोजित करण्यात येते. तसंच जे रुग्ण कॅन्सरमधून बरे झाले आहेत अशांसाठी ‘कर्कयोद्धा आधारमैत्र’ हा मनोरंजनात्मक उपक्रम आठवड्यातून एक दिवस राबविण्यात येतो. यामध्ये एक दिवस सहभोजन, सहल, सांगितिक कार्यक्रम, चर्चासत्र यांसारखे अनेक उपक्रम राबविले जातात. तसेच कॅन्सरच्या रुग्णांसाठी ‘आधारसाधना’ या नावाने योगवर्ग घेतले जातात. हे योगवर्ग ठाण्यातील घंटाळी मित्रमंडळ यांच्यासोबत आठवड्यातून तीन दिवस घेतले जातात. तर ठाणे जिल्ह्यात प्रथमच या संस्थेच्या वतीने ‘कर्करोग माहिती केंद्र’ उभारण्यात आले आहे. इथे रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना मोफत मार्गदर्शन करण्यासह त्यांचे समुपदेशनदेखील केलं जातं. हे केंद्र मंगळवार आणि गुरुवार या दोन दिवशी सुरू असतं. या केंद्रावर वैद्यकीय मार्गदर्शन तसंच रुग्णांना आर्थिक मदत लागल्यास ती कशी मिळवता येईल यासाठी मार्गदर्शन केलं जातं.

‘आधाररेखा प्रतिष्ठान’च्या वतीनं वर्षातून तीन कार्यक्रम साजरे केले जातात. त्यात मे महिन्यात संस्थेचा स्थापना दिवस, सप्टेंबर महिन्यात ‘रोझ डे’ साजरा करण्यात येतो, तर नोव्हेंबर महिन्यात ‘अरविंद स्मृती आधार संवादमाला‘ हा कार्यक्रम आयोजित केला जातो. यामध्ये वैद्यकीय, आहारशास्त्र, मानसशास्त्र, मुद्राशास्त्र आणि योगाभ्यास याविषयावर तज्ज्ञ मंडळीची व्याख्याने होतात. तसंच कर्करोग निदान शिबीर, घोषवाक्य स्पर्धा, पाककला स्पर्धा अशा विविध स्पर्धादेखील संस्थेच्या वतीने आयोजित केल्या जातात. यामध्ये कर्कयोद्ध्यांचा विशेष सहभाग असतो.

हेही वाचा – ८००,००० डॉलर्स मॅकआर्थर फेलोशिप मिळालेल्या शैलजा पाईक कोण आहेत?

संस्थेतर्फे कॅन्सर संबंधित विविध माहिती देणाऱ्या १०० हून अधिक पुस्तकांचे वाचनालय चालवले जाते. या रुग्णांना साहाय्य म्हणून रश्मीताईंनी ‘आधारवाहिनी’ हा उपक्रम देखील सुरू केला आहे. जानेवारी २०२१ पासून या उपक्रमाला सुरुवात झाली. ही विनामूल्य टॅक्सीसेवा ठाणे ते परळ येथील टाटा रुग्णालय अशी सुरू होती. आता ठाणे ते खारघर येथील टाटा रुग्णालय अशी सेवाही सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा लाभ ठाण्यासह, मुंबई तसेच उपनगरातील रुग्णदेखील घेत आहेत. या आधारवाहिनी टॅक्सीसेवेचा दर महिन्याला ३५ ते ४० रुग्ण लाभ घेत आहेत.

अनेकजण आपल्या वाट्याला जो त्रास आला त्याविषयी दु:ख करत बसतात, पण जोशी दाम्पत्याने या दु:खाच्या पलीकडे जाऊन काम करण्याचं ठरवलं. कॅन्सरग्रस्तांच्या वाटेवरील अडथळे दूर करून त्यांचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न केला. पतीसोबत सुरू केलेला समाजसेवेचा प्रवास त्यांच्या निधनानंतर रश्मी जोशी यांनी त्याच उमेदीने सुरू ठेवला आहे आणि त्याचा विस्तार केला आहे. रश्मीताई कॅन्सरग्रस्तांसाठी आधारवड आहेत.

purva.sadvilkar@expressindia.com