नुकतीच घरची कामं आवरून पाठ टेकवायला गेले. तेवढ्यात सासूबाई पटकन म्हणाल्या, “काय एवढ्याने दमलीस? तुमच्या सारख्या तरण्याताठ मुलींनी कशी झटपट कामं करायला हवीत. आम्ही नै बाय असं येता जाता झोपा काढत होतो. घरात कोणी असताना आम्हाला झोपायचीच लाज वाटायची.” सासूबाईंचं इतकं बोलणं ऐकवल्यावर आलेली झोपही पळाली आणि पुन्हा कामाला लागले.

आधीच ऑफिसच्या कामाचं टेन्शन. टार्गेट्स, स्पर्धा यात जीव कोंडतो. करिअर आणि घर सांभाळणं नकोसं होतं. पण तरीही आता सरावाने या गोष्टी सवयीच्या झाल्या आहेत. पण येता जाता कोणी अशा पद्धतीने तुलना केली की पुन्हा स्वतःचाच आत्मविश्वास कमी होतो. आमच्या घरी अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बसतात. ते दहा दिवस मस्त श्रद्धेचे अन् भक्तिभावाचे असतात. बाप्पाासाठी मनापासून काही गोष्टी कराव्या वाटतात. त्यामुळे मी कधी नव्हे ते गणपती बाप्पाासाठी ऑफिसला सुट्टी टाकली आणि पूर्णवेळ घरी द्यायचं ठरवलं.

पहिल्याच दिवशी आमच्याकडे म्हणे शेजारचे पाजारचे जेवायला येतात. फार पूर्वीपासूनची ही प्रथा. वरण, भात, उसळ, भाज्या, मोदक असा साग्रसंगीत बेत असतो. नाही म्हटलं तरी ४०-५० जण जेवायला असतात. त्यामुळे पहाटेच उठून कामाला सुरुवात करावी लागते. घरातल्या, शेजार-पाजारच्या बायका एकत्र येत गप्पा-गजाल्या करत स्वयंपाक करतात. या बायकांच्या गप्पातून अनेक नव्या गोष्टीही कळतात. त्यामुळे ही कामं करताना दमछाक होत नाही. सासूबाई कित्येक वर्षे गणपतीच्या पहिल्या दिवशी अशी जेवणाची पंगत बसवतात. एवढंच नव्हे तर अनेक सणवारांत आमच्या सासूबाईंनी अशी जेवणावळीची प्रथा पाळलेली आहे. त्यामुळे अनेक सणवारांना सुट्ट्या घेऊन फक्त गृहकृत्य करत पाहुणचार करावा लागतो. त्यामुळे सासूबाईंनी मला हट्टाने सांगितलं, “मी उद्या असेन-नसेन, पण ही परंपरा सुरू राहिलीच पाहिजे हं.”

हेही वाचा >> “मुलीचा रंग जरा काळाच आहे ना…”; नवजात बाळाच्या रुपाचीही समाजाला चिंता!

त्यांचं हे बोलणं ऐकून एकदम टेन्शन आलं. आता आपण मजेत या गोष्टी करतोय खरं, पण दरवर्षी जमेल का? लग्नानंतरचे नवे सणवार म्हणून मीही सुट्ट्या टाकून उत्साहाने सण साजरे करतेय. पण हाच उत्साह दरवर्षी टीकेल का? आणि टिकला तरीही सुट्टी मिळेल का? सुट्टी नाही मिळाली तर हे एवढे सोपस्कार कसे पार पाडायचे? या विचाराने टेन्शन येऊ लागलं. आईंनी फार मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवलीय असं वाटायला लागलं. त्यामुळे मी आईंना पटकन म्हणाले, “आई तुम्ही करत होतात तिथपर्यंत ठीक आहे. मी ही मला जमेल तेवढं सर्वांचं आदरातिथ्य करेनच. पण दरवर्षी मला हे जमेल याची मी खात्री देऊ शकत नाही.”

माझे हे शब्द ऐकताच आईंना राग अनावर झाला. “आम्ही एवढी वर्षे संसार केला, पण घराची प्रथा मोडली नाही. आम्हीही घरात राबराब राबतो, आता वयाच्या मानाने होत नाही, त्यामुळे सुनांना करायला सांगावं तर सुना हात वर करतात. मग घरच्या प्रथा परंपरा सांभाळणार कोण?”, असं सासूबाई संतापाच्या भरात म्हणाल्या. सासूबाईंनी सुरू केलेली प्रथा मलाही मोडायची नव्हतीच. राहता राहिला प्रश्न घरच्या कामांचा, स्वयंपाकाचा तर मला कधीच आळस, कंटाळा आलेला नाही. पाहुण्यांचं आदरातिथ्य करण्यात तर माझा हातखंड. माझा प्रश्न इतकाच होता की या वर्षी मी हौसेने सुट्टी काढून या सर्व गोष्टी केल्यात, तसं मला दरवर्षी करता येणार नाही. करिअरच्या दृष्टीने प्रत्येक सणवाराला सुट्टी काढणं जिकरीचं ठरेल. त्यामुळे तुमच्या इतके सोपस्कार पार पडणं माझ्याच्याने शक्य नाही, ही मी माझी भूमिका त्यांना बोलून दाखवली.

सकाळी उठून स्वयंपाक करून जेवणावळी वाढेपर्यंत, पुन्हा भांडी वगैरे घासून संध्याकळाच्या जेवणाला लागणं हे गृहिणींचं काम कितीही सोपं वाटत असलं तरीही ते तितकं सोपं नसतं. त्यातही नोकरी व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी या गोष्टी जरा कठीण जातात. सरावाने या गोष्टी सवयीच्या होतात. सरावामुळे मुली स्मार्ट वुमेन बनतात, पण शेवटी त्याही थकतातच. सणवार, व्रतवैकल्य करूनही गृहकृत्य करायची अन् दुसरीकडे ऑफिसच्या टार्गेट्स आणि असाईनमेंट्सकडे लक्ष ठेवायचं हे जरा आव्हानात्मकच आहे. स्मार्ट वुमेन बनायच्या नादात अनेक महिला घर आणि ऑफिस अशी तारेवरती कसरत करतात. परिणामी त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो.

प्रत्येक क्षेत्र वेगळं असतं. कामाचं स्वरुप वेगळं असतं. माझ्या कामाच्या स्वरुपानुसार हातातली सगळी ऑफिसची कामं टाकून प्रत्येक सणवार साजरा करता येणं करिअरच्या दृष्टीने घातक ठरेल. त्यामुळे आजच्या युगाचा विचार करुन काही परंपरांचा आवाका कमी करायला सासूच्या पिढीनेच मदत केली पाहिजे. पूर्णवेळ गृहिणी असलेल्या महिलांच्याही ही कामं जिव्हारी येतात, मग करिअर सांभाळून या गोष्टी करायचं म्हणजे एक आव्हानच आहे.

-अनामिका