नाशिकच्या देवळा तालुक्यातील विठेवाडी या छोट्या गावातील अश्विनी बोरसे हिची ‘आयआयटी’मध्ये शिक्षणासाठी निवड झाली आहे. तिच्यासह जिल्हातील पाच मुली आणि दोन मुले अशा सात जणांनी जिल्हा परिषदेच्या अनुसूचित जाती-जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या ‘सुपर ५०’ या नाविन्यपूर्ण उपक्रमात सहभाग घेत यश संपादन केले. ‘आयआयटी’मध्ये शिकण्याची संधी प्राप्त केली. पण त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. स्पर्धा परीक्षेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थिनींचा स्पर्धा परीक्षांमध्ये वाढणारा टक्का लक्षणीय आहे. अशा वेळी या सर्वांची गोष्ट वेगळी आणि प्रेरणादायी.

नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून ‘सुपर ५०’ या उपक्रमांतर्गत २०२२ ते २०२४ या काळात अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील ५० विद्यार्थ्यांना ‘जेईई’, ‘सीईटी’ व ‘जेईई ॲडव्हान्स’ या परीक्षांसाठी निवासी स्वरूपाचे प्रशिक्षण देण्यात आले. या ५० विद्यार्थ्यांतील ‘जेईई ॲडव्हान्स’परीक्षा दिलेल्या २२ पैकी ७ विद्यार्थ्यांनी त्यात चमकदार कामगिरी केली आहे. यात ५ मुली आहेत.

आणखी वाचा-सावित्रीबाई खानोलकर… परमवीर चक्र पुरस्काराचं डिझाईन करणारं मराठमोळं नाव

आधी जिचे उदाहरण दिले, त्या अश्विनी बोरसे हिच्या घरी आजी, आजोबा, आई, बाबा आणि दोन भाऊ. डोक्यावर मायेचे छत्र असले, तरी घरची परिस्थिती तशी बेताचीच. वडील शेती करतात, तर आई गृहिणी. दोन भावांच्या मध्ये जन्मलेल्या अश्विनीची स्वप्ने मोठी, पण आर्थिक परिस्थितीमुळे ती प्रत्यक्षात येण्यासाठी अडथळ्यांची शर्यत. जीवशास्त्राचा अभ्यास करून त्यात करिअर करायचे, असा विचार करून सटाण्याच्या महाविद्यालयात तिने प्रवेश घेतला होता. पण ‘सुपर ५०’मध्ये निवड झाली आणि तिची आवडनिवडच बदलली. केवळ ‘कंपल्सरी’ असल्याने गणित घेतलेल्या अश्विनीला सुरुवातीला गणिताचा मेळ घालता येईना. पण शिक्षकांनी तिच्यात गणिताविषयी आवड निर्माण केली. हे सर्व श्रेय गणितच्या शिक्षकांचेच, असे ती सांगते. ‘आय.आय.टी.’चा पेपर पॅटर्न कळण्यास ‘टेस्ट सिरीज’ महत्त्वाच्या ठरल्या. त्यामुळे परीक्षेत यश मिळवणे शक्य झाल्याचे ती म्हणते. या परीक्षेत अश्विनीने संपूर्ण भारतातून- AIR (SC) ९६८ क्रमांक प्राप्त केला.

कळवण तालुक्यातील मेहदर येथील डिंपल बागुल हिचे वडील शेतकरी, आई गृहिणी. भविष्याबाबत मोठी स्वप्ने घेऊन तिनेही नाशिकच्या महाविद्यालयात पाऊल ठेवले. ‘सुपर ५०’ प्रवेश परीक्षेनंतर तिला उपाध्ये महाविद्यालयात प्रवेश मिळाला. सुरुवातीपासूनच अभ्यासाची योग्य दिशा, व्यवस्थित तयारी, वेळोवेळी शंका निरसन, यामुळे आधी केवळ ‘सीईटी’पर्यंत मजल मारू, अशी अपेक्षा असणारी डिंपल आज ‘आय.आय.टी.’त प्रवेश घेऊ शकणार आहे.

आणखी वाचा-१९४३ साली प्रवास, खरेदीसाठी खर्च केले तब्ब्ल ‘८३ कोटी’ रुपये! कोण होत्या महाराणी सीतादेवी? पाहा

दिंडोरी तालुक्यातील टिटवे येथील हर्षदा वाटणे (AIR (ST) २२६३) लहानपणीच आईच्या मायेला पारखी झाली. त्यामुळे वडील आणि भाऊ असतानाही तिचे संगोपन आजी-आजोबांकडे झाले. आजोबा आणि वडील दोघेही शेती करतात. आपली आर्थिक परिस्थिती नसतानाही ‘सुपर ५०’मधून चांगल्या महाविद्यालयात शिक्षण मिळाले, याचे समाधान ती व्यक्त करते.आकांक्षा शेजवळ (AIR (SC) २९९३) हिच्या बाबतीत असेच काहीसे.वृषाली वाघमारे (AIR (SC) ६१८९) हिचे गाव मनमाड. आई-वडील आणि वृषालीसह तीन मुली. वृषालीचे वडील हातमजूर, पण मुलींना चांगले शिक्षण देण्याची तळमळ. त्यामुळेच वृषालीची मोठी बहीण आज स्वावलंबी आहे. लहान बहीणही अकरावीचे शिक्षण घेत आहे.

वृषाली सांगते, “माझ्यासारख्या गरीब घरातील मुलीला हे सर्व नवीन होते. सुरवातीला जुळवून घेण्यास त्रास झाला. साध्या शिक्षणाची मानसिकता असणारी मी, पण आज ‘आय.आय.टी.’मध्ये शिक्षण घेणार आहे. आर्थिक परिस्थिती नव्हती, मात्र या उपक्रमात निवास, भोजन आणि मुख्य म्हणजे शिक्षण, यांपैकी कशासाठीच आर्थिक जुळवाजुळव करावी लागणार नव्हती. त्यामुळे मी अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकले. महाविद्यालयात आमची खूप चांगली तयारी करून घेतली. विविध अधिकाऱ्यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे सतत ध्येय गाठण्यासाठी प्रेरणा मिळायची. घरात स्पर्धा परीक्षांचे कुठलेही वातावरण नसलेली मी आता स्पर्धा परीक्षांना आत्मविश्वासाने सामोरी जाऊ शकते.”

lokwomen.online@gmail.com